कार बेपत्ताच; गोताखोर परतले
By Admin | Updated: August 14, 2014 23:33 IST2014-08-14T23:33:54+5:302014-08-14T23:33:54+5:30
कारधाहून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन भरधाव कार कोसळल्याची घटना मंगळवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या बेपत्ता कारचे दोन

कार बेपत्ताच; गोताखोर परतले
दिवसभर चालले शोधकार्य : पाणबुडीची मदत घेण्याचा शोधपथकाचा सल्ला
भंडारा : कारधाहून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन भरधाव कार कोसळल्याची घटना मंगळवारला रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या बेपत्ता कारचे दोन दिवसांपासून शोधकार्य सुरू असूनही कारचा अद्याप शोध लागलेला नाही. नागपूर महानगर पालिकेचे आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञांनी कारचा शोध घेतला. परंतु, त्यांना कार आढळून न आल्यामुळे हे पथक गुरुवारला सायंकाळी जिल्हा प्रशासनाला अहवाल देऊन परतले.
नागपूर महानगर पालिकेचे १६ आणि नॅशनल डिजास्टर रिस्पांस फोर्स (एनडीआरएफ) चे १९ असे ३५ जवानांचे दोन पथक नदीत बुडालेल्या बेपत्ता कारचा शोध घेण्यासाठी बुधवारला रात्री भंडाऱ्यात पोहोचले. त्यानंतर गुरुवारला सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत त्यांनी बेपत्ता कारचा शोध घेतला. परंतु, नदीत कार गवसली नाही.
नदीचा जलस्तर घटला
वैनगंगा नदीचा जलस्तर बुधवारला ४.३० मीटर इतका होता, आज गुरुवारला ३.९० मीटर इतका असून कालच्या तुलनेत जलस्तर अर्धा मीटरने कमी झालेला आहे. त्यामुळे बेपत्ता कार सापडण्याची शक्यता बळावली होती. परंतु शोधकार्यातील पथकाला कारचा शोध लागला नाही.
३० फूट खोलात घेतला शोध
बेपत्ता कारचा बुधवारला शोध न लागल्यामुळे जिल्हा प्रशासनाने नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन दलाला पाचारण केले. या विभागाचे प्रमुख पी. एन. कावळे व त्यांचे सहकारी सुनील राऊत, के. आर. कोटे यांच्या नेतृत्वात १६ सदस्याच्या पथकाने वैनंगगा नदीपात्र पिंजून काढले. त्यानंतर या दलातील जवानांनी आॅक्सिजनचे सिलिंडर्स घेऊन ‘स्कुबा ड्रायव्हिंग’ केली. त्यांनी ३० पूट खोल डोहात जावून शोध घेतला. यावेळी स्थानिक लोकांच्या सूचनांनुसार आणि त्यांना सोबत घेऊन गळ, लोहचुंबकांच्या सहाय्याने शोध घेतला, तरीही कार सापडली नाही.
बेपत्ता कारची पोलिसात तक्रार
कारधाहून भंडाराकडे येणाऱ्या मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलावरुन भरधाव इंडिका कार क्र.एम.एच.३१/ई.के.२१५२ नदीत कोसळल्याची घटना मंगळवारला घडली. अजय भादुडी रा.भंडारा, राहुल पितळे, विक्रांत वैद्य रा.नागपूर हे मंगळवारपासून बेपत्ता आहेत. हे तिघेही ज्या कार क्रमांक एम.एच.३१/ ई.के. २१५२ ने प्रवास करीत होते, ती कार नागपूर येथील गौरव शिंगोटे यांच्या मालकीची आहे. दरम्यान, शिंगोटे यांनी इंडिका कार बेपत्ता असल्याची तक्रार गुरुवारला दुपारी भंडारा पोलीस ठाण्यात नोंदविली आहे. रात्री उशिरा नागपूर येथील पितळे कुटूंबियांनी राहुल पितळे हे बेपत्ता आहेत, या आशयाची तक्रार नोंदविली.
उद्या शुक्रवारला सकाळपासून बेपत्ता कारचे शोधकार्य सुरु होणार असून बेपत्ता असलेल्या अजय भादुडी, रा.भंडारा, राहुल पितळे, विक्रांत वैद्य रा.नागपूर यांच्या मोबाईलचे शेवटचे लोकेशन तुकडोजी वॉर्ड भंडारा, असे दाखविण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. (जिल्हा प्रतिनिधी)