शहरातील अतिक्रमणावर चालणार ‘बुलडोजर’
By Admin | Updated: January 17, 2015 01:11 IST2015-01-17T01:11:39+5:302015-01-17T01:11:39+5:30
शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक परिसरातील मुख्य बाजार परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला आहे.

शहरातील अतिक्रमणावर चालणार ‘बुलडोजर’
भंडारा : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गांधी चौक परिसरातील मुख्य बाजार परिसरात व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणामुळे शहराचा विकास खुंटला आहे. या अतिक्रमणावर शनिवारी बुलडोजर चालणार असून ही कारवाई पालिका प्रशासन पोलिस विभागाचा मदतीने करणार आहे.
भंडारा शहराची नगरपालिका गांधी चौकात असून हेच शहरातील व्यापाऱ्यांचे मुख्य केंद्र आहे. गांधी चौक ते बसस्थानकापर्यंत व्यापारी वर्गाने मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन रस्त्यावर दुकानातील साहित्य खरेदीदारांना आकर्षीत करित आहेत. यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे स्थायी तथा अस्थायी दुकानदारांच्या अतिक्रमणामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी त्यांचे अतिक्रमण काढावे, अशी मागणी केली होती.
अतिक्रमणामुळे शहर सौंदर्यीकरणही वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. त्यामुळे हे अतिक्रमण काढण्यासाठी पालिका प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.
शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी पालिकेने मुख्याधिकारी रविंद्र देवतळे यांच्या अध्यक्षतेखाली ११ सदस्यीय समिती स्थापन केली आहे. शनिवारपासून गांधी चौकापासून हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. याप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेण्यात येणार आहे. दरवेळेस अतिक्रमण काढल्यानंतर पुन्हा अतिक्रमण ‘जैसे थे’ होते. त्यामुळे ही कारवाई फारस तर ठरणार नाही याबाबतही नागरिकांमध्ये शंका निर्माण होत आहे. (शहर प्रतिनिधी)
सतर्कतेचा इशारा
बाजारातील रस्त्यांवर दुकानातील साहित्य ठेवून अतिक्रमण करणाऱ्या व्यापाऱ्यांनी त्यांचे अतिक्रमण स्वत: काढावे अन्यथा कारवाईला सामोरे जाताना त्यांचे नुकसान होईल असा इशारा लाऊडस्पिकरद्वारे पालिकेने दिला आहे. यामुळे दुकानदारांनी अतिक्रमण काढण्यास मदत करावी असे आवाहनही पालिकेने केले आहे.
पालिका, मिस्किन टँक परिसरात पार्र्किं गस्थळ
नगरपालिका इमारतीपुढे दुकानदारांनी अतिक्रमण केल्यामुळे नगर पालिकेत येणाऱ्यांसाठी वाहनतळ नाही. त्यामुळे पालिकेसमोर ५० फुटाची जागा वाहनतळासाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. मिस्किन टँक प्रवेशद्वारापर्यंत दुकानदारांनी अतिक्रमण केल्याने तलावाचे सौंदर्य लपले आहे. नागरिकांना या बगिचाची माहिती व्हावी व नागरिकांचा ओढा वाढावा यासाठी त्या परिसरातील अतिक्रमण हटविण्यात येणार आहे. हे दुकाने हटवून तिथेही वाहनतळासाठी जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. बसस्थानक परिसरातील रिकाम्या जागेत आॅटोकरिता पार्किंग झोन बनविण्यात येणार आहे. याबाबत पालिका प्रशासनाने राज्य परिवहन महामंडळाला पत्र पाठविणार आहे.