कर्जदार शेतकरी सावकाराच्या दारात
By Admin | Updated: May 15, 2014 23:18 IST2014-05-15T23:18:42+5:302014-05-15T23:18:42+5:30
निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर बँकांचे कर्ज थकीत झाले आहे.

कर्जदार शेतकरी सावकाराच्या दारात
भंडारा : निसर्गाचा प्रकोप, सततची नापिकी, बियाणे व खताचे वाढते भाव, शेतमालाची कमी भावात विक्री अशा चौफेर संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर बँकांचे कर्ज थकीत झाले आहे. काही शेतकरी जुळवाजुळव करुन थकित कर्ज अदा करीत आहेत तरण नवीन कर्जासाठी शेतकरी बँकेत चकरा मारत असल्याचे दिसते. बँकेतही शेतकर्यांची अडवणूक होत असल्याने यावर्षीही शेतकर्यांना कर्जासाठी सावकाराच्या दारी जावे लागणार असल्याचे दिसते. उत्पन्नापेक्षा खर्च वाढला आहे. शिक्षणाच्या खर्चातही वाढ झाली असून तो न झेपावणारा आहे. मेंदूत हुशार असताना आर्थिक विवंचनेमुळे शेतकर्यांच्या मुलांना इच्छा असून आवडीचे शिक्षण घेता येत नाही. मुला-मुलींचे लग्न करण्यासाठी आर्थिक जुळवाजुळव जड जात आहे. ज्या शेतकर्यांनी श्रमाचा पै-पै बँकेत जमा केला तो पैसा बँक गरजेच्यावेळी देत नाही. असे असताना शेतकर्यांच्या प्रश्नांना बगल देत राजकीय मंडळी पोळ्या शेकण्यात व्यस्त दिसत आहेत. शेतकर्यांच्या शेतमालाचे भाव अचानक पडले. जो माल शेतकर्यांकडे नाही, जो व्यापार्याच्या गोदामात पोहोचला त्याचे भाव वाढत आहेत. या विसंगतीमुळे शेतकरी हैराण झाला आहे. सहकारी सोसायटी कर्ज देऊ शकत नाही. राष्ट्रीयकृत बँका सहजासहजी शेतकर्याला कर्ज देत नाही. दिलेच तर कागदपत्रे गोळा करताना त्याची दमछाक होते. शेतीचे भाव कितीही वाढले असले तरी त्या शेतीवर शेतकर्याला नाममात्र कर्ज मिळते. तेवढय़ा रकमेत वाढत्या दराने बियाणे, खते, किटकनाशके यांचा ताळमेळ बसत नाही. निंदण, खुरपणासाठी पैसा राहत नाही व शेतकर्यांना अपेक्षीत उत्पन्नही होत नाही. त्यातही निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या पाचवीलाच पूजलेला आहे. यामुळे तो संकटात सापडला आहे. अशा स्थितीत नाईलाजाने शेतकर्यांना सावकाराच्या दारात जाण्याची वेळ आली आहे. सावकार शेतकर्यांच्या जमिनीचे सरळ विक्रीपत्र स्वत:च्या वा नातेवाईकाच्या नावे करुन तुटपुंजी रक्कम शेतकर्यांच्या पदरात टाकते. अज्ञानी शेतकर्यांना सर्व कळत असताना हे कृत्य करतो. यात अनेक शेतकर्यांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. एकेकाळी सावकारांना सोलून काढण्याची भाषा करण्यात आली. पण येथे सावकारच शेतकर्यांना सोलून काढण्याची भाषा करीत असल्याचे दिसते. जिल्ह्यात कित्येक शेतकर्यांच्या उभ्या पिकाला भुईसपाट करुन शेताचा ताबा सावकरांनी घेतला. पण त्यांच्यासमोर कुणाचे काहीच चालले नाही. ज्यांनी पोलीस ठाण्याचा आधार घेण्याचा प्रयत्न केला त्यांना सावकारांनी शेताचे रजिस्टर्ड विक्रीपत्र दाखविले. चिरीमिरी देत अन्यायग्रस्त शेतकर्यांना न्यायालयात जाण्याचे सल्ले देण्यात आले. (नगर प्रतिनिधी)