रस्ता रुंदीकरणात वीज खांबांचा अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2019 06:00 AM2019-12-08T06:00:00+5:302019-12-08T06:00:33+5:30
निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
पालोरा चौ : निलज ते भंडारा राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम जोमाने सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीने या मार्गावरील वीज खांब बाजूला न केल्यामुळे रस्ता रुंदीकरणात अडथळा निर्माण होत आहे. यामुळे दररोज लहान मोठे अपघात होत आहेत. हा राज्यमार्ग वर्दळीचा असून रस्त्याचे काम सुरु असल्यामुळे या खांबामुळे वाहनास अडथळा निर्माण होत आहे. एखादा मोठा अपघात झाल्यावर किंवा एखादा जीव गेल्यावर वीज प्रशासनाला जाग येईल का, अशा प्रश्न वाहनचालकांना पडत आहे.
निलज ते भंडारा या राज्यमार्गाची अवस्था पुर्णपणे खराब झाली होती. काळाची गरज म्हणून रस्त्याचे रुंदीकरण करणे गरजेचे होते. हा निर्णय अतिशय योग्य आहे. रस्त्याच्या एका बाजूने रस्त्याचे खोलीकरण करुन त्यांना नवीन बनविणे सुरु आहे. या राज्यमार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. तरीही वाहनचालक कोणतीही तक्रार न करता त्रास सहन करुन प्रवास करीत आहेत. मात्र राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूला वीज खांब जसेचे तसे उभे असल्यामुळे जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे अपघातात वाढ झाली आहे. रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु असल्यामुळे कडेला असलेले खांब रस्त्यावर आले आहेत. प्रवाशांच्या गैरसोयीकडे लक्ष देवून वीज वितरण कंपनीने लक्ष देवून त्वरीत वीज खांब हटविण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
जनहितासाठी काढावा तात्काळ पर्याय
निलज- भंडारा या राज्यमार्गाचे रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. मात्र वीज वितरण कंपनीचे वीज खांब जर मार्गाच्या मध्यभागी असतील तर या मार्गाच्या रुंदीकरणाला काहीच उपयोग राहत नाही. अशा रस्ते बांधकामामुळे अपघात होऊन नागरिक व वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने आपआपल्या नियमांच्या मर्यादा लक्षात घेवून लोकांचे जीव वाचवावेत यासाठी संयुक्तरित्या पर्याय काढणे आवश्यक आहे.
निलज - भंडारा या रस्त्याचे जोमाने काम सुरु आहे. मात्र रस्त्यावरील खांब अडचण निर्माण करीत आहेत. याकरिता दोषी वीजवितरण कंपनी आहे किंवा बांधकाम विभाग आहे. या संदर्भात जनतेला काही देणे नाही. अपघात होवू नये, एखाद्याचा जीव जावू नये हे महत्वाचे आहे. खांब हटविणे ही जबाबदारी बांधकाम व वीज वितरण कंपनीचा आहे. रस्ता रुंदीकरणामुळे जनतेला त्रास होवू नये हे महत्वाचे आहे. एखादा अपघात झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम विभाग व वीज वितरण कंपनी राहील.
- बाळू फुलबांधे,
भंडारा विधानसभा प्रमुख, शिवसेना