भंडारेकरांचा घसा ‘जाम’
By Admin | Published: July 20, 2015 12:30 AM2015-07-20T00:30:53+5:302015-07-20T00:30:53+5:30
ढगाळ हवामान, तापमानातील चढ उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे भंडाराकरांचा घसा जाम झाला आहे.
रुग्णांमध्ये वाढ : सर्दी, खोकला, ताप
ढगाळ हवामान, तापमानातील चढ उतार आणि पडू लागलेल्या पावसामुळे भंडाराकरांचा घसा जाम झाला आहे. गेल्या तीन चार दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात सर्दी - खोकला, साधा आणि डेंग्यू- मलेरियासदृश ताप, घसादुखीने नागरिकांना घेरले आहे. यामुळे दवाखान्यांमध्ये रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे.
भंडारा : जून महिन्यात येणारा पाऊस जुलै महिन्यात आल्याने हवामानात मोठे बदल होत आहेत. कधी ऊन, कधी ढगाळ हवामान तर कधी पाऊस अशा वातावरणामुळे हवेतील विषाणूच्या वाढीसाठी पोषण वातावरण निर्माण झाले आहे व या विषाणूंनी भंडाराकरांवर हल्लाबोल केला आहे.
प्रामुख्याने हवेतून आणि अन्नातून शरीरात प्रवेश करणाऱ्या या विषाणुमुळे सर्दी, खोकला, ताप येणे, घसादुखी, उलटी, जुलाब या आजाराचे प्रमाण वाढले आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी दवाखान्यांमध्येही या रुग्णांचे उपचारासाठी येण्याचे प्रमाण वाढले आहे.
दोन दिवसापासून रिमझिम पाऊस सुरु झाल्याने सर्दी - खोकला, घसादुखी आणि ताप या रुग्णांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. याचबरोबर डेंगी आणि मलेरियासदृश रुग्णांची संख्याही झपाट्याने वाढू लागली आहे. उलटी, जुलाब या रुग्णांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे. दूषित पाण्यामुळे उलटी, जुलाब हे आजार होत असल्याने पाणी गाळून, उकळून प्यावे, बाहेरचे खाणे, पावसात भिजणे टाळावे.
पावसाळ्यात शरीरातील अग्नी मंदावतो, त्यामुळे अन्न पचविण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे पोटावर ताण येईल, असे पदार्थ एकदम खाणे टाळावे. याउलट थोडे थोडे आणि काही काही वेळाने खावे.उघड्यावरचे पदार्थ खाऊ नये. (नगर प्रतिनिधी)