लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अपघातासाठी कुप्रसिद्ध असलेल्या भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाचे आता भाग्य फळफळणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ७० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे ५.८ किमी हायवे आता फोरवे होणार आहे. या रस्त्याच्या कामाला प्रारंभ होणार आहे. जिल्हा सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी ही माहिती दिली. भंडारा शहरातून मुंबई-कोलकाता हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ जातो. मुजबीपासून ते शिंगोरीपर्यंत हा राष्ट्रीय महामार्ग दुपदरी आहे. भंडारा शहराच्या मध्य भागातून हा रस्ता जातो. अहोरात्र या रस्त्यावर वाहनांची वर्दळ असते. अपघाताचे प्रमाण मोठे आहे. गत सहा महिन्यात या रस्त्यावर ८४ अपघात होऊन ७२ व्यक्तींचा मृत्यू झाला. आता अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी या रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने ७० कोटी रुपये मंजूर केले असून या निधीतून ५.८ किमी रस्त्याचे चौपदरीकरण करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम लवकरच सुरू करण्यासाठी प्रयत्न करावे, अशी सूचना दिली.या बैठकीला उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र वर्मा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आर. एस. फारूखी, उपविभागीय अभियंता अ.द. गणगे, पोलीस उपनिरीक्षक महामार्ग अमित पांडे, उपविभागीय अभियंता महामार्ग संजीव जगताप, आगार व्यवस्थापक फाल्गुन राखडे, नगर अभियंता अतुल पाटील, उपशिक्षणाधिकारी आर.बी. भांबोरे, प्रभारी पोलीस उपअधीक्षक गृह राजेश थोरात, वाहतूक शाखेचे प्रमुख शिवाजी कदम आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे राजन पाली उपस्थित होते.
सहा महिन्यात १५८ रस्ते अपघात- जानेवारी ते मे या सहा महिन्याच्या कालावधीत १५८ रस्ते अपघात झाले. गतवर्षीपेक्षा अपघातात २७ ने वाढ झाली. बहुतांश अपघात राष्ट्रीय महामार्गावरील आहेत. या अपघातात ७२ व्यक्तींनी आपला जीव गमावला आहे. गत वर्षी जानेवारी ते मे या कालावधीत ५५ व्यक्तीचा अपघातात जीव गेला होता.