राष्ट्रसंतांच्या हस्ते उद्घाटित शाळेचे ‘बेहाल’
By Admin | Updated: April 27, 2016 00:22 IST2016-04-27T00:22:52+5:302016-04-27T00:22:52+5:30
सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल,...

राष्ट्रसंतांच्या हस्ते उद्घाटित शाळेचे ‘बेहाल’
बालकांचा जीव धोक्यात : व्यथा पिलांद्री येथील जिल्हा परिषद शाळेची
विशाल रणदिवे अड्याळ
सर्वधर्मसमभावाची शिकवण देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ग्रामविकास झाला की राष्ट्राचा विकास होईल, असे सांगायचे. १९६६ मध्ये त्यांच्या हस्ते उदघाटन झालेल्या जिल्हा परिषद शाळेची आजची अवस्था पाहिल्यावर शिकणारे विद्यार्थी आणि शिकविणारे शिक्षक भयभीत वातावरणात आहेत.
१० मे १९६६ रोजी गांधी विद्यालयाचे संस्थापक तुकाराम मोटघरे व पिलांद्रीचे तत्कालीन सरपंच सखाराम चव्हाण यांच्या पुढकाराने राष्ट्रसंतांच्या हस्ते पिलांद्री जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचे उद्घाटन झाले होते. गाव व परिसरातील विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षण मिळावे यासाठी शाळा सुरू करण्यात आली होती. आजघडीला ही इमारत जीर्ण अवस्थेत आहे. विद्यार्थी जीव मुठीत घेऊन शिक्षण घेत आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या हस्ते इमारतीचे उद्घाटन झाले त्याच इमारतीकडे दुर्लक्ष सुरू आहे. ज्यावेळी उद्घाटन झाले त्यावेळी लावण्यात आलेली टिनाची पाटी भिंतीवर आजही कायम आहे.
जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमीकमी होत आहे. विद्यार्थी मिळत नाही अशी ओरड असताना विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा प्रकार पिलांद्री येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला पाहिल्यावर दिसून येते. येथील ग्रामस्थ व शिक्षकाकडून मागील अनेक वर्षापासून नवीन ईमारत बांधण्याचा प्रस्ताव आहे. परंतु संबंधित विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
इमारत जीर्ण असल्यामुळे ती कधीही कोसळू शकते. तरीही त्याच इमारतीत विद्यार्थी जीवाची पर्वा न करता ‘आली या भोगाशी असावे सादर’ या उक्तीप्रमाणे शिक्षण व घेत आहेत. येथील एखाद्या शिक्षकाचा किंवा विद्यार्थ्याचा जीव गेला तर याला जबाबदार कोण? परंतु हे कधीपर्यंत सहन करायचे असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. संबंधित विभागाने आतातरी जागे होऊन याकडे लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रसंतांच्या विचारांची ज्योत कायम राहावी, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने या शाळेचे महात्मय लक्षात घेण्याची गरज आहे. नाहीतर कालौघात ते विस्मृतीत जाईल.
येथील मुख्याध्यापकांच्या चुकीमुळे व सर्वशिक्षा अभियानांतर्गत येणारा निधी न आल्याने येथील काम रखडले होते. तीन महिन्यात या शाळेचे काम करण्यात येईल.
- रेखा भुसारी, जि.प. सदस्य.
या शाळेतील समस्या फार जून आहे. ही समस्या आजची नाही. वर्गात शिक्षण घेणारे विद्यार्थी व शिक्षण देणारे शिक्षक दोन्हीचा विचार होणे महत्त्वाचे आहे.
- भिमटे, मुख्याध्यापिका, पिलांद्री