बावनथडीचे पाणी अडविले; वैनगंगा कोरडीच
By Admin | Updated: May 14, 2016 00:26 IST2016-05-14T00:26:08+5:302016-05-14T00:26:08+5:30
पाणीपुरवठा योनजेच्या विहीरी कोरड्या पडल्याने तुमसर व तिरोडा तालुक्यातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती.

बावनथडीचे पाणी अडविले; वैनगंगा कोरडीच
८.२० दलघमी पाणी प्रकल्पातून सोडले : वाहनीनंतर अनेक गावात पाणीटंचाई
मोहन भोयर तुमसर
पाणीपुरवठा योनजेच्या विहीरी कोरड्या पडल्याने तुमसर व तिरोडा तालुक्यातील गावात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. याकरिता बावनथडी धरणातून बावनथडी नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. वैनगंगा नदीवर वाहनी येथे बॅरेजवर पाणी अडविण्यात आले. बॅरेजनंतर वैनगंगेचे नदी पात्र कोरडे पडले आहे. वाहनी पुढील अनेक गावात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. बॅरेजमधून निदान पिण्याकरिता पाणी सोडण्याची मागणी जोर धरत आहे.
तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी, बपेरा परिसरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली होती. याकरिता आ. चरण वाघमारेसह इतर लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला बावनथडी धरणातून पाणी सोडण्याची मागणी केली होती. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी नागपुरात संबंधित अधिकाऱ्यांना पाणी सोडण्याची कारवाई पुर्ण करण्याच्या सुचना केल्या होत्या. दोन्ही राज्याच्या प्रशासनाने तात्काळ कारवाई केली. बावनथडी धरणातून ८ मे ते १० मे पर्यंत ८.२० दशलक्ष घनमीटर पाणी सोडले होते. पाणीटंचाई ग्रस्त गावांना या पाण्यामुळे दिलासा मिळाला हे पाणी बपेरा येथे वैनगंगा नदीत पोहोचले वाहनी मांडवी गावाजवळ वैनगंगा नदीवर राज्य शासन व अदानी वीज समूहाचा संयुक्त प्रकल्पात हा पाणी बॅरेज अडविण्यात आला. अदानी वीज समूहाने या संपूर्ण पाण्याचे पैसे भरले आहेत. तिरोडा तालुक्यातील उपसा करणार आहे.
वाहनी मांडवी नंतर बॅरेज पुढील वैनगंगा नदी कोरडी पडली आहे. वाहनी मांडवी ते रोहा-बेटाळापर्यंत सद्यस्थितीत नदी पात्रात पाणी नाही रेंगेपार जवळ नदीची धार बंद पडली आहे. बॅरेजमधून येथे किमान पिण्याच्या पाण्याकरिता पाणी सोडण्याची गरज आहे. शासनाच्या नियमानुसार नदीच्या पाण्यावर प्रथम हक्क पिण्याकरिता, शेती व शेवटी उद्योगाकरिता पाणी देण्याचा नियम आहे. बारमाही वाहणारी वैनगंगा नदी कोरडी पडल्याने पाणीपुरवठा योजना शेवटच्या घटका मोजत आहे. दुसरीकडे पशूंना ही पिण्याकरिता पाणी नाही. शासनाने येथे नियोजन करण्याची गरज आहे.
रेंगेपार येथे नदीची धार बंद आहे. वाहनी मांडवी पुढील गावात पाण्याची तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. वाहनी मांडवी बॅरेजमधून पाणी सोडण्याची गरज आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात येईल.
-हिरालाल नागपुरे,
गटनेता, पंचायत समिती, तुमसर.