माकडांच्या त्रासाने शेकडो वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:04 IST2021-03-13T05:04:30+5:302021-03-13T05:04:30+5:30
मोहाडी : पूर्वी चारही बाजूला शेतशिवारात उंच उंच दिसणारे डौलदार व गारवा देणारे वृक्ष आज दिसेनासे झाले आहेत. याचे ...

माकडांच्या त्रासाने शेकडो वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव
मोहाडी : पूर्वी चारही बाजूला शेतशिवारात उंच उंच दिसणारे डौलदार व गारवा देणारे वृक्ष आज दिसेनासे झाले आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे, शेतकऱ्यांना होणारा माकडांचा त्रास होय. माकडांच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी शेतकरी थेट डेरेदार वृक्षांवरच कुऱ्हाड चालवत आहेत. तालुक्यात यापद्धतीने शेकडो वृक्षांची कत्तल दिवसाढवळ्या होत आहे. वृक्ष जगवायचे असेल या माकडांचा बंदोबस्त होणे आवश्यक झाले आहे. मात्र सध्यातरी या मर्कटलीलांकडे कुणाचेच लक्ष नाही.
मोहाडी तालुक्यातील शेतशिवारात गत काही दिवसांपासून माकडांचा प्रचंड त्रास आहे. माकडांचे मोठमोठे अनेक कळप तयार झाले आहेत. त्यांच्यापासून शेतमालाची नासाडी होत आहे. माकड व रानडुकरांनी शेतकऱ्यांना सळो की पळो करून सोडले आहे. या माकडांच्या त्रासामुळे आता अनेक शेतकऱ्यांनी लाखोरी, तूर, हरभरा, वाटाणा, मोहरी आदी पिके घेणेच बंद केले आहे. माकडे या पिकांची इतकी नासाडी करतात की शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागते.
आता माकडांच्या त्रासाला कंटाळून अनेक शेतकरी शेतशिवारातील बाभूळ, आंबा, चिंच, हिरडा, बेहडा, बोर, कडुनिंब, मोहफूल, खैर आदी वृक्षांवर कुऱ्हाडीचे घाव घालणे सुरू केले आहे. एखाद्या शेतकऱ्याच्या शेतावर सावलीसाठी मोठे झाड दिसले की माकडे आपले बस्तान मांडतात. त्यामुळे आजूबाजूचे शेतकरी त्या शेतकऱ्यावर दबाव आणून झाड तोडण्यास बाध्य करतात. काही बांधावर आंबा, चिक्कू, बोर अशी झाडे लावली, परंतु माकडांनी त्या झाडांची नासाडी केल्याची अनेकांची तक्रार आहे. काही शेतकऱ्यांनी कान्द्री वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन माकडांचा बंदोबस्त करण्याची विनंती केली. मात्र त्यांची विनंती धुडकावून लावण्यात आली व स्वतः बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या गेल्या.
बॉक्स
शहरातही माकडांचा उच्छाद
माकडांनी आता आपला मोर्चा जंगलातून शेतशिवारात आणि तेथून शहराकडे वळविला आहे. गावात व शहरातील फळझाडांची नासधूस करीत आहेत. गृहिणींनी उन्हाळ्यात तयार केलेले खाद्यपदार्थ छतावर किंवा अंगणात वाळायला टाकतात माकड त्यावर यथेच्छ ताव मारतात, त्यामुळे गृहिणींची सर्व मेहनत तर व्यर्थ जाते. आर्थिक भुर्दंड सुध्दा सोसावा लागतो. तसेच पूर्वी माकडे धाक दाखविल्यावर, फटाके फोडल्यावर पळून जायचे. परंतु आता ते एवढे धीट झाले आहेत की उलट अंगावरच धावून येतात.
कोट
संपूर्ण माकडांचा बंदोबस्त करण्यासाठी सध्या आमच्याकडे कोणतीही योजना नाही, परंतु एखाद्या माकडाने माणसावर हल्ला केला तर आम्ही त्याला पकडून जंगलात सोडून देतो.
केशव राठोड
वनपरिक्षेत्र अधिकारी, कान्द्री ता. मोहाडी