खाकी वर्दीतील देवदूतांनी वाचविले पुरात अडकलेल्या शेकडोंचे प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 07:00 IST2020-09-04T07:00:00+5:302020-09-04T07:00:22+5:30
जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.

खाकी वर्दीतील देवदूतांनी वाचविले पुरात अडकलेल्या शेकडोंचे प्राण
ज्ञानेश्वर मुंदे।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : किर्र अंधाऱ्या रात्री वैनगंगा कोपली. पुराचे पाणी छतापर्यंत टेकले. शेकडो कुटुंब पुरात अडकले. मदतीसाठी धावा करुनही कुणापर्यंत आवाजच जात नव्हता. अशा कठीणप्रसंगी धावून आले ते खाकी वर्दीतील वीर जवान. जीव धोक्यात घालून पुराच्या पाण्यात शिरुन शेकडो पूरग्रस्तांना सुरक्षितस्थळी हलविले. भंडारा जिल्हा पोलीस दलातील या खाकी वर्दीतील माणुसकीला पुरग्रस्तांनी कडक सॅल्यूट ठोकला.
समाजाचा सजग प्रहरी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ असे पोलिसांबाबत म्हटले जाते. मात्र अनेकदा पोलीसही टीकेचेच धनी होतात. एखाद्या घटनेत पोलिसांवरच ताशेरे ओढले जातात. मात्र भंडारा जिल्ह्यात आलेल्या पुरात जिल्हा पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी बजावलेली कामगिरी अतुलनीय आहे. रविवारची सकाळ उजाळली ती महापुराची वार्ता घेवून. सर्वत्र हाहाकार उडाला. अनेक कुटुंब पुरात अडकले होते. त्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरु होते. यात जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यातील कर्मचारी अगदी आघाडीवर होते. अहोरात्र पुरग्रस्तांना मदत करुन सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. अनेक ठिकाणी तर पुरामुळे पोहचणे कठीण होते. अशाठिकाणी ट्यूबच्या सहाय्याने पोहोचून सुरक्षित स्थळी हलविले.
जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या नेतृत्वात पोलिसांनी पुरग्रस्तांना मदतीचा हात दिला. भंडारा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार बंडोपंत बन्सोडे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी शहरातील विविध वसाहतीत शनिवारी रात्रीच धाव घेतली. ग्रामसेवक कॉलनी, भोजापूर, गणेशपूर, नागपूर नाका, प्रगती कॉलनी आदी भागातील नागरिकांना बोटीच्या सहाय्याने बाहेर काढण्यास मदत केली. घरातील वृद्ध व्यक्तींना आणि लहान मुलांना अक्षरश: कंबरभर पाण्यातून उचलून आणले. तुमसर, मोहाडी, पवनी पोलीसही यात आघाडीवर होते.
लाखांदूरचे ठाणेदार शिवाजी कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तर पुरात आपला जीव धोक्यात घालून अनेकांना बाहेर काढले. सुरक्षेच्या साधनांचा अभाव असतानाही या जवानांनी पुरात शिरुन अनेकांना बाहेर काढले. पोलिसांनी केलेल्या या कार्याची कुणी दखल घेतली नसली तरी पुरातून बाहेर पडलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरील समाधान हे पोलिसांसाठी सर्वात मोठे अवार्ड होते.
पोलिसांची धडपड
लाखांदूर तालुक्यातील अनेक गावांना पुराचा विळखा पडला होता. प्रशासनाची मदत पोहोचण्यास विलंब लागत होता. अशा परिस्थितीत लाखांदूर पोलिसांचे पथक गावागावांत जावून पुरग्रस्तांना बाहेर काढत होते. आपत्ती व्यवस्थापनाच्या तज्ज्ञांसोबत पोलिसांनीही तीन दिवस मदत कार्यात स्वत:ला झोकुन दिले होते. पुरग्रस्तांसाठी पोलीस देवदूतच ठरले. वेळीच पोलीस मदतीला धावून आले नसते तर मोठा अनर्थ घडला असता.