नावातच असतं सगळं काही !
By Admin | Updated: March 2, 2015 00:43 IST2015-03-02T00:43:16+5:302015-03-02T00:43:16+5:30
नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते.

नावातच असतं सगळं काही !
लोकमत सर्व्हेक्षण
भंडारा : नावात काय आहे, असे भलेही विल्यम शेक्सपिअरने म्हटले असले तरी सध्याच्या पालकांना मात्र नावातच सर्व काही असल्याचा साक्षात्कार होत असल्याचे दिसते. मुलाचे नामकरण करताना अधिक सजगपणे पालक नावाची निवड करतात, याची प्रचिती ‘लोकमत’च्या पाहणीत दिसून आली.
होय, नाही, सांगता येत नाही, स्वत:चे नाव प्रत्येक महिलेला आवडते की नाही, हे पाहणेही रंजक ठरले. स्वत:चे नाव आवडणाऱ्या महिलांची संख्या ६४ टक्के तर नाव आवडत नसल्याची तक्रार ३६ टक्के महिलांनी केली.
नाव आवडण्यामागे सर्वच महिलांनी एकमेव कारण सांगताना आपल्या आईवडीलांनी हे नाव ठेवलेले असल्याने ते अधिक आवडते असे सांगितले. नकारात्मक उत्तर देणाऱ्या महिलांनी त्यांच्या नावात शेवटी बाई असा उल्लेख असल्याने नाव उच्चारताना जरासे कसेतरी वाटते, असे सांगत या नावाऐवजी आपले अमुक नाव असते तर बरे झाले असते, असे सांगून टाकले. स्वत:च्या नावाबद्दल जसे अगदी स्पष्टपणे महिलांनी आपली मते नोंदविली.
४६ टक्के महिलांना त्यांच्या घरात टोपननाव आहे आणि त्या नावानेच त्यांचा उल्लेख होत असतो तर ५४ टक्के महिलांनी आपल्याला असे टोपन नाव नसल्याचे सांगितले. महिलांना एकदा नाव बदलण्याचा चॉईस असतो. लग्नानंतर त्यांचे आडनाव जसे बदलून जाते तसेच त्यांचे नावही अनेकदा सासरची मंडळी बदलून टाकतात. लग्नानंतर स्वत:चे नाव बदलून टाकलेल्या महिलांची संख्या आहे ३७ टक्के तर ६३ टक्के महिलांचे नाव मात्र लग्नानंतरही तेच कायम असल्याचे पाहणीतून समोर आले आहे.
साठ ते सत्तरच्या दशकात हिंदी आणि मराठी चित्रपटांचा पगडा समाजमनावर असल्याचे दिसून आले. त्याचा परिणाम अर्थातच मुलांच्या नामकरणावर झाला. मुलांची देवदेवतांची नावे काळाच्या ओघात काहीशी मागे पडली आणि त्याची जागा चित्रपटातील आवडत्या अभिनेता आणि अभिनेत्यांच्या नावाने पालकांच्या मनाची पकड घेतली. त्यामुळे मुलांचे नामकरण बबिता, साधना, रेखा, संजय, अमित, मिथून, इथपासून ते अगदी जया, संजीवकुमार, डॉली, इथपर्यंत झाले.
५० वषार्पूर्वीचा किंवा त्या आधीचा काळ हा समाजावर धार्मिक पगडा खूप मोठा असलेला काळ होता. त्यामुळे अर्थातच आपल्या मुलाचे अथवा मुलीचे नाव ठेवताना पालकांचा ओढा देवदेवतांची किंवा संतांच्या नावाकडे अधिक असायचा. राम, कृष्ण, सीता, द्रोपदी, मुक्ताई, ज्ञानदेव अशा आशयाची नावे असायची. पती किंवा पत्नीच्या आद्याक्षरावरून आपल्या पाल्याचे नाव पालक ठेवतात. नावात काळाप्रमाणे बदल झाले असले तरी आद्याक्षरांना महत्त्व आजही पालक देताना दिसतात. (लोकमत चमू)