कृषीसेवक सरळसेवा पदभरती परीक्षेच्या निकालात घोळ
By Admin | Updated: September 11, 2016 00:27 IST2016-09-11T00:27:17+5:302016-09-11T00:27:17+5:30
कृषीसेवक पदाच्या सरळसेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात घोळ झाला असून ...

कृषीसेवक सरळसेवा पदभरती परीक्षेच्या निकालात घोळ
१,४०० विद्यार्थ्यांवर अन्याय : सीआयडी चौकशीची काँग्रेसची मागणी
भंडारा : कृषीसेवक पदाच्या सरळसेवा पदभरती परीक्षेच्या निकालात राज्यातील सर्वच विभागात घोळ झाला असून यात भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. राज्यात कृषीसेवकांच्या ७३० पदांसाठी ६ आॅगस्ट रोजी परीक्षा घेण्यात आली. ही परीक्षा भंडारा जिल्ह्यातील १,४०० विद्यार्थ्यांनी दिल्याचे नगरसेवक महेंद्र निंबार्ते यांनी आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.
सदर परीक्षेत ६५ हजारावर विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल ६ सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. परंतु सदर निवड प्रक्रियेमध्ये विशाल उखा पाटील (अर्ज क्रमांक १३६६४, बैठक क्र.५१२७१४६३९६) हा विद्यार्थी औरंगाबाद विभागातून ओबीसी प्रवगार्तून १८२ गुण प्राप्त करीत याची निवड ओपन जनरल - १३ मध्ये झाली. हाच विद्यार्थी ठाणे विभागातून (अर्ज क्रमांक ४८१७, बैठक क्र.१५२११०९०२०) ओबीसी प्रवगार्तून १८२ गुण प्राप्त करीत ह्याची निवड ओपन जनरल ९ मध्ये झाली.
पुणे विभागातून हरीश कैलास देवरे व नरेश कैलास देवरे हे दोन भाऊ उत्तीर्ण झाले. या दोन्ही भावांना १८३ गुण प्राप्त झाले. विशेष म्हणजे या दोन भावांच्या वयात केवळ ६ महिन्याचे अंतर आहे. औरंगाबाद विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८७ गुण त्याखालोखाल १८४ गुण प्राप्त केलेले पाच विद्यार्थी, १८३ गुण प्राप्त केलेले सहा विद्यार्थी, १८२ गुण प्राप्त केलेले तीन विद्यार्थी व त्यानंतर थेट १३७ गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी. कोल्हापूर विभागात प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्याला १८२ गुण त्याखालोखाल १८१ गुण प्राप्त केलेले चार विद्यार्थी व त्यानंतर थेट १५० गुण प्राप्त केलेला परीक्षार्थी.
अमरावती विभागात सर्वसाधारण गटात केवळ १२४ गुणांवर प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी आहे. नागपूर विभागात १६५ ते १८२ गुणांच्या दरम्यान १६ मुले आहेत व १४८ ते १६२ गुणांच्या दरम्यान एकही उमेदवार नाही व नंतर थेट १४८ गुणांच्या खाली इतर परीक्षार्थी आहेत. मेरिट लिस्ट व प्रतीक्षा यादीतील गुणांमध्ये तफावत आहे. निवड यादीत ओपन प्रवगार्तील पुरूष निवड यादी ९२ गुणांवर, महिला निवड यादी ९१ गुणांवर झाली. यांच्या तुलनेत ओबीसी महिला यादी ११३ व ओबीसी पुरूष यादी १२९ गुणांवर अंतिम निवड करण्यात आली.
ओबीसी उमेदवारांना जास्त गुण असूनसुद्धा डावलण्यात आल्याचे स्पष्ट होते व ओपन प्रवगार्तील विद्यार्थ्यांची निवड कमी गुणांवर सुद्धा करण्यात आली. सर्वसाधारण गटात गुणवत्ता यादीत १८६ गुणांचा विद्यार्थी पहिला आला. प्रश्नपत्रिकेचे अवघड स्वरूप बघता मेरिटचे आकडे संशयास्पद आहेत. या परीक्षा केंद्रावरील व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासण्यात यावी, जेणेकरून कुणी मदत किंवा अत्याधुनिक उपकरणाचा वापर केला तर नाही, ना अशी शंका येत आहे. या प्रकरणाची सीआयडी चौकशी करून भंडारा जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची मते नोंदविण्यात यावे, अशी मागणी नगरसेवक महेंद्र निंबार्ते, शमीम शेख, धर्मेंद्र गणवीर, पृथ्वी तांडेकर, सचिन घनमारे, डॉ.विनोद भोयर, प्रसन्न चकोले, अजय गडकरी, मनोज बागडे, इम्रान पटेल, दिलीप देशमुख, मुकुंद साखरकर, मोहीस कुरेशी यांनी केली. (जिल्हा प्रतिनिधी)