पीकविम्यासाठी राज्यात ५६ लाख ८७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:23 IST2021-07-19T04:23:00+5:302021-07-19T04:23:00+5:30
भंडारा : पावसाने अद्यापही जोर धरला नसल्याने राज्यातील काही भागात शेतकऱ्यांवर संकट घोघावत आहे. अशा स्थितीत शेतकरी पीकविमा काढण्याकडे ...

पीकविम्यासाठी राज्यात ५६ लाख ८७ हजार शेतकऱ्यांचे अर्ज
भंडारा : पावसाने अद्यापही जोर धरला नसल्याने राज्यातील काही भागात शेतकऱ्यांवर संकट घोघावत आहे. अशा स्थितीत शेतकरी पीकविमा काढण्याकडे मोठ्या प्रमाणात वळले आहेत. पंतप्रधान पीक विमा योजनेत राज्यातील ३४ जिल्ह्यातील ५६ लाख ८७ हजार ४५७ शेतकऱ्यांनी खरीप पिकाचा विमा उतरविला आहे. ३२ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचा विमा काढण्यात आला असून त्या पोटी २८३ काेटी रुपये भरण्यात आले आहे.
पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांनी धान, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, भुईमूग, कांदा, तीळ पिकांचा विमा उतरवला आहे. पीकविमा योजनेत कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी व्हायचे असल्यास नोंदणीच्या अंतिम दिनांकाच्या सात दिवस आधी बँकेत स्वतःचे घोषणापत्र सादर करणे आवश्यक आहे. राज्यात सर्वाधिक लातूर विभागातील २५ लाख ४३ हजार २९४ शेतकऱ्यांनी १४ लाख ९८ हजार ४८५ हेक्टरसाठी तर औरंगाबाद विभागात १६ लाख ९३,६४२ शेतकऱ्यांनी ६ लाख ७९ हजार ४९८ हेक्टरसाठी विमा काढला आहे. त्याखालोखाल अमरावती विभागात ७ लाख ७४४७ शेतकऱ्यांनी ६ लाख २० हजार ८२४ हेक्टरसाठी तर पुणे विभागात ३ लाख २४,३०२ शेतकऱ्यांनी २ लाख २० हजार ३६६ हेक्टर, नाशिक विभागात १ लाख ६५ हजार २७९ शेतकऱ्यांनी १ लाख २९ हजार ३४१ हेक्टर, नागपूर विभागातील ९८ हजार ८८९ शेतकऱ्यांनी ५९ हजार ५६५ हेक्टर, तर कोकण विभागात ७०, ७८५ शेतकऱ्यांनी २८ हजार ६८१ हेक्टर, तर सर्वाधिक कमी कोल्हापूर विभागात केवळ २० हजार ८१९ शेतकऱ्यांनी ११ हजार १२१ हेक्टरसाठी पीक विमा उतरवला आहे. ही आकडेवारी १६ जुलैपर्यंतची आहे. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत २३ जुलै २०२१ पर्यंत वाढवल्याने राज्यातील हा आकडा आणखी आठ दिवसात वाढणार आहे. विमा हप्त्याची रक्कम ७६० रुपये प्रति हेक्टर असून विमासंरक्षण ३८ हजार रुपये प्रति हेक्टर आहे. सोयाबीन पिकासाठी विमा हप्त्याची रक्कम प्रति हेक्टर ५५० रुपये असून विमा संरक्षण २७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टर आहे.
बॉक्स
नागपूर विभागात भंडारा आघाडीवर
नागपूर विभागात खरीप हंगामातील पीक विमा योजनेत भंडारा जिल्हा आघाडीवर आहे. जिल्ह्यातील ४६ हजार ३९ शेतकऱ्यांनी २० हजार ६५५ हेक्टरसाठी पीक विमा उतरवला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील २१ हजार १० शेतकरी, चंद्रपूर जिल्ह्यातील १७ हजार ५८५ शेतकरी, गोंदिया जिल्ह्यातील ५ हजार ९२५, नागपूरमधील ४ हजार ८०६ आणि वर्धा जिल्ह्यातील ३५२४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे.
कोट
भंडारा जिल्हा धान पिकासाठी प्रसिद्ध आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचा सहभाग वाढला आहे. शासनाने २३ जुलैपर्यंतची मुदतवाढ दिली आहे आहे. ज्या शेतकऱ्यांना विमा योजनेत यापूर्वी सहभागी होता आले नाही, त्यांनी २३ जुलैपर्यंत पीकविमा योजनेचे अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा.
- हिंदुराव चव्हाण, जिल्हा कृषी अधीक्षक, भंडारा