सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू
By Admin | Updated: March 24, 2015 00:11 IST2015-03-24T00:11:10+5:302015-03-24T00:11:10+5:30
जिल्ह्यात मागील सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू
देवानंद नंदेश्वर भंडारा
जिल्ह्यात मागील सहा वर्षात ४८५ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. सन २००९ मध्ये सर्वात अधिक १०८ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. सहा वर्षाची आकडेवारी लक्षात घेतली असता जिल्ह्यात ७ हजार ६४६ रुग्ण या आजाराने बाधीत झाले. यातील ५ हजार २०६ रुग्ण औषधोपचारानंतर सुधारित झाली.
क्षयरोग हा एक जीवघेणा आजार म्हणून प्राचिन काळापासून प्रचलीत आहे. मात्र आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात या आजारावर प्रभावी औषधी उपलब्ध झाली. भंडारा जिल्ह्यात ८ एप्रिल २००२ पासून सुधारित क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या अंतर्गत दोन थुंकी (ठसे) तपासून आजाराचे निश्चित निदान करण्यात येते. ही तपासणी विनामूल्य असते. जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा, उपजिल्हा रुग्णालय साकोली, तुमसर, ग्रामीण रुग्णालय पवनी, मोहाडी, लाखांदूर, सिहोरा, अड्याळ, पालांदूर. प्राथमिक आरोग्य केंद्र शहापूर, लाखनी, जांब, गोबरवाही, कोंढा, सानगडी या ठिकाणी क्षय आजाराचे निदान करण्यात येते. मागील सहा वर्षांची आकडेवारी लक्षात घेता सन २०१३ मध्ये १०५ क्षयरुग्णांचा मृत्यू झाला. याची टक्केवारी ०८.०५ एवढी आहे. यावर्षी मार्च महिन्यापर्यत ३२० रुग्ण क्षयरोगाने बाधित असल्याचे आढळून आले. सन २०१२ मध्ये सर्वाधिक १,४०६ रुग्ण बाधित झाले.
जागतिक आरोग्य संघटनेने यावर्षी क्षयरुग्णापर्यत पोहचण्यात मिळून सगळे एकत्र, निदान उपचार आणि काळजी हेच सर्व क्षयरुग्णांना बरे करण्याचे सुत्र' असे घोषवाक्य दिले आहे.
क्षयरोग दिनी येथील सार्वजनिक वाचनालयात सकाळी १० वाजता आजाराविषयी माहिती देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे.
१०७ अतिसंसर्गजन्य क्षयरुग्ण
डॉट्सचा औषधोपचाराचा कालावधी वर्षभराचा असल्यामुळे सन २०१४ मध्ये रुग्ण शोधण्यात आलेल्या क्षयरुग्णांचा 'आऊट कम' मार्च २०१५ पर्यंत येईल. जिल्ह्यात २००७ पासून अतिसंसर्गजन्य (एमडीआर टी.बी.) क्षयरुग्णांना औषधोपचार सुरू करण्यात आला. आजपर्यंत १०७ अतिसंसर्गजन्य क्षयरुग्णांचे निदान झाले. यातील ९२ रुग्णांवर या आजाराचा औषधोपचार सुरू करण्यात आला. यापैकी आजपर्यंत २२ रुग्णांमध्ये सुधारणा झाली आहे.