२० गावांसाठी १२७१ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 21:24 IST2018-07-25T21:23:51+5:302018-07-25T21:24:33+5:30
मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार अभियानाकडे पाहिले जाते. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येकी २० गावांप्रमाणे १४० गावांची निवड जलयुक्त शिवारासाठी झाली. मोहाडी तालुक्यात निवड झालेल्या २० गावांसाठी सहा विभागांच्या यंत्रणांमार्फत १२७१.८५ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन पूर्ण झाले. सदर कामांचे प्रस्ताव आराखडे वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले असून मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.

२० गावांसाठी १२७१ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन
युवराज गोमासे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
करडी (पालोरा) : मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार अभियानाकडे पाहिले जाते. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येकी २० गावांप्रमाणे १४० गावांची निवड जलयुक्त शिवारासाठी झाली. मोहाडी तालुक्यात निवड झालेल्या २० गावांसाठी सहा विभागांच्या यंत्रणांमार्फत १२७१.८५ लाखांच्या ३४५ कामांचे नियोजन पूर्ण झाले. सदर कामांचे प्रस्ताव आराखडे वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आले असून मजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.
जलयुक्त शिवार अभियानाच्या २०१५ पासूनच्या वाटचालीत आतापर्यंत एकाच वेळी १४० गावांची निवड होण्याची ही पहिलीच वेळ आहे. यावर्षी प्रत्येक तालुक्यातील २० गावांचा समावेश जलयुक्त शिवार प्रोजेक्टमध्ये करण्यात आला. मोहाडी, तुमसर, लाखनी, साकोली, लाखांदूर, पवनी आदी तालुक्यातील प्रत्येकी २० गावांत जलसंधारणांच्या कामांचा धडाका पहायला मिळणार आहे. २०१९ निवडणुकीचे वर्ष असल्याने अधिक गावांना या प्रकल्पात समाविष्ट केले असल्याचे बोलले जात आहे.
मोहाडी तालुक्यातील २०१६-१७ मध्ये टंचाई घोषित व ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावांची निवड व कामांचे नियोजन आराखडे तयार करण्यात आले. ३४५ कामांच्या माध्यमातून ३४६ हेक्टर क्षेत्रावर १,१०६ टीसीएम पाणी साठा उपलब्ध होणार आहे.
निवड झालेली गावे
निवड झालेल्या गावांमध्ये बोंद्री, धुसाळा, टाकळी, सिरसोली, रोहा, पाचगाव, सिहरी, जांभोरा, नेरला, वरठी, देव्हाडा खुर्द, केसलवाडा, सालेबर्डी, मोहगाव देवी, किसनपूर, लेंडेझरी, निलज बुज, निलज खुर्द, एलकाझरी, बिटेखारी आदींचा समावेश आहे.
कृषी विभाग मोहाडी
मोहाडी कृषी विभागामार्फत नियोजित आराखड्यांमध्ये भातखचरे १२ कामे, भातखचरे पुनर्जिवन ६४, शेततळे ३५, मातीचे नाला बांध २, बोडी नुतनीकरण ११, सिमेंट नाला बांध २४, सिमेंट नाला बांध दुरूस्ती ९, वळण बंधारा ४, वळण बंधारा दुरूस्ती ३, नाला खोलीकरण ५२ अशा एकूण २१७ काम यांचा समावेश आहे. ४४७, ९८ लाखांचा खर्चाचा लक्षांक असून २६७.२ हेक्टर मध्ये ५४२.४६ पाणीसाठा उपलब्ध होणार.
जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभाग
या विभागामार्फत सिमेंट नाला बांध १७, कोल्हापूरी बंधारे दुरूस्ती व खोलीकरण १, मामा तलाव दुरूस्ती व खोलीकरण १०, ल.पा. तलाव दुरूस्ती ६, पाझर तलाव दुरूस्ती २, अशा एकूण ३६ काम यांचे आराखडे तयार करण्यात आले आहेत. या कामांवर ६४८.७७ लाखांचा खर्च तर ४८१ टी.सी.एम. पाणी साठा करण्याचा लक्षांक आहे.
जलसंधारण व वन विभाग
जलसंधारण विभागामार्फत साठवण बंधारा बांधकाम ३, मामा तलाव दुरूस्ती १ असे एकूण ४ कामांचे नियोजन आहे. यावर १००.८ लाखांचा निधी खर्च अपेक्षित असून ३७.७९ टी.एम.सी. पाणी साठा उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. वनविभागामार्फत पाणी साठवण तलाव ४, डीपीसीसीटी. ७, बोडी खोलीकरण १, नवीन बोडी १, सिमेंट बंधारा १ आदी १४ कामांचा समावेश आहे. यावर ४१.७३ लाखांचा निधी खर्च अपेक्षित असून ४२.१६ टीसीएम पाणी साठा उपलब्ध होणार आहे.