३४१ शाळा 'किचन शेड'विना
By Admin | Updated: September 21, 2014 23:44 IST2014-09-21T23:44:52+5:302014-09-21T23:44:52+5:30
अपघात टाळता यावी, यासाठी शासनाने सर्व शाळांमध्ये 'किचन शेड' बांधण्याचे आदेश दिले. यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेचे भोजन तयार करण्यासाठी

३४१ शाळा 'किचन शेड'विना
अपघाताची शक्यता : अग्निशमन यंत्रांचा अभाव, विद्यार्थ्यांना सहन करावा लागतो त्रास
प्रशांत देसाई - भंडारा
अपघात टाळता यावी, यासाठी शासनाने सर्व शाळांमध्ये 'किचन शेड' बांधण्याचे आदेश दिले. यासाठी सर्व शिक्षा अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेचे भोजन तयार करण्यासाठी फायबरचे किचन शेड बनविण्यात आले. मात्र जिल्ह्यातील ३४१ शाळांमध्ये अजूनही किचन शेड बांधण्यात आले नाही. शाळेत अपघात झाल्यास त्यावर नियंत्रण मिळविता यावे यासाठी अग्निशमन यंत्रही नसल्याची गंभीर बाब उघडकीला आली आहे.
जिल्ह्यात १ हजार ३२६ शाळा असून त्यापैकी ९४५ शाळांमध्ये फायबरचे किचन शेड बनविण्यात आले आहे. उर्वरित ३४१ शाळांमध्ये किचन शेड नसल्याने तिथे आजही शाळांमधील वर्ग खोल्यांमध्येच किंवा वर्गाच्या बाजूला मध्यान्ह भोजन बनविण्यात येत आहे. यामुळे भोजन बनविताना निर्माण होणारा धुळ किंवा आगीच्या ज्वाळांचा त्रास विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे. एखाद्यावेळेस मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्र व राज्य शासनाने शाळाबाह्या विद्यार्थ्यांची संख्या कमी व्हावी, यासाठी अनेक योजना अस्तित्वात आणल्या आहेत. विद्यार्थी रोज शाळेत यावे व विद्यार्जन करावे, यासाठी शासनाने काही दिवस विद्यार्थ्यांना दुध, केळी व अंडे देण्याची योजना अस्तित्वात आणली होती. त्यानंतर खिचडी देण्यात आली.
कालांतराने योजनेत बदल करून मध्यान्ह भोजन योजना सुरू करण्यात आली. यात विद्यार्थ्यांना आठवडाभर पालेभाज्या व कडधान्याचा पोष्टिक व सकस आहार देण्यात येत आहे. हा सकस आहार बनविण्याचे काम सुरूवातीला शाळा व शाळा व्यवस्थापन कमिटीच्या माध्यामातून बनविण्यात येत होता. मात्र त्यानंतर मध्यान्ह भोजन बनविण्याचे काम महिला बचत गटांना देण्यात आले.
मध्यान्ह भोजन बनविण्यासाठी शाळेजवळ वेगळी व्यवस्था नसल्याने ते शाळेतीलच वर्ग खोलीत बनविल्या जात होता. केरळ येथील एका शाळेत मध्यान्ह भोजन योजनेचे भोजन शाळेतील वर्ग खोलीत बनविण्यात येत असताना मोठी दुर्घटना घडली. यात शाळेतील अनेक विद्यार्थ्यांना आपले प्राण गमवावा लागला.
यामुळे प्रशासन जागे झाले. त्यानंतर प्रशासनाने मध्यान्ह भोजन वर्ग खोल्यांमध्ये न बनविता त्यासाठी वेगळे 'किचन शेड' देण्याचे ठरविण्यात आले. सर्व शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशभरात किचन शेड बनविण्याचे काम कंत्राटदारांना देण्यात आले.
भंडारा जिल्ह्यातही किचन शेड बनविण्याचे काम कंत्राटदारांच्या माध्यमातून करण्यात आले. मात्र अजूनही ३४१ शाळा किचन शेडपासून वंचित आहे. जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये किचनचा अभाव दिसून येत आहे. तर जिथे किचन शेड उभारण्यात आले तिथे त्याचा वापर अल्पश: प्रमाणात करण्यात येत आहे. किचन शेडचा वापर करण्यात येत नसल्याने जिल्ह्यातील एखाद्या शाळेत मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या गंभीर बाबीकडे जिल्हा प्रशासन, शाळा व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे.