जिल्ह्यातील ३२ हजार व्यक्तींनी अखेर कोरोनाला हरवून दाखवलेच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:35 IST2021-04-25T04:35:21+5:302021-04-25T04:35:21+5:30
भंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे; परंतु पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे ...

जिल्ह्यातील ३२ हजार व्यक्तींनी अखेर कोरोनाला हरवून दाखवलेच
भंडारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना सर्वांच्या मनात भीती निर्माण होणे साहजिक आहे; परंतु पाॅझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. त्या आकड्यांकडे कधीच लक्ष जात नाही. भंडारा जिल्ह्यात आतापर्यंत ३१ हजार ९४८ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. खऱ्या अर्थाने त्यांनी कोरोनाला हरविले आहे.
भंडारा जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण २७ एप्रिल २०२० रोजी आढळला. त्यानंतर अत्यंत संथगतीने रुग्णांची संख्या वाढत गेली. महिनाभरात रुग्णांची संख्या वेगाने वाढली असली तरी त्याच वेगाने कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख १० हजार ७५० व्यक्तींनी कोरोना चाचणी केली. त्यापैकी २ लाख ६६ हजार ७९७ व्यक्ती निगेटिव्ह आढळून आल्या, तर ४३ हजार ९५३ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळल्या आहेत. नकारात्मक विचार सोडन सकारात्मक विचार केल्यास कोरोनावर मात करता येते. हा कोरोनामुक्त झालेल्या जिल्ह्यातील अनेकांचा अनुभव आहे. कोरोना झाला तरी घाबरून न जाता योग्य उपचार केले, तर अवघ्या १५ दिवसांत ठणठणीत बरे होता येते.
जिल्ह्याचा पाॅझिटिव्हिटी रेट झाला कमी
जिल्ह्यात सध्या पाॅझिटिव्हिटीचा रेट १४.१४ टक्के आहे. पाॅझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याचे दिसते.
कोरोनाच्या संसर्गाने सर्वच जण भयभीत दिसत आहेत. कोरोना झाल्यास आपल्यावर योग्य वेळी उपचार होतील काय, अशी अनेकांच्या मनात शंका निर्माण होत आहे. मात्र, भंडारा जिल्ह्यात खासगी आणि शासकीय रुग्णालयामध्ये पुरेशी व्यवस्था असून, कोविड केअर सेंटरमध्येही योग्य मार्गदर्शन केले जाते.
क्वारंटाइन काय असते, हे अवघ्या १४ दिवसांत चांगलेच कळले. कोविड केअर सेंटरमध्ये असतानाही हे दिवस कसे संपतील याचीच प्रतीक्षा होती. नकारात्मक येणाऱ्या वार्ता मनावर न घेता सकारात्मक दृष्टिकोनातून प्रत्येकानेच विचार करायला हवा. कोरोनाला हरविण्यासाठी मानसिकरीत्याही सक्षम असणे अत्यंत गरजेचे आहे, असेच मला वाटते. औषधांचे सेवन नियमित करावे. मात्र, सामाजिक जाणिवेची जाण कधीही विसरू नये, तरच आपण तग धरू शकतो.
-महेश गणवीर, कोरोनामुक्त
सातत्याने वाढत असलेले आकडे मनाला भेडसावून सोडत होते. मनात भीती येऊ दिली नाही. मन खचले तरी आप्तस्वकीयांशी फोनवर चार वेळा बोललो. आपल्यांचा धीर खूप बळ देऊन गेला. कोविड ब्लाॅकमध्ये घडणाऱ्या घटनांनी आपल्यासोबतही असेच होणार, ही भावना कधीही बाळगू नये. आपल्या डाॅक्टरांवर व उपचारावर विश्वास ठेवा. कोरोनाला हरविणे थोडे कठीण असले तरी अशक्य बाब नाही. सध्या मी स्वस्थ असून आताही सातत्याने काळजी घेत आहे.
-यादोराव तोंडरे, कोरोनामुक्त
कोरोना आता पूर्णत: सायकोसीस झाला आहे. नागरिकांनी मनात आता कुठलीही भीती न बाळगता उपचाराला सामोरे जावे. कोरोनाला हरविण्यासाठी मानसिकरीत्या सक्षम होण्याची खरी गरज आहे. अमका व्यक्ती कोरोनाने दगावला यापेक्षा आपण किती लवकर बरे होऊ, असाच विचार सातत्याने आपल्या मनावर बिंबवायला हवा.
-डाॅ. रत्नाकर बांडेबुचे,
मानसोपचारतज्ज्ञ, भंडारा