सिहोरा येथे ३० हजार क्विंटल धान उघड्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:36 AM2021-04-09T04:36:54+5:302021-04-09T04:36:54+5:30
चुल्हाड ( सिहोरा ) : भरडाईसाठी धानाची उचल झाली नसल्याने तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गोडाऊन फुल्ल झाले आहेत. ...
चुल्हाड ( सिहोरा ) : भरडाईसाठी धानाची उचल झाली नसल्याने तुमसर तालुक्यातील सिहोरा परिसरातील गोडाऊन फुल्ल झाले आहेत. परिणामी ३० हजार क्विंटल धानाचे पोती गोडावून बाहेर उघड्यावर पडून आहेत. यामुळे उन्हाळी धानाची खरेदी करताना केंद्रांना संकटांना सामोरे जाण्याची पाळी येणार आहे. त्यातच हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने केंद्रचालक संकटात सापडले आहे.
वैनगंगा, बावनथडी नद्याचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरात धानाचे प्रमुख पीक घेतले जाते. १८ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. त्यामुळे डझनभर शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राना मंजुरी देण्यात येत आहेत. यासाठी खासगी गोडाऊन, ग्रामपंचायतच्या हद्दीतील सभामंडप, घरे, खुले मैदान विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थाचे गोडाऊन उपयोगात आणले जात आहेत. गोडाऊनमध्ये असणाऱ्या धानाची उचल करण्यात आली नसल्याने गोडाऊन रिकामे झाले नाहीत. प्रत्येकी २ ते ३ किमी अंतरावर धानाचे पोती पडून आहेत. धान गोडाऊन फुल्ल झाल्यानंतर आधारभूत केंद्रांनी धानाची खरेदी बंद केली होती. परंतु ऑनलाइन सातबारा उतारे झाले असताना धान खरेदी प्रक्रिया थांबविण्यात आल्याचे कारणावरून शेतकऱ्यांनी गोंधळ घातले होते. यानंतर पुन्हा गावांत धानाचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. धानाची खरेदी प्रक्रिया खुल्या आभाळात सुरु करण्यात आली आहे. एका केंद्रावर ३० ते ४० हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. ही पोती खुल्या मैदानात ठेवण्यात आल्याने अवकाळी पावसापासून पोत्यांना सुरक्षित करण्यासाठी ताडपत्रीचा आधार देण्यात आलेला आहे. खरेदी केंद्राबाहेर पोती असल्याने उन्हाळी हंगामातील धानाचे पोती सुरक्षित करताना अडचणी येणार आहेत. या खरेदी प्रक्रियामध्ये पावसाळा सुरू होत असल्याने नुकसान सहन करावा लागत आहे. येत्या दोन महिन्यांत उन्हाळी धान खरेदी केंद्र सुरू करावे लागणार आहे. यामुळे पूर्व तयारी सुरू करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.
बॉक्स
अनेक शेतकरी धान विक्रीला मुकले
धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आल्यानंतर अडचणीचा सामना करावा लागला आहे. कधी बारदान्याचा अभाव, तर ऑनलाइन सातबाराची अडचण येत होती. खरेदीप्रक्रिया ३१ मार्चला बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन सात बारा झालेल्या शेतकऱ्यांचे धान खरेदीकरिता मुदतवाढ देण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांत संताप निर्माण झाला आहे. भाजपचे किशोर राहगडाले, विकास बिसने, योगराज टेंभरे, भाजयुमोचे विनोद पटले, आनंद कटरे, भाऊराव शहारे, नितेश पटले, हिरकण पटले, किरण पटले, गजेंद्र भगत, मंगल बिसने, मालू कटरे, चित्रकला पटले, मनोज टेंभरे यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
कोट
१० फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत शेतकऱ्यांचे धानाचे कोट्यवधीचे चुकारे अडले आहेत. शेतकरी वारंवार विचारणा करीत आहेत. याशिवाय खरीप हंगामातील धानाने गोडाऊन फुल्ल असून, बाहेरील मैदानात धानाचे पोती असल्याने उन्हाळी धान खरेदी करताना डोक्याला ताप आल्याशिवाय राहणार नाही. शासनाने तत्काळ मार्ग काढले पाहिजे.
गंगादास तुरकर
अध्यक्ष, दि सहकारी राइस मिल, सिहोरा