प्रकल्पांत २७ टक्के जलसाठा
By Admin | Updated: June 3, 2014 23:51 IST2014-06-03T23:51:22+5:302014-06-03T23:51:22+5:30
उन्हाळ्याची दाहकता वाढली असून जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास

प्रकल्पांत २७ टक्के जलसाठा
जलस्तरात घट : वैनगंगा नदीपात्रात मात्र मुबलक जलसाठा
भंडारा : उन्हाळ्याची दाहकता वाढली असून जिल्ह्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. जिल्ह्यातील लघु, मध्यम व माजी मालगुजारी तलावात पाण्याचा अल्प साठा आहे. शासनाच्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरण क्षेत्रात येणार्या लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात सरासरी केवळ २७.५८ टक्के पाण्याचा उपयुक्त साठा आहे. मागील हंगामात सरासरीपेक्षा अधिक पाऊस बरसला. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत जलसाठय़ात १७ टक्क्यानी वाढ झालेली आहे.
लघुपाटबंधारे विभागांतर्गत भंडारा जिल्ह्यात चार मध्यम प्रकल्प आहेत. यात तुमसर तालुक्यातील चांदपूर, बघेडा, मोहाडी तालुक्यातील बेटेकर बोथली आणि सोरना प्रकल्पाचा समावेश आहे.
सध्यस्थितीत चांदपूर मध्यम प्रकल्पात पाण्याची उपयुक्त टक्केवारी २0.४९, बघेडा ९१.८0, बेटेकर बोथली ३६.५८ आणि सोरना जलाशयात उपयुक्त जलसाठा २६.५९ टक्के आहे.
जिल्ह्यात एकूण ३१ लघु प्रकल्प आहेत. जुने माजी मालगुजारी तलावांची संख्या २८ आहे. सध्यस्थितीत ३१ लघु प्रकल्पात उपयुक्त जलसाठा २३.१२ टक्के आहे. माजी मालगुजारी तलावात पाण्याचा जलसाठा २४.४४ टक्के आहे.
जिल्ह्यातील ३१ लघु प्रकल्पांमध्ये तुमसर तालुक्यातील कुरघडा, कवलेवाडा, पवनारखारी, आंबागड, परसवाडा, डोंगरला, कारली. मोहाडी तालुक्यातील नागठाणा, टांगा, हिवरा. भंडारा तालुक्यातील आमगाव, मंडनगाव, डोडमाझरी, मालीपार, चिखलपहेला, रावणवाडी, सिल्ली आंबाडी.
पवनी तालुक्यातील वाही, भिवखिडकी, कातरुली, पिलांद्री, साकोली तालुक्यातील शिवणीबांध, कुंभली, गुढरी लाखांदूर तालुक्यातील सालेबर्डी तर लाखनी तालुक्यातील भूगाव मेंढा, मुरमाडी हमेशा, रेंगेपार कोठा, न्याहारवानी, वाकल, खुर्शिपार या प्रकल्पांचा समावेश आहे. गोसखुर्द धरणाचे पाणी अडविण्यात आले असल्याने वैनगंगा नदीपात्रात पाण्याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. असे असले तरी शहरातील नागरीकांना पाण्याची टंचाई भासत आहे.
जिल्ह्यातील एकूण ६३ प्रकल्पात केवळ २७.५८ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा आहे. गतवर्षी दि. ३ जून रोजी ६३ प्रकल्पात १२.५७२ दश लक्ष घन मीटर पाण्याचा उपयुक्त साठा होता. त्याची टक्केवारी १0.३३ एवढी होती. जिल्हय़ातील अनेक प्रकल्पांमध्ये पाण्याचा अल्प साठा आहे. त्यामुळे जनावरांसाठी तसेच वन्य प्राण्यांसाठी धोक्याची घंटा निर्माण झाली आहे. (नगर प्रतिनिधी)