धानाचे १११ कोटींचे चुकारे थकीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 06:00 AM2020-02-28T06:00:00+5:302020-02-28T06:00:13+5:30
इंद्रपाल कटकवार। लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी ...
इंद्रपाल कटकवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : धानाचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात बळीराजाला कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटाला सामोरे जावे लागत आहे. जिल्ह्यात खरीप हंगामांतर्गत ८५ धान खरेदी केंद्र सुरु असून शेतकऱ्यांचे १११ कोटी ५९ लक्ष रुपयांचे चुकारे थकीत आहे. परिणामी बळीराजाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
पावसाच्या उशिरा आगमनानंतर धानपिकही उशिरा निघाले. १ नोव्हेंबर पासून शासनाने धान खरेदी केंद्र सुरु केले. तत्पूर्वी भंडारा जिल्ह्यात फक्त ६३ केंद्र सुरु झाले होते. त्यानंतर मागणीनुसार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असून आता ८४ केंद्रांमधून धानाची खरेदी सुरु आहे. एक केंद्र लवकरच सुरु होणार असल्याचे फेडरेशनने सांगितले आहे. बुधवारपर्यंत ३० हजार ८९६ क्विंटल अ ग्रेड धानाची खरेदी करण्यात आली होती. तर धानाची एकुण खरेदी १९ लक्ष ६ हजार ५६६ क्विंटल करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील एकुण ६१ हजार ४६३ शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी खरेदी केंद्रांवर आणल्याची माहिती मार्केटिंग फेडरेशनने दिली.
यापैकी भंडारा तालुक्यातील २ हजार ७९६, मोहाडी ८ हजार ९४६, तुमसर ११ हजार ९५, लाखनी १० हजार ९८७, साकोली ११ हजार ५२, लाखांदूर १२ हजार ८५६ तर पवनी तालुक्यातील ३ हजार ७३१ लाभार्थी शेतकऱ्यांची संख्या आहे.
यात साधारण धानाची ११ लक्ष ७५ हजार ६७० क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. तालुकानिहाय खरेदी केंद्र सुरु असलेल्या केंद्रांतर्गत भंडारा ६, मोहाडी १५, तुमसर १९, लाखनी १२, साकोली १२, लाखांदूर १४ व पवनी ६ केंद्रांमधून ही खरेदी सुरु आहे.
आधारभूत केंद्रावर धान उघड्यावरच
जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रांवर मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे. एकीकडे बारदाना नसल्यामुळे शेतकऱ्यांना धान विकण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला होता. टोकन मिळाल्यानंतरही बारदान्याअभावी धान्य उघड्यावर ठेवावे लागले होते. त्यातच महिनाभरात चारवेळा अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या समस्येत अधिकच भर पडली. धान ठेवायला गोदामातच जागा नसताना नवीन धान ठेवायचे कुठे असा प्रश्न सर्वांसमोर उपस्थित झाला. मात्र धान खरेदी केंद्रात सुविधा नसल्याने त्याचा सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसला. अवकाळी पावसाने धान ओले झाले. काही ठिकाणी धानाला कोंबही फुटल्याने धान पाखर झाले. पाखर झालेले धान केंद्र खरेदी करीत नाही तर अशा स्थितीत ते धान परतही नेता येत नाही अशी अडचण शेतकऱ्यांसमोर निर्माण झाली.