Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2025 13:52 IST2025-06-18T13:45:48+5:302025-06-18T13:52:38+5:30

Swami Samartha: तारक मंत्र आपण अनेकदा म्हटला असेल पण स्वामींनी कोणत्या अटीवर साथ देण्याची कबुली दिली आहे तेही जाणून घ्या!

Swami Samartha: 'Don't be afraid, I am with you' is the Swami's promise; but there is 'this' one condition! | Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!

Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!

>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक 

खुलभर दुधाच्या गोष्टीत जगातील सगळे अध्यात्म समाविष्ट आहे, असे मला नेहमी वाटते. ह्या गोष्टी आपण लहानपणी आई आज्जी कडून अनेकदा ऐकल्या आहेत आणि त्या आपल्या मनावर खोलवर बिंबल्या आहेत. देव कुठलाही असो अंतर्मनापासून त्याला शरण गेलो तर तो आपल्याला मार्ग दाखवतो.

संसारात, प्रपंचात प्रत्येक पावलावर आव्हान असते, पण म्हणून रोज उठून महाराजांना त्यासाठी साकडे घालणे इष्ट होईल का? ५ नारळाचे तोरण बांधीन, मला हे द्या, लाडूचा प्रसाद वाटीन ते द्या, हे करायची गरज आहे का? मनातील सच्चा भावासाठी ते भुकेलेले आहे. आपणही म्हणतो की मला आयुष्यात खरा मित्र मिळावा, सच्चा दोस्त हीच आपली आयुष्यातील मोठी संपत्ती असते, अगदी तसेच महाराजांना भक्तांचा खरा भाव अपेक्षित आहे.
 
काही मिळावे म्हणून सेवा करायची गरज नाही आणि नेमके हेच आपल्याला समजत नाही. अक्कलकोटला जाण्यासाठी खिशात पैसा नसेल पण मनात भक्ती असेल तर आहात तिथून महाराजांना मनापासून हाक मारली तरी पुरेशी आहे. ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल. तिथे आल्यावर तुझे प्रश्न ऐकून घेतो असे ते अजिबात म्हणणार नाहीत. अक्कलकोटला शरीराने पोहोचलेली व्यक्ती मनाने पोहोचली असेलच असे नाही. महाराजांच्या पायाशी पोहोचणे हे आपले ध्येय पाहिजे, केवळ शरीराने नाही तर मनानेसुद्धा! आपले मन आणि हेतू किती स्पष्ट आहे, त्यानुसार फळ मिळते. नुसते स्वामी स्वामी करून अहंकार जोपासतो आपण. मी अक्कलकोटला जाऊन आलो आणि १०० वेळा तारक मंत्र म्हटला, पण मन अशुद्ध; काय उपयोग आहे त्याचा? महाराजांच्यावर प्रेम अथांग समुद्रासारखे असले पाहिजे , कुठलीही शंका कुशंका नसावी.

एकदा दोन बायका महाराजांच्या कडे गेल्या आणि म्हणाल्या आम्हाला अपत्य नाही. महाराजानी त्यांच्याजवळ एक हाडूक पडले होते ते एका बाईच्या पदरात टाकणार तेवढ्यात तिने पदराची झोळी मागे केली, कारण तिला ते आवडले नाही. पण दुसरीने ते हाडूक प्रसाद म्हणून घेतले आणि तिचे भले झाले. तिला मुल झाले. अशी भक्ती केली पाहिजे . त्यांच्याशिवाय कुठलाच विचार मनात नसावा. त्यांच्याशी एकरूप झाले पाहिजे , तनमन धन अर्पण करून भक्ती भक्ती आणि भक्तीत रमले पाहिजे . 

प्रपंचातून सगळी आसक्ती सोडण्यासाठी अध्यात्म आहे. त्यामुळे महाराजांकडे भौतिक सुखे मागण्याचा प्रश्नच येत नाही. परमार्थाची ओढ महाराजांच्या अस्तित्वात जसजशी जाणवू लागते, तसतसे प्रपंचातून मन मुक्त होत जाते, विरक्ती येते आणि फक्त त्यांच्या चरणाचे सानिध्य हवे इतकेच वाटते. महाराजांच्याकडे सगळा स्वच्छ कारभार आहे. मनात एक ओठात एक पोटात एक त्यांना चालत नाही. आपल्यासाठी महाराजांचे नाव मुखात येणे हे आपले परमभाग्य आहे. महाराज हे अनाकलनीय, असामान्य, अद्वितीय विभूती आहेत.  महाराज समजणे हे आपल्या सामान्य बालबुद्धीच्या पलीकडे असणारी झेप आहे. मागच्या जन्माचे पूर्व सुकृत चांगले म्हणून ह्या जन्मी त्यांचे चरण लाभले आहेत आणि हाच भाव भक्ती करताना असेल तर महाराज तुमच्या नक्कीच जवळ येतील.

अध्यात्म आपल्याला जगवते. सकाळी उठल्यापासून आपण महाराजांचे सानिध्य अनुभवतो आणि त्यांच्याच सानिध्यात राहतो. देव भोळ्या भक्तीचा भुकेला आहे . आपण त्याला उगीचच पेढे बर्फी लाडू ह्यात अडकवून ठेवतो. महाराजांच्या सेवेत असणार्या आणि त्यांच्याच सोबत राहणाऱ्या कुठल्याही भक्ताला त्याच्या प्रश्नाचे उत्तर इतर कुणाला विचारायची आवश्यकताच नाही . आपली स्वतःची साधना उपासना आपले उत्तर निश्चित देणार , देत नसेल तर आपण कुठे कमी पडतो ते शोधले पाहिजे . 

सतत भयभीत राहून चिंता करणे आणि स्वामी स्वामी करणे योग्य नाही. एक काहीतरी करा...भक्ती नाहीतर चिंता. एक क्षण सुद्धा त्यांच्यासाठी आपण पूर्णपणे देत नाही. देव्हाऱ्यासमोर उभे असतो, पण लक्ष कुकरच्या शीटीकडे! प्रपंचातून विरक्त करणारी साधना हवी. आपला सगळा जीव ह्या भौतिक सुखात अडकलेला आहे. माझा चांदीचे भांडे, माझी दुलई , माझे हे आणि माझे ते. इथून काहीही न्यायचे नाही, कारण काही घेऊन आलो नाही तरीही सगळे जमा करण्याचा अट्टाहास असतो. जमवायचेच असेल तर नामस्मरण, अनुभव, प्रचीती ह्याचे गाठोडे करा ते न्यायचे आहे सोबत.

कलियुगात वस्त्राप्रमाणे देव पण बदलले जातात. रोज नवा ज्योतिषी, रोज नवीन उपाय, रोज नवीन गुरु, रोज नवनवीन साधना. कशाचा काही ताळमेळ नाही . कुठे वाहवत चाललो आहोत आपण? आपले आपल्यालाच समजत नाहीय! कुठेही एकाग्रता, सारासार विचारबुद्धी नाही. म्हणून कुठे थांबायचे तेच समजत नाही. दिशाहीन आयुष्य झाले आहे. चिंतेतून बाहेर काढणारे सद्गुरू आहेत पण त्यांच्याकडे काम नसेल तेव्हा बघताय कोण? कधी प्रेमाने त्यांच्या जवळ बसतो का आपण? चार शब्द खुशालीचे महाराज कसे आहात? थंडी वाजतेय का तुम्हाला? आजचा नेवैद्य आवडला का? काहीतरी गोड शब्द बोलतो का आपण? २४ तास सगळ्यांनी आपल्याच दिमतीत राहायचे, जरा मनाविरुद्ध झाले की थयथयाट सुरु. संयम नाही आणि आपणच केलेल्या भक्तीवर आपलाच विश्वास नाही. 

काम धाम सोडून त्यांच्याजवळ बसाल तर हाकलून देतील ते तुम्हाला. शेत पिकवून खा हा त्यांचा आदेश आहे. प्रपंचातील सर्व कर्तव्ये पार पाडून क्षणभर त्यांना द्या पण तो क्षण खरा असावा, त्या क्षणात त्यांना आपलेसे करण्याची ताकद ठेवा. मागणारा भक्त असण्यापेक्षा देणारा हवा. समाजाचे ऋण फेडणारा इतरांसाठी काहीतरी मागणारा, गरजू लोकांना मदत करणारा भक्त हवा . 

अध्यात्म आपल्याला परावलंबी नाही तर आत्मनिर्भर करते. सगळे सोडून जातील पण महाराज नाही हा विश्वास हवा. द्या सगळा संसार, प्रपंच त्यांच्या चरणाशी सोडून...मग बघा ..अंतर्बाह्य अनुभूती ते दिल्याशिवाय राहणार नाहीत. त्यांना हवा आहे तो आपल्या मनातील शुद्ध भाव. 

शरणागत दीनार्त परित्राण परायणे। 
सर्वस्यार्तिहरे देवि नारायणि नमोऽस्तुते॥
 
संपर्क : 8104639230

Web Title: Swami Samartha: 'Don't be afraid, I am with you' is the Swami's promise; but there is 'this' one condition!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.