Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 11:23 IST2025-07-19T11:23:45+5:302025-07-19T11:23:56+5:30
Swami Samartha: दुसऱ्यांना मदत करूनही आपल्या पदरी उपेक्षा येत असेल तर काळजी करू नका, आपला हिशोब स्वामींच्या खात्यात जमा होत आहे, सत्कर्म करत राहा!

Swami Samartha: तुम्ही तुमचे कर्म करा, कोणाला काय फळ द्यायचे ते स्वामी आणि शनी महाराज बघतील!
>> अस्मिता दीक्षित
अनेकदा आपण फार संकुचित वृत्तीने आणि एकाकी विचार करतो. आज सोशल मीडियामुळे किंवा आपल्या व्यक्तिगत अनुभवामुळे आपल्याला विविध क्षेत्रातील ज्ञान प्राप्त होत आहे. पण तरीही आपण बुरसटलेल्या विचारांच्या कोशात जगणे काही सोडत नाही. रोज केलेल्या उपासनांचे दिवसभर ढोल वाजवत राहतो, मी हे केले आणि मी ते केले. पण आपल्यात बदल शून्य आहे. कितीही धार्मिक यात्रा, पारायणे, अभिषेक अनेक गोष्टी केल्या तरी आपला स्वभाव, रागावरील ताबा काही केल्या जात नाही हे कटू सत्य आहे.
जगात सगळ्यांना तुम्ही आवडला पाहिजेत असा नियम नाही, किंबहुना आपल्यालाही अनेक लोक आवडत नाहीत. पण एखाद्याबद्दल हा असाच आहे किंवा हे ह्यांनीच केले असेल, असा पूर्वग्रह करून एखाद्या व्यक्तीकडे किंवा घटनेकडे पाहणे धोकादायक ठरू शकते. ती व्यक्ती खरंच तशी आहे का? किंवा घडलेल्या घटनेत तिचा काहीच सहभाग नसताना आपण केलेला पूर्वग्रह आपलेच मन आणि विचार दुषित करतो आणि त्या व्यक्तीकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन सुद्धा बदलतो, जे सर्वार्थाने चुकीचेच असते. अनेकदा एखादा मुद्दा आवडला नाही तर ती व्यक्ती वाईट असते का? नाही! मुद्दा आहे, त्यात मते भिन्न असू शकतात ,पण व्यक्तीवर राग धरणे वाईट वृत्तीचे लक्षण आहे.
प्रत्येक व्यक्ती आपले प्रारब्ध भोगत आहे, गेल्या अनेक जन्मातील चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब ह्या जन्मात होत आहे म्हटल्यावर, आपल्या आयुष्यातील कुठल्याही गोष्टीसाठी दुसरा कसा काय दोषी असू शकतो? प्रत्येक गोष्टीला आपण स्वतःच जबाबदार असतो, पण सत्य आणि आपलीच कर्म स्वीकारायची ताकद आपल्यामध्ये नसल्यामुळे आपण समोरच्याला दोष देऊन मोकळे होतो.
आपल्या आयुष्यात जे जे काही होतंय त्याची संपूर्ण जबाबदारी आपलीच आहे. हे एकदा मनाशी पक्के झाले की दुसऱ्याला दोष देणे किंवा दुसऱ्याचा कारण नसताना राग करणे, द्वेष मत्सर करणे कमी कमी होईल. दुसऱ्याला जे काही मिळाले किंवा त्याचे आयुष्य जसे आहे उदा. यश, पैसा, कीर्ती मानसन्मान तो आपल्याला जेव्हा मिळत नाही तेव्हा आपण दुसर्याचा द्वेष करायला लागतो . पण हे करून आपण थोडेच श्रीमंत होणार आहोत ? उलट इर्षा , द्वेष , पराकोटीचा मत्सर आपल्याला अनेक आजार आणि मनोविकार मागे लावेल, एका जागी खिळवून ठेवेल आणि मग आयुष्य जगावेसे सुद्धा वाटणार नाही. दुसऱ्याला चांगले म्हणून तर बघा, आपला आणि त्यांचाही दिवस चांगला जाईल.
रोज आपण आपल्याला एकदा आरशात पाहिले पाहिजे, काय मिळवले आपण आज आणि काय गमावले? माझ्या मुलाला काही फार चांगले मार्क मिळणार नाहीत हा पूर्वग्रह कदाचित मुलाला खरंच जास्त मार्क न मिळायला कारणीभूत ठरू शकतो. आपल्या विचारांवर आपले आयुष्य स्वार आहे.
एखाद्या व्यक्तीकडे अनेक उत्तम गुण असतात, पण त्याचा उपयोग व्यक्ती आर्थिक दृष्टीने सक्षम होताना दिसत नाही, ह्याचे हेच कारण आहे. दुसऱ्याबद्दल पूर्वग्रह, द्वेष आणि मत्सर, हेवेदावे. अनेकदा अशा व्यक्ती कटपुतली असतात, त्यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच असतो, कोण आपल्याला चढवतो आहे, आपल्या खांद्यावर बंदूक ठेवतो आहे हे समजत नाही आणि शत्रू निर्माण करून घेतात. स्वतःच्या बुद्धीचा वापर आज माणसाने सर्वप्रथम आर्थिक सुबत्तेसाठी केला पाहिजे, मग दुनियादारी. आपले आयुष्य स्थिरावले आहे का? वेळ कुठे आहे आपल्याला नको त्या उचापती करायला? पण अनेकांनी ह्याच गोष्टीसाठी आपले आयुष्य वाहून घेतलेले असते. असो!
पत्रिकेतील लग्नबिंदू, लग्नराशी आणि लग्नातील ग्रह आपली सोच ठरवतात. लग्न अंशाच्या जवळ असणारे ग्रह जोरदार फळे देताना दिसतात. माणसाने दुसऱ्यांच्या आयुष्याची बरोबरी करायला जाऊ नये आणि ती केली तर दुःखच पदरात येईल. जे आहे त्यात आनंदी, समाधानी असावे आणि आजचा दिवस कालच्या पेक्षा कसा अधिक चांगला होईल ते पाहावे. कद्रू संकुचित मनोवृत्तीतून बाहेर येण्यासाठी प्रचंड वाचन वाढवावे आणि जितकी इतरांना मदत करता येईल तितकी करावी.
आपल्या जीवनातील कुठल्याही गोष्टीला दुसरा जबाबदार असूच शकत नाहीत. जे काही पदरात पडलेले आहे ते आपल्याच पूर्व कर्माचे फळ आहे त्यामुळे दुसऱ्याला दोष देणे आणि त्यावर राग धरणे बंद केले तर आयुष्य सर्वार्थाने सुखी होईल आणि मोठ मोठी आजारपणे टळतील ह्यात दुमत नसावे.
अनेक व्यक्तींचे उत्तम योगदान आपल्या आणि इतरांच्याही आयुष्यात असते, पण ते मोठ्या मानाने मान्य तरी करतो का आपण? नाही. मग करत असलेल्या उपासना गेल्या तरी कुठे म्हणायच्या? अध्यात्मात राहून शिकलो तरी काय आपण? एखादी पोस्ट आवडत असूनही आपण त्याला लाईक करत नाही करणार कारण पुन्हा तेच संकुचितपणा इर्षा, असूया .लिहिणारी व्यक्ती आपल्याला आवडत नसते. पण त्या व्यक्तीचे विचार उत्तम असतील तर? महत्वाचे काय? ज्ञान की व्यक्ती?
माणसे वापरा आणि फेकून द्या, अशी वृत्ती असणाऱ्या लोकांची आयुष्याची संध्याकाळ कशी असेल ते शनी महाराज ठरवतील. माझे सगळ्यांनी कौतुक केले पाहिजे, पण इतरांचे मात्र बघवत नाही, इतकी घाणेरडी मने आणि वृत्ती, कसा असेल आयुष्याचा शेवट?
व्यक्ती, आपल्या आवडी निवडी, समाज, आयुष्य, सृष्टीसुद्धा रोज प्रत्येक क्षणाला बदलत आहे, तिथे एखाद्या व्यक्तीबद्दलचा मनात असलेला “पूर्वग्रह'' खरंच योग्य आहे का? विचारा स्वतःच्याच मनाला! अनेक चांगल्या व्यक्ती अशा विचारांनी आपल्या आयुष्यातून निघून जात आहेत. आपल्या उपासना भक्कम करा, त्या सदोष असू नयेत, निरपेक्ष प्रेमाने महाराजांचे व्हा. कमकुवत मनाला त्यांचे नामस्मरण नक्कीच बळकटी देवू शकेल. चला तर बदल करूया ...कुणामध्ये ? अर्थात स्वतःमध्ये आणि स्वतःच्या विचारांमध्ये!
संपर्क : 8104639230