Shravan Durva Ganpati Vrat 2025: श्रावण महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. श्रावणातील व्रते-सण-उत्सव यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावण महिना जेवढा सांस्कृतिक, धार्मिकदृष्ट्या अतिशय विशेष ठरतो, त्याचप्रमाणे श्रावणातील व्रतांमध्ये निसर्गचक्र, आरोग्य, शास्त्र यांचाही विचार केलेला पाहायला मिळतो. भारतीय परंपरेत केली जाणारी व्रते अधिक डोळसपणे केली, तर त्याचे वैशिष्ट्य लक्षात येऊ शकते. श्रावणातील प्रत्येक दिवसाला आणि प्रत्येक व्रताचे महत्त्व, महात्म्य अधोरेखित होणारे आहे. आपल्या पूर्वजांनी अगदी विचारपूर्वक व्रतांचे नियम, आचरण पद्धत नेमून दिलेली आहे. या सगळ्याचा सुरेख संगम श्रावणात येणाऱ्या दूर्वागणपती व्रतात पाहायला मिळतो. दूर्वागणपती व्रत नेमके का आहे? दूर्वागणपती व्रत का करतात? जाणून घेऊया...
सोमवार, २८ जुलै २०२५ रोजी श्रावण शुद्ध चतुर्थी आहे. याच दिवशी विनायक चतुर्थीचे व्रताचरण केले जाते. विनायक चतुर्थी व्रतासह दूर्वागणपती व्रत केले जाते. दूर्वागणपती व्रत दोन, तीन अथवा पाच वर्षे केले जाते. श्रावणात शुद्ध चतुर्थीला व्रतारंभ करून पुढील सहा महिने प्रत्येक शुद्ध चतुर्थीला अशीच पूजा करून माघ शुद्ध चतुर्थीला व्रताचे उद्यापन केले तरी चालते. या व्रताच्या उद्यापनावेळी पिठाचे तुपात तळलेले अठरा मोदक लागतात. या अठरा मोदकांचा नैवेद्य गणपतीला दाखवून त्यातील सहा मोदक गणपतीसमोर ठेवावेत; उरलेल्या मोदकांपैकी सहा मोदक इतरांना द्यावेत. उरलेले सहा मोदक व्रतकर्त्याने स्वतः खावे. सर्व मनोरथ पूर्तीसाठी हे व्रत करतात. विशेष म्हणजे या व्रतामध्ये सहा दूर्वांप्रमाणेच गणपतीला सहा नमस्कार आणि सहा प्रदक्षिणा घालणे आवश्यक मानले आहे.
श्रावणातील दूर्वागणपती व्रत कसे करतात?
श्रावणात दूर्वा भरपूर उगवतात. तसेच इतर सर्व पत्री, फुले सहज मिळू शकतात. दूर्वागणपती व्रत फारसे अवघड नाही. व्रतकर्त्याने सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. सर्वतोभद्र मंडल रेखाटावे. त्यावर कलश ठेवून त्यावरील पूर्णपात्रात दूर्वा पसरवून त्या दूर्वांवर गणेशाच्या मूर्तीची स्थापना करावी. पूजेसाठी नित्यपूजेतील मूर्तीदेखील चालू शकेल. लाल वस्त्र वाहून षोडशोपचारांनी पूजा करावी. षोडशोपचारांनी शक्य नसेल, तर पंचोपचारांनी पूजन करावे. गणेशचतुर्थीला वाहतात तशा मिळतील तेवढ्या विविध पत्री, फुले अर्पण कराव्यात. आघाडा, शमी या पत्री आवर्जून अर्पण कराव्यात. धूप-दीप-नैवेद्या दाखवून आरती करावी. आरतीनंतर ‘गणशेखर गणाध्यक्ष गौरीपुत्र गजानन । व्रतं संपूर्णतां यातु त्वत्प्रसादादिभानन ।।’, अशी प्रार्थना करावी. पूजेमध्ये दूर्वांना विशेष महत्त्व आहे. म्हणून इतर पत्रींप्रमाणेच दूर्वाही अर्पण कराव्या. एरवी गणपतीची नावे घेत सहा दूर्वा वाहाव्या. मात्र ही चतुर्थी रविवारी आली असल्यास एकवीस दूर्वा वाहाव्या. व्रतकर्त्याने एकभुक्त राहावे.
एक दुर्वा अर्पण केल्यास पूर्ण पूजेचे पुण्य लाभते
गणपतीचे पूजन करताना २१ दुर्वांच्या २१ जुड्या किंवा त्याचा हार गणपतीला अर्पण करावा. एका मान्यतेनुसार, विषम संख्येत गणपतीला दुर्वा वाहव्यात. जसे की, ३, ५, ७, ९ अशा दुर्वांची जुडी. अशा प्रकारे दुर्वा अर्पण केल्यास गणपती प्रसन्न होतो. मनापासून केलेली मनोकामना पूर्णत्वास जाते. विघ्नहर्ता गणपती भाविकांची इच्छा पूर्ण करतो, अशी लोकमान्यता असल्याचे सांगितले जाते. बाकी काही नसले आणि एक दुर्वा गणपती बाप्पाला मनोभावे अर्पण केली तरी संपूर्ण पूजेचे पुण्य लाभते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. दुर्वा औषधी वनस्पती आहे. संस्कृतमध्ये दुर्वांना अमृता, अनंता, गौरी, महौषधि, शतपर्वा, भार्गवी या नावांनी ओळखले जाते. असे म्हणतात की, समुद्र मंथनातून जेव्हा अमृत कलश निघाला, तेव्हा तो मिळवण्यासाठी देव आणि दानवांमध्ये ओढाताण झाली, त्या ओढाताणीमध्ये जे थेंब पृथ्वीवर सांडले, त्यातून दुर्वा नामक वनस्पती उत्पन्न झाली. म्हणजेच, ही वनस्पती अमृतासमान आहे.
दूर्वागणपती व्रत कथा
पौराणिक कथेनुसार अनलासुर नामक राक्षस पृथ्वीवर सर्वांना त्रास देत होता. सर्व देवांनी भगवान गणेश यांना प्रार्थना करून रक्षणार्थ धावा केला. बाप्पानी राक्षसाशी तुंबळ युद्ध केले आणि रागाच्या भरात त्या असुराला खाऊन टाकले. परंतु, त्या विषारी राक्षकाने बाप्पाच्या पोटात जाताच उपद्रव सुरू केला. बाप्पाच्या अंगाची लाही लाही होऊ लागली. तोंडातून प्रखर ज्वाला बाहेर पडू लागल्या. तो दाह शांत करण्यासाठी कश्यप ऋषींनी दुर्वांच्या २१ गाठी खाण्यासाठी दिल्या. तसेच २१ दुर्वांची जुडी अशा दुर्वा त्याच्या मस्तकावर ठेवल्या आणि काय आश्चर्य दुर्वांकुर गणेशाला अर्पण केल्यानंतर गणपतीच्या अंगाचा दाह शमला.
दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते
दुर्वांनी आपला गुणधर्म दाखवला. तेव्हापासून गणपतीला दुर्वा आवडू लागल्या आणि गणपती पूजनात दुर्वाचे स्थान अत्यंत महत्त्वाचे बनले. गणपती बाप्पाला मोदक प्रिय असतात. आपण नैवेद्य अर्पण करताना जसे तुळशीचे पाने ठेवतो, तसे मोदक अर्पण करताना दुर्वा ठेवली जाते. तसेच, बाप्पाच्या पूजेतही दुर्वांचा हार वाहिला जातो. हार उपलब्ध नसेल, तर २१ दुर्वांची जुडी वाहिली जाते. तीदेखील उपलब्ध नसेल, तर दुर्वांचे त्रिदल वाहिले जाते. दुर्वा अर्पण करताना हात जोडून मंत्र म्हणावा, ‘श्री गणेशाय नम:, दुर्वाकुरान् समर्पयामि!’ अशाप्रकारे श्रद्धापूर्वक बाप्पाची प्रार्थना केली आणि दुर्वांकुर वाहून बाप्पाचे व्रत केले, तर बाप्पाचा आशीर्वाद नक्की प्राप्त होईल.
|| गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ||