Pithori Amavasya 2025: शेवटच्या श्रावण शुक्रवारी अर्थात २१ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजून ५५ मिनिटांनी श्रावण अमावास्येचा प्रारंभ होत असून, शनिवारी सकाळी ११ वाजून ३५ मिनिटांपर्यंत अमावास्या असणार आहे. त्यामुळे ती शनी अमावस्यादेखील(Shani Amavasya 2025) म्हटली जाईल. श्रावण अमावस्येला हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊ.
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
श्रावण अमावास्येला(Shravan Amavasya 2025) पिठोरी अमावस्या(Pithori Amavasya 2025) म्हणतात. परंपरेनुसार या दिवशी पोळा(Pola 2025) साजरा करत असल्यामुळे बैलांची पूजा करतात, त्यानंतर आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत(Pithori Vrat 2025) करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन 'अतिथी कोण?' असे विचारते. तेव्हा मुलं 'मी आहे' असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावास्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते. म्हणूनच याला मातृ दिन असे ही म्हणतात.
पिठोरी व्रत :
मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी पिठोरी अमावास्या साजरी केली जाते. सायंकाळी अंघोळ करून आठ कलश स्थापित केले जातो. त्यावर पूर्णपात्रे ठेवून ब्राह्मी, माहेश्वरी व इतर शक्तींची पूजा केली जाते. तांदुळाच्या राशीवर चौसष्ट योगिनींना आवाहन देऊन पिठाच्या मूर्ती तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचाच नैवेद्य दाखवण्यात येतं. म्हणून याला पिठोरी व्रत म्हटले जाते.
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
पिठोरी अमावस्येचा नैवेद्य : नैवेद्याला वालाच बिरड, माठाची भाजी, तांदळाची खीर, पुर्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अश्या रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायू पुत्र होतात अशी श्रद्धा आहे.
पोळा साजरा करण्याचे महत्त्व:
आपला देश ऋषीप्रधान होता, आता तो कृषीप्रधान झाला आहे. हा खेड्यांचा, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा देश. निसर्गसंपत्तीने भरलेला आणि भारलेला. संस्कृतीने नटलेला, ग्रामीण लोककलांनी नटलेला. इथे प्रत्येक गोष्टीचे अप्रूप, कौतुक आणि कृतज्ञता. शेतकऱ्यांच्या जीवाला जीव देणारा आवडता प्राणी म्हणजे त्याचे बैल-राजा आणि सर्जा! रात्रंदिवस त्याच्याबरोबर राब-राब राबणारा. म्हणून तर संध्याकाळी गोठ्यात दावणीला बांधल्यावर या राजाच्या आणि सर्जाच्या पाठीवर, मानेवर शेतकरी प्रेमाने आणि कौतुकाने हात फिरवतो. बैलही प्रेमाने भारावून थरथरतात. त्यांच्याशी तो मुकसंवाद साधतो. तोच खरा प्राणिमित्र. हे बैल म्हणजे त्याचे जीव की प्राण. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी येते. वर्षभर बैलाशी क्रूरतेने वागल्याचा पश्चात्ताप होतो. म्हणून बैलाला या दिवशी आराम दिला जातो.
याच कार्याची कृतज्ञता व्यक्त करण्याचा श्रावण अमावस्येचा दिवस. आज बैलांना काहीही काम द्यायचे नाही. ही त्यांची हक्काची सुटी. अगदी सकाळी उठून त्यांना नदीवर नेऊन, साबणाने स्वच्छ आघोळ घातली जाते. मग त्याच्या पाठीवर रंगाचे हाताचे ठसे, शिंगांना फुगे, बाशिंगे, बेगडी कागदी पट्ट्या, रिबीनी बांधल्या जातात. गळ्यात घुंगरु, घंटा, मणी-माळा, कवड्या, गोफ, अंगावर रंगीबेरंगी कापडांची आरसे लावलेली झूल, गोंडे, रंगीत कासरे अशी सजावट होते. त्यानंतर धूप, दीप लावून पूजा करतात. यावेळी पायावर दूध, पाणी घालून, आरती ओवाळून त्यांना पुरणपोळ्यांचा प्रसाद दिला जातो. शिवाय बाजरी-घुगऱ्या, कडबा, चारा, हिरवे गवत, सरकी, भिजवलेले आंबोळ, अनेक धान्यांची केलेली खिचडी, कोंड्याचे मुटके इ. देतात. मग पळण्याची स्पर्धा, बैलांची मिरवणूक, याला बेंदूर (पोळा) म्हणतात. काही ठिाकणी पळवत नेत असताना धष्ट-पुष्ट बैलांकडून उंच उडी मारून तोरण तोडण्याची रीत आहे. ती पाहण्यासारखी असते. तोरण तोडणाऱ्या बैलाला बक्षीस मिळते. त्याची वाजत-गाजत मिरवणूक निघते.
आपल्याला उपयोगी पडणाऱ्याच्या उपकाराची परतफेड म्हणून पूजा करणे याला हिंदू संस्कृती आणि संस्कार म्हणतात. पौर्णिमेला किंवा मूळ नक्षत्र असेल, त्या दिवशी हा उत्सव असतो. हल्ली ट्रॅक्टरमुळे किंवा तत्सम यांत्रिक अवजारांमुळे बैल कमी झाले असले, तरी पूजा ही सुरूच आहे.