Sankashti Chaturthi 2024: मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे खास; बाप्पाच्या आशीर्वादासाठी टाळा 'या' चुका!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 13:30 IST2024-04-26T13:30:02+5:302024-04-26T13:30:28+5:30
Sankashti Chaturthi 2024: बाप्पा हे आपले लाडके दैवत आणि त्याच्या उपसनेचा एक मार्ग म्हणजे संकष्टीचे व्रत; हे व्रत करताना पाळायचे नियम जाणून घ्या आणि चुका टाळा!

Sankashti Chaturthi 2024: मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे खास; बाप्पाच्या आशीर्वादासाठी टाळा 'या' चुका!
२७ एप्रिल २०२४ रोजी मराठी नववर्षातील पहिली संकष्टी आहे. आणि रात्री १०. १२ मिनिटांनी चंद्रोदय आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत आपण सगळेच भक्तिभावाने करतो. दिवसभर उपास करून, सायंकाळी अथर्वशीर्षाचे पठण आणि आरती करून चंद्र दर्शन घेऊन उपास सोडतो. बाप्पाला प्रिय असलेले मोदक किंवा गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवतो. मग तो प्रसाद आपण घेतो. अर्थात बाप्पाची मर्जी संपादन करण्यासाठी आपण वरील सर्व गोष्टी भक्ती भावाने करत असतो.
या गोष्टींबरोबरच आणखी तीन चार गोष्टींची काळजी घेतली तर आपल्या व्रताला नक्कीच पूर्णत्व येईल. हे नियम महिलांसाठी असण्याचे कारण एवढेच, की महिला घरात विशेष सक्रिय असतात. घरातील योग्य अयोग्य गोष्टींकडे त्यांचा बारीक कटाक्ष असतो. पुढील गोष्टी त्यांनी अंमलात आणल्या तर आपोआपच घरचेसुद्धा तिचेच अनुकरण करतील आणि बाप्पाच्या कृपाशीर्वादाने नवे वर्ष आनंद आणि भरभराटीचे जाईल! चला तर जाणून घेऊया चार मुख्य गोष्टी-
>> बाप्पाला पितांबर अर्थात पिवळे वस्त्र प्रिय म्हणून उपास सोडताना घरातले पुरुष पितांबर नेसतात. हाच नियम स्त्रियांनीदेखील पाळावा. उपास सोडताना गणेश पूजेपूर्वी पिवळे स्वच्छ वस्त्र परिधान करावे. तसे करणे शक्य नसेल तर निदान काळे वस्त्र परिधान केलेले नसावे, ही बाब लक्षात ठेवावी.
>>संकष्ट चतुर्थी व्रत हे चंद्र दर्शन घेऊन मगच पूर्ण होते. त्या दिवशी चंद्र दर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये अशी शास्त्राची शिकवण आहे. हे चंद्र दर्शन घेताना चंद्राला दूध, तांदुळाचा नैवेद्य दाखवून पाण्याने अर्घ्य द्यावे. ते पाणी आपल्याच पायावर पडणार नाही याची काळजी घ्यावी.
>> संकष्टीचा दिवसभर उपास केल्यावर गणपती पूजन करावे. अथर्वशीर्ष किंवा गणेश स्तोत्र ११ वेळा किंवा २१ वेळा आणि अगदीच शक्य नसेल तर निदान एक वेळा एका जागी स्थिर बसून म्हणावे. त्यामुळे डोकं आणि मन शांत राहते आणि मन शांत झाले की नवनवीन गोष्टी आत्मसात होण्यास मदत होते.
>> संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फुल आणि दुर्वांची जुडी अर्पण करतो. कारण या दोन्ही गोष्टी बाप्पाला प्रिय असतात. परंतु या दोन्ही गोष्टी उपलब्ध नसतील तर पर्याय म्हणून तुळशी दल बाप्पाला वाहू नये. एकवेळ हात जोडून मनोभावे नमस्कार करावा पण तुळशी कदापि वाहू नये असे शास्त्र सांगते.
या गोष्टींचे पालन करण्याची सवय आपण लावा आणि घरच्यांनाही वळण लावा. बाप्पा मोरया!