आपुले मरण पाहिले म्या डोळा...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 15:19 IST2021-03-30T15:18:44+5:302021-03-30T15:19:05+5:30

Sant Tukaram संत तुकारामांनी आपल्या अभंगाद्वारे  एकांतवासात राहण्याचे  काही  फायदे सांगितले आहेत.

My eyes saw My death ...! | आपुले मरण पाहिले म्या डोळा...!

आपुले मरण पाहिले म्या डोळा...!

आता बरे घरच्या घरी।

आपली उरी आपण पै।।

संत तुकारामांनी आपल्या अभंगाद्वारे  एकांतवासात राहण्याचे  काही  फायदे सांगितले आहेत. एकांत वासाने  आपणास   एकाग्रता व अलिप्तता  प्राप्त होते. त्यामुळे  बाहेरच्या वातावरणाचा कोणताही दोष आपणास लागत नाही. जीवनामध्ये  असे अनेक प्रसंग येतात की त्या वेळेस  मनुष्याला एकांत वासात, विजनवासात किंवा अज्ञातवासात राहावं लागतं. तो अज्ञातवास आपल्या जीवनाला अधिक कणखर, मजबूत  आणि शुद्ध करीत असतो.  या एकांत वासामुळे  जीवनाबद्दल  असणारी आपली दृष्टी  अधिक गंभीर, चिंतनशील  व शुद्ध बनते.  जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन  स्पष्ट होतो. स्वतःच्या जीवनाचे मूल्यमापन करता येते.सर्व नात्यांची योग्य किंमत कळते.

अति संपर्कात येण्याचे तोटे लक्षात येतात. 

अति परिचयेत अवज्ञा।। याचा प्रत्यय येतो. 

  आज मानवी जीवनाची क्षणभंगुरता एक कोरून विषाणूनेदाखवून दिली आहे.

आपला चार दाखवू नका व तोड बंद ठेवा असा संदेश प्रत्येक जण मास्क व रुमालाने तोंड झाकून घेत आहे.

 मानवी जीवन  एखाद्या पाण्याच्या बुडबुड्या प्रमाणे  केव्हाही संपुष्टात येऊ शकते याबद्दलच्या  निर्विवाद सत्याचा निर्वाळा  आपल्याला देत असते.  

आपुले मरण पाहिले म्या डोळा। तो झाला सोहळा अनुपम्य।।

असे मरणाचे शाश्वत तत्व संतांनी अनुभवले आहे.

 म्हणून सर्वच संतांनी  आपल्या जीवनामध्ये  एकांतवास  महत्त्वाचा मानला आहे. त्यामध्ये  जन धन आणि मान या गोष्टीपासून  अलिप्त राहून स्वतःचे जीवन तटस्थपणे अभ्यासण्याचा  व सिंहावलोकन करण्याचा  एक उपाय त्यांनी सांगितला आहे. खुद्द संत तुकारामांना जेव्हा संसाराच्या तापे तापलो रामराया ।।

असा संसाराचा अनुभव आला तेव्हा  ते स्वतः देहूजवळील भंडारा डोंगरावर  जाऊन  स्वतःची साधना केली आणि त्याच साधनेतून त्यांची अभंगवाणी  जगाला  मार्ग दाखविण्यासाठी निर्माण झाली.

  बुडती हे जन  न देखवे डोळा । म्हणुनी कडावळा  येत असे ।।

 असा विचार  त्यांचा होता  म्हणूनच  

जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती  । देह कष्टविती परोपकारे।। या उक्तीनुसार  त्यांचा  जीवन सिद्धांत  या एकांतवासाचा च्या माध्यमातून मांडलेला आहे.  संत तुकाराम  हे  स्वतःशी संवाद साधणारे  कवी हृदयाचे संत होते. 

आपुलाचि वाद आपणाशी ।। असे ते म्हणतात  याचसाठी की स्वतःला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा एक उत्तम उपाय म्हणजे एकांतवास होय. आज  निर्माण झालेल्या या भयंकर कोरोना विषाणूच्या आक्रमणाने  सगळेजण  विषणण व हवालदिल झाले आहेत. त्यावर कोणताही ठोस उपाय  कोणत्याही देश्याच्या संशोधनात शास्त्रज्ञांना सापडत नाही. आज तरी एकांतवासात घरी निवांत राहणे हाच उपाय सापडला आहे. 

युद्धकारणे पृथ्वीवरती। प्रदूषण फैलावेल। अनेक दशके या परीनामे  । मानव त्रासवेल।।

 संतांना या गोष्टीची कल्पना आधीच असणे  यावरून  असे लक्षात येते की संतांची दृष्टी ही भविष्याचा वेध घेणारी होती.  ते सांगतात-युद्धकारने पृथ्वीवरती । विष वायू पसरेल।।

असंख्य जीव ते विषवायूने। प्रणाशी मुकतील।।

 संत तुकारामांनी  आपल्या अभंग वाङ्मयातील काही अभंगाद्वारे त्याचा उल्लेख केलेला आहे. संत तुकाराम द लाईफ मॅनेजमेंट जगद्गुरु आहेत. त्यांनी अश्या बिकट व संकटाच्या वेळी आपल्या अभंगातून घरी राहण्याची महती विशद केली आहे.


आता बरे घरच्या घरी । आपली उरी आपणा पै॥ 

वाईट बरे न पडे दृष्टी l मग कष्टी होईजे ना ॥

  

प्रस्तुत अभंगातून तुकोबा विशिष्ट परिस्थितीमध्ये घरी राहण्याचे महत्व विशद करतात .आजच्या या कठीण परिस्थिती आणि मनस्थिती मध्ये आपण आपल्या घरीच इतरांपासून दूर रहाणे हिताचे आहे. घरी राहण्याने बाहेरील घातक आणि वाईट गोष्टींचा कोणताही संबंध येत नाही किंबहुना दृष्टीस पडत नाही.

 चुकीच्या प्रभावापासून आपण दूर राहतो.

त्यामुळे तन आणि मन  विषण्ण होत नाही.

त्या अनुषंगाने आपण सर्वतोपरी घरीच राहणे शहाणपणाचे आहे असे तुकोबा मनापासून सांगतात.

विष तया जाले  धन मान जन। वसविती वन एकांती त्या।। नावडती जीवा आणिक प्रकार ।आवडी ते फार एकांताची ।।येणे सूखे रुचे एकांताचा वास। नाही गुणदोष अंगा येत ।तुका म्हणे आम्हा एकांताचा वास ब्रम्हा ब्रम्हा सदा।।

 संत तुकारामांनी एकांतवासाचा सांगितलेला महिमा हा कितीही महत्वाचा असला तरी आज कोरोना विषाणूची लागण व त्याचा फैलाव प्रादुर्भाव रोखण्यासाठी लोक एकांतवासात जायला तयार नाहीत. ते आजही रस्त्यावर भयंकर बिनधास्तपणे फिरत आहेत त्यामुळे त्यांना नियंत्रणात आणण्यासाठी बळाचा वापर करावा का? सैन्यदल बोलवावे का... ही वेळ आज येऊन ठेपलेली आहे. कोव्हिड-19 एकोणवीस हा विषाणू तुम्हाला घरात डांबून ठेवण्यास मजबूर करतो. अन्यथा मानवजात संपुष्टात येते की काय असा धोक्याचा संदेश देतो. तरीही माणूस हा निसर्ग नियमांचे व संत वचनांचे उल्लंघन करीत आहे. त्यामुळेच

रोगी खुजी निकृष्ट अशी। प्रजोत्पत्ती होईल।।

पृथ्वीवरचे व्यवहार सारे। पहा बंद पडतील।। 

अशी भीती संतांनी सातशे वर्ष आधीच व्यक्त केली आहे.

जेव्हा प्रकृतीच्या नियमांच्या पलीकडे मानव समूहाची वर्तणूक जाते. तेव्हा हीच प्रकृती त्याचे नियमन करीत असते. असे आपल्याला एका कोरोणा  विषाणूवरुन लक्षात येते.  हा एक विषाणू सगळ्या जगाला घरात डांबून ठेवू शकते तर त्या विश्वनियंत्या  प्रभूची ताकद किती अगाध आहे हे त्याने निर्माण केलेला हा एक सुष्मजीव दाखवून देत आहे. आज इटली,चीन, जर्मनी, स्पेन अमेरिका, भारत व डझनभर देशांना सातत्याने धोक्याचा इशारा दिला जातो आहे की आता  हा विषाणू आटोक्यात आला नाही तर माणसांना स्मशानात नेण्यासाठी माणसेही उरणार नाहीत. खेदाने म्हणावे लागेल...

 माणसांच्या गर्दीतली ती माणसे गेली कुठे....? एकमेकांच्या जिवावर उठलेली ही माणसे आता तरी थांबतील का ? हा प्रश्न मनाला सतावत आहे.

 या प्रश्नाचे उत्तर आपल्या प्रत्येकाकडेच आहे. प्रश्न सोडवायचा की सोडून द्यायचा हे आपले आपणच ठरवायचे आहे आणि प्रत्येकाने घरात राहायचे आहे. अन्यथा जग जिंकायला  निघालेल्या सिकंदराला  शेवटी खाली हात जावे लागले होते. तसेच आपणास जीवनाचा उपभोग न  घेता खाली हाताने जाण्याची वेळ आपल्या दाराशी येऊन ठेपलेली आहे. हे प्रत्येकाने वेळीच लक्षात घ्यावे. अन्यथा आपुले मरण पाहिले म्या डोळा...!

    डॉ. हरिदास आखरे, शेगाव.

Web Title: My eyes saw My death ...!