चोरी करणे हे पाप आहे, हे माहीत असूही गोपाळकृष्णाने या कृष्णकृत्यात बाळ गोपाळांनाही का सामील करून घेतले, जाणून घ्या त्यामागील कारण.
मथुरेस आपल्या पित्यास कैद करून स्वत: राजगादीवर बसणाऱ्या कंसाच्या जुलमी, नितीभ्रष्ट व धर्मबाह्य सत्तेमुळे त्यावेळची प्रजा त्रस्त झाली होती. राजाचे सेवकही पिडा व त्रास देण्यात मशगुल झाले होते. गोकुळातील गौळणींनी मथुरेस विकण्यासाठी नेलेले दूध, दही, तूप, लोणी असा सकस, शक्तीवर्धक खुराक खाऊन कंसाचे मल्ल बलवान झाले होते व सर्व गोपाळ अशक्त होत चालले होते.
म्हणून भगवंताने शत्रूची शक्ती कमी व्हावी व आपली संरक्षण शक्ती बळकट व्हावी म्हणून रस्त्यावर उभे राहून गोकुळातील दही, दूध, लोणी मथुरेस विक्रीकरीता जाण्यास बंदी घातली व गोपाळांची संघटना करून त्यांना विचारले, तुम्ही असे अशक्त का?
Janmashtami 2021 : गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात का धुवू नयेत? या प्रथेमागची कथा!
गोकुळातील गौळणी आपल्या मुलांना दही, दूध, तुप, लोणी न देता त्या विकत असत. हा त्यांच्याकडून अधर्मच घडत होता. तसेच ज्याच्या कृपेने हे प्राप्त झाले, त्या देवास अर्पण न करता त्या विकावयाच्या. शास्त्र असे सांगते, देवाला अर्पण न करता जो जे काही सेवन करतो तो पाप सेवन करतो व देवाचे हिरावून घेणारा चोर आहे, असे भगवान गीतेत कर्मयोगात सांगतात. तेव्हा या अर्धमाचे मार्जन निर्मूलन होऊन त्यांच्याकडून धर्मपालन व्हावे या हेतूने धर्मरक्षणार्थ आलेले धर्ममूर्ती भगवान कृष्ण चोरी करत असत.