वाढत्या उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांना करा 'जलदान'; अबोल जिवांची तहान भागवून मिळेल पुण्य, समाधान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 07:05 IST2026-04-09T07:00:01+5:302026-04-09T07:05:01+5:30
वाढत्या उन्हाळ्यात तहानलेल्या पशू-पक्ष्यांसाठी पाण्याचे भांडे ठेवणे हे केवळ पुण्याचे काम नसून मानवी कर्तव्य आहे, सोबत पाळा 'हे' नियम!

वाढत्या उन्हाळ्यात पशू-पक्ष्यांना करा 'जलदान'; अबोल जिवांची तहान भागवून मिळेल पुण्य, समाधान!
उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. सूर्याचा पारा ४० अंशांच्या पुढे गेल्यामुळे केवळ माणसांनाच नाही, तर अबोल पशू-पक्ष्यांनाही पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. निसर्गाचा समतोल राखणाऱ्या या जिवांना उन्हाच्या झळांपासून वाचवण्यासाठी 'जलदान' करणे, हे या काळातील सर्वात मोठे पुण्याचे कार्य मानले जाते.
रणरणत्या उन्हात घसा कोरडा पडल्यावर पाण्याचा एक घोट मिळणे हे अमृतासारखे असते. आपण माणसे मागून पाणी पिऊ शकतो, पण पाळीव प्राणी आणि पक्षी मात्र पाण्याच्या शोधात तासनतास फिरत राहतात. अनेकदा पाण्याचे स्रोत आटल्यामुळे हे जीव मृत्यूच्या दारात पोहोचतात. अशा वेळी आपल्या घराची बाल्कनी, गच्ची किंवा अंगणात थोडेसे पाणी ठेवणे त्यांच्यासाठी जीवनदान ठरू शकते.
१. जलदानासाठी काही साध्या पण प्रभावी टिप्स
मातीची भांडी वापरा: पाणी ठेवण्यासाठी प्लास्टिकऐवजी मातीच्या पसरट भांड्यांचा (मातीची कुंडी किंवा परळ) वापर करा. मातीच्या भांड्यात पाणी नैसर्गिकरीत्या थंड राहते, जे पक्ष्यांसाठी जास्त सुखद असते.
पाणी सावलीत ठेवा: भांडे थेट उन्हात न ठेवता झाडाच्या सावलीत किंवा घराच्या छताखाली ठेवा, जेणेकरून पाणी जास्त वेळ थंड राहील.
नियमित स्वच्छता: पाण्याचे भांडे दररोज स्वच्छ धुवा आणि त्यात ताजे पाणी भरा. साठलेल्या पाण्यात डास होण्याची किंवा बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते, जी पक्ष्यांच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.
सुरक्षित जागा: पक्ष्यांसाठी पाणी उंचावर ठेवा, जिथे मांजरी किंवा इतर प्राण्यांपासून त्यांना धोका नसेल. प्राण्यांसाठी मात्र जमिनीवर सुरक्षित ठिकाणी पाण्याची व्यवस्था करा.
२. अन्नाचीही सोय करा
पाण्यासोबतच मातीच्या भांड्यात थोडे धान्य (बाजरी, ज्वारी किंवा तांदूळ) ठेवल्यास पक्ष्यांना अन्नासाठी वणवण करावी लागणार नाही.
हे ही वाचा : Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
३. जलदानाचे महत्त्व: सामाजिक आणि आध्यात्मिक
धार्मिक दृष्टिकोनातून तहानलेल्याला पाणी पाजणे हे 'महादान' मानले जाते. विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर, चिमण्या आणि इतर दुर्मिळ होत चाललेल्या पक्ष्यांचे अस्तित्व टिकवण्यासाठी आपली ही छोटीशी मदत मोलाची ठरते. जेव्हा एखादा पक्षी तुमच्या घरी पाणी पितो, तेव्हा त्यातून मिळणारे आत्मिक समाधान कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठे असते.