गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
By देवेश फडके | Updated: June 17, 2025 13:53 IST2025-06-17T13:46:21+5:302025-06-17T13:53:37+5:30
Guru Purnima 2025 Shree Swami Samarth Seva: गुरुवार, १९ जून २०२५ ते गुरुपौर्णिमा या कालावधीतील ४ गुरुवारी ४ गोष्टी आवर्जून कराव्यात. स्वामींची कृपा होईल, असा विश्वास ठेवायला हरकत नाही.

गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
Guru Purnima 2025 Shree Swami Samarth Seva: गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः। गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः॥, आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिलीच पौर्णिमा असते. त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अनेक पटींनी वाढते. गुरूपौर्णिमा हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. भारतात गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. गुरु म्हणजे अज्ञानाचा अंधकार नाहीसा करून ज्ञानाच्या, प्रकाशाच्या वाटेकडे घेऊन जाणारी वंदनीय व्यक्ती. गुरुपौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करण्याची सुवर्ण संधी आहे. ४ गुरुवार श्री स्वामींची सेवा करावी आणि कायमस्वरुपी स्वामींचे कृपांकित होण्याची संधी गमावू नये, असे सांगितले जाते.
गुरुवार हा गुरु तत्त्वाला समर्पित वार आहे. या दिवसावर गुरु ग्रहाचा अंमल असतो. यंदा, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी गुरुपौर्णिमा आहे. बुधवार, ०९ जुलै २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ३६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होत आहे. तर, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी उत्तररात्रौ ०२ वाजून ०६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमेची सांगता होत आहे. भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची पद्धत असल्यामुळे आषाढ गुरुपौर्णिमा गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी साजरी करावी, असे सांगितले जाते. अगदी प्राचीन काळापासून भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा साजरी करण्याची परंपरा आहे. प्रत्यक्ष दत्तावतार असलेले अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज हजारो भाविकांचे सद्गुरू आहेत. सद्गुरूंची सेवा करून त्यांची कृपादृष्टी, शुभाशिर्वाद आणि पुण्यप्राप्ती करता येऊ शकते. गुरुवार, १९ जून २०२५ ते गुरुवार, १० जुलै २०२५ असे ४ गुरुवार स्वामींची विशेष सेवा करावी. यामुळे अशक्यही शक्य होण्याचा आत्मविश्वास प्राप्त होऊ शकेल. नेमके काय करावे? कसे करावे? जाणून घेऊया...
४ गुरुवार स्वामी सेवा कशी करावी?
गुरुवारी आवर्जून श्री स्वामी समर्थ महाराजांचे विशेष पूजन केले जाते. त्यामुळे गुरुवारपासून स्वामी सेवेस प्रारंभ करता येऊ शकेल. अगदी घरच्या घरी स्वामींसमोर बसून स्वामी सेवेचा संकल्प करावा. गुरुवार, १९ जून २०२५ ते गुरुवार, १० जुलै २०२५ या कालावधीतील ४ गुरुवार येतात. या सगळ्या गुरुवारी शक्यतो एकासारखी स्वामी सेवा करावी. अनेकदा धकाधकीच्या काळात सेवा करणे शक्य होत नाही. अशा वेळी जितकी शक्य असेल, तितकी सेवा करावी. या काळात स्वामींचे नामस्मरण, मंत्रांचे जप, स्तोत्रांचे पठण किंवा श्रवण करावे.
४ गुरुवार ४ गोष्टी आवर्जून कराव्यात
गुरुवार, १९ जून २०२५ ते गुरुवार, १० जुलै २०२५ या कालावधीतील ४ गुरुवारी ४ गोष्टी आवर्जून कराव्यात.
- एक म्हणजे घरच्या घरी स्वामींचे विशेष पूजन करणे. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगांच्या फुलांचा समावेश करावा.
- दुसरे म्हणजे पिवळ्या रंगाचे पेढे, मिठाई स्वामींना अर्पण करावी आणि प्रसाद म्हणून वाटावी.
- तिसरे म्हणजे स्वामींचा सर्वांत प्रभावी तारक मंत्र, स्वामींच्या अन्य मंत्रांचा जप, स्वामींचे श्लोक, स्तोत्रे पठण यांचे पठण करावे. शक्य असेल तर १ जपमाळ म्हणजे १०८ वेळा तारक मंत्रांचा जप करावा.
- चौथे म्हणजे स्वामींच्या मठात जाऊन दर्शन घेणे. याशिवाय शक्य असेल तर सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळेस स्वामींची आरती करावी. सकाळी शक्य झाले नाही, तर तिन्हीसांजेला दिवेलागणीला प्रदोष काळी स्वामींची आरती करावी.
या गोष्टी करणार असल्याचा संकल्प घ्यावा. गुरुपौर्णिमेला संकल्प पूर्ती झाली की, स्वामींचे मनापासून आभार मानावेत. ऋण व्यक्त करावे. या संकल्पात अनावधानाने काही कमतरता राहिल्यास किंवा करताना काही चूक झाल्यास स्वामींसमोर क्षमायाचना करावी. ४ गुरुवारी या ४ गोष्टी करणे कठीण नाही.
४ गुरुवार स्वामी सेवा करणे शक्य झाले नाही तर...?
४ गुरुवार अशा प्रकारे सेवा शक्य झाली नाही, तर गुरुपौर्णिमेला हीच सेवा संपूर्ण दिवस करण्याचा संकल्प घ्यावा आणि तो पूर्ण करावा. तसेच गुरुपौर्णिमा या दिनाचे औचित्य साधून स्वामी चरित्रामृत, गुरुलीलामृत याचे पारायण करावे. तसा संकल्प करावा. या दोन्ही ग्रंथात दिलेले नियम आणि पारायण पद्धती यांचा न चुकता अवलंब करून पारायण पूर्ण करावे आणि ही सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करावी. पण एकदा संकल्प केला की, त्यात खंड पडू देऊ नये. अगदीच काही नाही, ‘श्री स्वामी समर्थ’ या मंत्रांचा १०८ वेळा (१ जपमाळ) किंवा यथाशक्ती जप अवश्य करावा.
श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करताना काय ध्यानात ठेवावे?
- आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल या श्रद्धेने या गोष्टी कराव्यात.
- मनापासून सेवा करावी. सेवेत खंड पडू देऊ नये.
- एकदा संकल्प केला की, तो पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे.
- तुमची सुरू असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी.
- अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते. त्यासाठी सातत्य हवे.
- स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील, हेही कोणी सांगू शकत नाही.
- स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा.
- भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून, अशक्यही शक्य करतील स्वामी ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे.
॥ श्री स्वामी समर्थ ॥