Chanakyaniti: 'या' तीन प्रकारच्या लोकांकडून मदत घेतली, तर आयुष्यभर करावा लागेल पश्चात्ताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:43 IST2024-12-25T15:42:52+5:302024-12-25T15:43:04+5:30

Chanakyaniti: क्षणाची मदत हे आयुष्यभराचे उपकार ठरू शकतात, म्हणून मदत घेताना कोणापासून सावध राहायला हवे ते सांगताहेत आचार्य चाणक्य!

Chanakyaniti: If you take help from 'these' three types of people, you will have to regret it for the rest of your life! | Chanakyaniti: 'या' तीन प्रकारच्या लोकांकडून मदत घेतली, तर आयुष्यभर करावा लागेल पश्चात्ताप!

Chanakyaniti: 'या' तीन प्रकारच्या लोकांकडून मदत घेतली, तर आयुष्यभर करावा लागेल पश्चात्ताप!

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये मनुष्याला आयुष्याची जडण घडण होण्यास पूरक ठरतील असे आदर्शवादी आणि वास्तविक विचार मांडले आहेत. त्यांचे विचार आपल्याला विचार करायला लावून त्यानुसार कृती करायला भाग पाडतात. या लेखातही त्यांनी महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आहे.

'सुख के सब साथी, दुख मे न कोई' हे एक वाक्य आयुष्याचं मर्म सांगणारे आहे. आपल्या सुखाच्या अर्थात उत्कर्षाच्या काळात लोकांना बोलवावे लागत नाही तर ते आपणहून येतात. याउलट दुःखाच्या, संकटाच्या वेळी लोकांकडे मदत मागायला जाल, तर ते पाठ फिरवून घेतात. यासाठीच आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असत की मदत विचारपूर्वक मागायला हवी.

संकटकाळी जो आपल्या मदतीला येतो तो खरा मित्र, अशी मैत्रीची व्याख्या केली जाते. परंतु काही जण आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आवळा देऊन कोहळा काढतात. अर्थात मदत थोडीशी करतात पण त्याचा चौपट मोबदला या ना त्या स्वरूपात वसूल करतात. यासाठी आचार्य चाणक्य तीन प्रकारच्या लोकांकडून प्रकर्षाने मदत टाळा असा सल्ला देतात.

स्वार्थी लोक:
चाणक्य नीती सांगते स्वार्थी लोकांनी फुकट मदत केली तरी घेऊ नका. ते तुमचे भले कधीच करणार नाहीत. उलट तुम्ही जास्तीत जास्त संकटात कसे अडकाल यासाठी ते प्रयत्न करतील. अशा लोकांनी मदत करण्याचा आव आणला तरी त्याला भुलू नका. त्यांचा स्वार्थी स्वभाव ओळखून सावध पवित्रा घ्या आणि त्यांच्याकडून मदत स्वीकारू नका.

मत्सर करणारे लोक :
जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात. तुमचा मत्सर करतात. तुम्हाला कमी लेखतात, अशा लोकांनी केलेल्या खोट्या स्तुतीला भुलू नका. तुमच्या दुःखाचे त्यांच्यासमोर प्रदर्शन करू नका. कारण असे लोक तुम्हाला बाहेरून सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या दुःखाने त्यांनाच जास्त आनंद होईल हे लक्षात ठेवा. म्हणून आपले दुःख, आपल्या समस्या लोकांना सांगत फिरू नका!

तापट व्यक्ती :
ज्या व्यक्तीचे स्वतःच्या रागावर नियंत्रण राहत नाही अशा व्यक्तीकडून कधीही मदत मागू नका. कारण अशी व्यक्ती आनंदाच्या भरात मदत करत असली तरी कधी तिचा मूड बदलेल आणि कधी ती रागाच्या भरात तुमच्याकडून केलेल्या उपकाराची वसुली करेल याचा नेम नाही. अशा व्यक्तींशी फार सलगी नको आणि दुष्मनीपण नको. त्यांचे उपकार तर नकोच नको!

Web Title: Chanakyaniti: If you take help from 'these' three types of people, you will have to regret it for the rest of your life!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.