>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
आपले आयुष्य १२० वर्षाच्या कालखंडाचे धरून त्यात प्रत्येक ग्रहाला ठराविक कालावधी दिलेला आहे. त्या कालखंडात तो ग्रह आपल्या आयुष्याचा लगाम त्याच्या हाती घेत असतो. जसे रवीला ६ वर्ष , मंगळाला ७ वर्ष, राहू १८ वर्ष अशाप्रकारे असलेल्या ह्या कालखंडाला त्या ग्रहाची “ महादशा“ असे संबोधले आहे. प्रत्येक ग्रहाच्या दशेचा कालखंड ठरलेला आहे. त्या काळात मूळ पत्रिकेत त्या ग्रहाची स्थिती कशी आहे, ग्रह कुठल्या भावाचा कार्येश आहे आणि कुठल्या नक्षत्रात आहे, त्याचा नक्षत्र स्वामी कुठे आहे, ह्या सर्व भावांशी संबंधित गोष्टींच्याबाबत काहीतरी फळे मिळणारच. ह्या महादशेत इतर सर्व ग्रहांच्या अंतर्दशा , विदशा सुद्धा येतात. त्यामुळे महादशा या शब्दाची धास्ती घेण्याचे कारण नाही.
Astrology: लगीन'गाठ' की लग्नाची 'बेडी'? 'शुक्र' तुमच्या पत्रिकेत कुठे बसलाय, ते पाहणं महत्त्वाचं!
घटना घडायची, ती कधी आणि कशी घडेल ह्याचा संपूर्ण अधिकार महादशा स्वामीकडे राखून ठेवलेला आहे त्यात काहीही बदल करता येत नाही. आज आपण विवाह ह्या विषयावर चर्चा करत असताना दशांबद्दल चर्चा करणे आवश्यक आहे. विवाह होण्या साठी पत्रिकेतील 2, 7, 11 हे भाव महत्वाचे आहेत. द्वितीय भाव, कारण कुटुंबात एका नवीन व्यक्तीचे आगमन म्हणजेच कुटुंब वृद्धी , सप्तम भाव हा पती आणि पत्नीच्या मनोमिलनाचा आहे, तसेच विवाह करून लाभ होणार म्हणून 11 व्या स्थानातील लाभ भावसुद्धा महत्वाचा. ह्या तिन्ही भावांशी निगडीत असणार्या दशा ह्या विवाह घटना घडवण्यासाठी पूरक ठरतात . ह्या विरोधात 1, 6, 10 ह्या भावांच्या दशा असतात .
साधारणपणे शैक्षणिक दशा संपली की नोकरी आणि मग छोकरी असे समीकरण धरले तर साधरण वय २८ नंतर विवाहाची दशा जर 2, 7, 11 भावांशी अनुकुलता दर्शवत असेल तर विवाह होतो. एखाद्यावेळी राहू, शनी, गुरु, बुध ह्या ग्रहांच्या मोठ्या दशा आल्या आणि ग्रह जर षष्ठ भावाची फळे देत असेल किंवा षष्ठ भावाचा एकमेव कार्येश असेल तर अशावेळी कितीही प्रयत्न केले तरी विवाह जुळून येत नाही. षष्ठ भाव हा सप्तमाचा व्यय असल्यामुळे विवाह होत नाही किंवा मोडतो. अष्टम भावाची दशा अंतर्दशा असेल तर पती पत्नी भांडत राहतील पण विवाह मोडणार नाही . दशास्वामी 3, 9 आणि ६ भाव दर्शवत असेल तर त्यांच्या दशा अंतर्दशेत कायदेशीर घटस्फोट होण्याची शक्यता असते.
संसारात अनेक चढ उतार येतातच . कधी आर्थिक समस्या निर्माण होतात तर कधी वैचारिक मतभेद . एकदा एका व्यक्तीने मला सांगितले आमचे अजिबात पटत नाही . मी विचारले कारण काय असते वादाचे ? त्यावर म्हणाले आमच्यात क्षुल्लक कारणे असतात उदा. रस्ता कुठून ओलांडायचा त्यावरून पण आमच्यात मतभेत होतात .मला खरच हसू आले. असो, पण आहे हे असे आहे . अनेकदा दोन्हीकडील वडील मंडळीसुद्धा त्या दोघांच्या संसारात नको तितकी लुडबुड करतात आणि म्हणून वादाला तोंड फुटते.
Numerology: जूनमध्ये लागणार बंपर लॉटरी! अडकलेले पैसे परत येतील, कमाईचे नवे मार्ग सापडतील!
अनेकदा वयाची पन्नाशी आली तरी विवाहाला अनुकूल दशाच येत नाही आणि सनईचे सूर , मंगलाष्टके कानी पडणे कठीण होते . आपला आजचा जन्म हा पूर्व जन्माशी निगडीत असल्यामुळे पूर्व जन्मातील अनेक चांगल्या वाईट कर्मांचे फळ भोगल्याशिवाय सुटका नाही. विवाहासाठी दशा आणि सोबत चंद्र , रवी , शुक्र गुरु, मंगळ हेही बघावे लागतात. रवी आणि गुरुचे गोचर भ्रमण अनुकूल असावे लागते. थोडक्यात काय तर दशा स्वामीची संमती घेतल्याशिवाय विवाह ठरत नाही आणि संपन्न सुद्धा होत नाही.
संपर्क : 8104639230