एक एकर शेतीतून महिलेने कमावले पाच लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:57+5:302021-05-30T04:26:57+5:30
पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न ...

एक एकर शेतीतून महिलेने कमावले पाच लाख
पुरुषोत्तम करवा
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न घाबरता कुटुंबाची जबाबदारी पेलली. सध्या या महिलेने आपल्या शेतीत एक एकरात रेशीम शेती केली. यातून दरवर्षी पाच लाखांची कमाई होत आहे.
माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे या अल्पशिक्षित महिलेची ही यशकथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. टालेवाडी येथील रहिवासी शिवराज फाटे (वय ४०) यांना नित्रुड शिवारातील टकारवाडी येथे चार एकर वडिलोपार्जीत जमीन वाटून आली. सुरुवातीला यांनी आपल्या शेतात कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, आदी पारंपरिक पिके घेतली. यामुळे शेतातील पिकापासून जास्त उत्पन्न मिळत नसे. शिवराज यांचे मेहुणे बीड येथील विवेक सोमवंशी यांच्या मित्राकडे रेशीम शेती असल्याने व त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी अनेक वेळा शिवराज यांंना रेशीम शेती करण्यास सांगितले.
सन २०११ साली एक एकर शेतात रेशीम शेती करण्याचे ठरवल्यानंतर वडिलांनी यास विरोध केला. परंतु त्यांचे ऐकले नाही. त्यांचे न ऐकता रेशमाचे उत्पन्न घेत राहिले. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत असतानाच २०१५ साली वाहन अपघातात शिवराज यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला. आता शेतातील रेशीम शेतीचे काय करायचे? असा प्रश्न पडला. यानंतर दोन वर्षे ही शेती हिश्श्याने दिली; परंतु याद्वारे केवळ खर्चाची बरोबरी होऊ लागली. शिवराज यांची पत्नी छाया यांनी असे नुकसान झाले; तर आपले अवघड होईल. तुम्ही मला काय करायचे? ते सांगा, यापुढे शेती हिश्श्याने द्यायची नाही असे पतीला सांगितले. त्यानुसार त्या मागील तीन वर्षांपासून रेशीम शेती करीत आहेत. त्यांना त्यांचा १४ वर्षांचा मुलगा वेदान्त मदत करीत आहे. रेशीम शेतीत वर्षात पाच लाॅट घेत त्या आहेत. दहा ते बारा क्विंटल माल तयार होतो. त्यास भावही चांगला मिळत असल्याने वर्षाला यांना पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न एक एकर रेशीम शेतीतून मिळत आहे. त्यांनी एकही मजूर न लावता रेशीमसाठी पाला खुडण्यापासून तो टाकणे, उगवणही घरीच केली. त्यासाठीे सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे खर्चही वाचला. सध्या केवळ इतर खर्च पाच हजार रुपये येत आहे, असे छाया फाटे यांनी सांगितले.
----
रेशीम पिकासाठी उसाच्या मुकाबल्यात केवळ २५ टक्केच पाणी लागते. यापुढे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धत बंद करून रेशीम पीक पद्धतीकडे वळावे. रेशीम शेती महिलादेखील सहज करू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.
- छाया फाटे, महिला शेतकरी.
....
===Photopath===
290521\img_20210527_105707_14.jpg
===Caption===
माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे यांनी फुलविलेली रेशीम शेती.