बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:37 IST2021-05-25T04:37:41+5:302021-05-25T04:37:41+5:30

बीड : मागील १४ महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव आणि त्यानंतर उद्रेक सुरूच आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात बारावीचे वर्ग सुरू झाले. ...

What are the options for 12th standard exam? Governance in consideration; Students in confusion! | बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

बारावीच्या परीक्षेवर पर्याय काय? शासन विचारात; विद्यार्थी संभ्रमात !

बीड : मागील १४ महिन्यांपासून कोरोनाचा शिरकाव आणि त्यानंतर उद्रेक सुरूच आहे. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्षात बारावीचे वर्ग सुरू झाले. पालक आणि विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मिळाल्याने कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करून घेतले. परीक्षेची तारीख ठरली. परीक्षा मंडळाकडून नियोजन सुरू झाले. उत्तरपत्रिका व इतर पूरक साहित्य संबंधित उच्च माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयांना पुरवठा केले. मात्र, मार्चमध्ये कोरोनाचा उद्रेक दिल्लीपासून गल्लीपर्यंत वाढला. केंद्रीय शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षा रद्द केल्या, तर बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय घेतलेला नाही. राज्य सरकारही तसेच पाऊल टाकत आहे. येत्या काही दिवसांत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. मात्र, विद्यार्थी व पालक परीक्षेबाबत संभ्रमात आहेत. ऑफलाईन परीक्षेचा घाट घालून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, पालक यांचे जीव धोक्यात घालू नयेत, असा सूर एकीकडे असताना ऑनलाईन अथवा ऑफलाईन कशीही घ्या, पण परीक्षा घ्याव्यात, असा सूर दुसरीकडे उमटत आहे.

काय असू शकतो पर्याय?

सध्या कोरोना संसर्गामुळे विद्यार्थी वर्ग लसीकरणाअभावी धोकादायक टप्प्यात आहे. बारावीच्या परीक्षेतील गुणांवर आता काहीही अवलंबून नाही. सर्व शाखेतील प्रवेशांकरिता स्वतंत्र प्रवेश परीक्षा आहेत. तेव्हा बारावी परीक्षेकरिता गर्दी जमवून विषाची परीक्षा घेण्यात काही हशील नाही. विद्यापीठाप्रमाणे ऑनलाईन परीक्षा घ्याव्यात. प्रात्यक्षिक परीक्षा मौखिक चाचणीद्वारे घ्यावी. या वर्षी जीव वाचवून शैक्षणिक व्यवस्था टिकवणे एवढेच करता आले तरी पुरे. - विवेक मिरगणे, प्राचार्य, बंकटस्वामी महाविद्यालय, बीड.

-----

इयत्ता बारावीचे वर्ष उच्च शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग, व्यवसाय अभ्यासक्रमांना प्रवेशासाठी या परीक्षेतील गुणवत्ता खूप महत्त्वाची आहे. आज विद्यार्थी, पालक संभ्रमावस्थेत आहेत. कोरोना महामारीमुळे परीक्षा घेणे बोर्ड प्रशासनाला शक्य होत नसले तरी या बाबतीत निर्णय लवकरात लवकर घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात जाणार नाही याबाबत गांभीर्याने पाहावे लागेल. - प्रदीप देशमुख, प्राचार्य, स्वा. सावरकर महाविद्यालय, बीड.

------

आमचा विचार करा, परीक्षा लवकर घ्या

सध्याची परिस्थिती पाहता परीक्षा घेणे शक्य नाही; पण विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी परीक्षा घेणे आवश्यक आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तरी योग्य ते निर्बंध लावून परीक्षा घ्यावी. - कौस्तुभ मुळे, विद्यार्थी,

-------

तारीख निश्चित करून परीक्षा लवकरात लवकर व्हाव्यात. कोरोनाची भीती आहे. मात्र, अभ्यास केलेला असल्याने व परीक्षा होत नसल्याने कंटाळून गेलो आहोत. कशाही प्रकारे परीक्षा घेऊन अनिश्चितता संपवावी. - आयुष हावळे, विद्यार्थी.

---------

बारावीच्या परीक्षा होणे आमच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने गरजेचे आहे. कोरोना, म्युकरमायकोसिस व उद्भवणारे संसर्गजन्य रोग लक्षात घेता विद्यार्थ्यांचे आरोग्य व त्यांची मानसिकता लक्षात घेऊन सरकारने परीक्षा ऑनलाईन घ्यायला हव्यात. - गौरव देशपांडे, विद्यार्थी.

---------

असे असू शकतात पर्याय

तिन्ही शाखांच्या मुख्य तीन विषयांची परीक्षा घेऊन त्याआधारे इतर विषयांचे गुणांकन करावे किंवा एक भाषा व इतर तीन विषयांची परीक्षा व्हावी. ९० मिनिटांचा वेळ द्यावा, प्रश्नपत्रिकेचे स्वरूप ऑब्जेक्टिव्ह असावे. पहिल्या टप्प्यात कोरोनाचा उद्रेक जेथे नाही तेथे व नंतर इतरत्र परीक्षा घेण्यात यावी, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

------------

Web Title: What are the options for 12th standard exam? Governance in consideration; Students in confusion!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.