जलवाहिनीस गळती; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2019 00:12 IST2019-02-11T00:11:05+5:302019-02-11T00:12:56+5:30
माजलगाव धरणातून बीड शहरात आणलेल्या जलवाहिनी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील म्हाळस जवळा परिसरात लिकेज झाली आहे.

जलवाहिनीस गळती; लाखो लिटर पाण्याचा अपव्यय
बीड : माजलगाव धरणातून बीड शहरात आणलेल्या जलवाहिनी शहरापासून अवघ्या पाच किमी अंतरावरील म्हाळस जवळा परिसरात लिकेज झाली आहे. यातून लाखो लिटर पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे या व्हॉल्वचे पाणी टँकरमध्ये भरून त्याची विक्री केली जात असल्याचे समोर आले आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही बीड पालिका याकडे लक्ष देत नसल्याने संताप व्यक्त होत आहे.
माजलगाव धरणातून सध्या बीड शहराला पाणी पुरवठा केला जातो. ठिकठिकाणी एअर जाण्यासाठी व्हॉल्व काढलेले आहेत. मात्र मागील अनेक दिवसांपासून अनेक व्हॉल्वमधून लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. विशेष म्हणजे याबाबत नागरिकांनी अनेकवेळा पालिकेकडे तक्रारी केल्या, मात्र त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. मागील अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असतानाही पालिका याकडे का दुर्लक्ष करीत आहे, याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
लिकेजबाबत पाणीपुरवठा अभियंत्यांकडून तात्काळ माहिती घेतली जाईल. लिकेज असल्यास तात्काळ दुरूस्त करून पाणी अपव्यय थांबविला जाईल. आम्ही लागलीच कामाला लागू.
- राहुल साठे
उपमुख्याधिकारी, न.प.बीड