६५ जनावरे दगावल्यानंतर पशुसंवर्धनचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:37+5:302021-05-30T04:26:37+5:30
अविनाश कदम आष्टी : तालुक्यातील जनावरांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असतानाच ६ गावांच्या परिसरात गायी-वासरांना घटसर्प आजाराची लागण झाल्याने ...

६५ जनावरे दगावल्यानंतर पशुसंवर्धनचे लसीकरण
अविनाश कदम
आष्टी : तालुक्यातील जनावरांवर विविध आजारांचा प्रादुर्भाव होत असतानाच ६ गावांच्या परिसरात गायी-वासरांना घटसर्प आजाराची लागण झाल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून या गावातील लहान मोठी एकूण ६५ जनावरे दगावली असल्याची पुष्टी तालुका पशुसंवर्धन अधिकारी मंगेश ढेरे यांनी दिली आहे. तर जनावरांच्या मृत्यूमुळे ६० ते ७० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
मागील ४ ते ५ दिवसांपासून जनावरे मृत्यू पावत आहेत. या जनावरांना घटसर्प या रोगाची लागण झाल्याचे समोर आले आहे. पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेली लाखो रुपयांची जनावरे डोळ्यासमोर मृत झाल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या गावांना औरंगाबाद येथील प्रादेशिक पशुरोग निदान प्रयोगशाळा सहाय्यक आयुक्त प्रमोद चौधरी, डॉ. रोहित धुमाळ,डाॅ. वानखेडे यांनी २८ मे रोजी भेट दिल्यानंतर आष्टी पशुसंवर्धन विभागाने पथके तैनात करून तत्काळ जलदगतीने काही गावांचे लसीकरण पूर्ण केले आहे, तर काही गावांमध्ये सुरू आहे.
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय देशमुख, डॉ. संतोष शामदीरे, तालुका पशुवैद्यकीय अधिकारी मंगेश ढेरे यांनी तवलवाडी गावाला भेट देऊन संबंधित शेतकऱ्यांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. एकूण ६५ मृत जनावरांचे शवविच्छेदन करून त्यांचे नमुने औरंगाबाद व पुणे येथील पशुधन रोग निदान प्रयोगशाळेत पाठविल्याचे सांगण्यात आले. आमदार सुरेश धस यांनीही घटनेची माहिती मिळताच तत्काळ तवलवाडीला भेट देऊन ग्रामस्थांना धीर दिला.
घटसर्प आजाराने बाधित गावे
आष्टी तालुक्यातील तवलवाडी,पांढरी,जामगांव, देवीगव्हाण, वाळुंज, सोलेवाडी या गावातील जनावरे घटसर्प या आजाराने दगावली आहेत. मृत पावलेल्या जनावरांची विल्हेवाट खोल खड्डा खोदून चुना टाकून लावावी. पशुसंवर्धन विभाग या आजाराचा संसर्ग रोखण्यासाठी घटनास्थळी तळ ठोकून आहे.
पशुधन वाचविण्यासाठी कटिबद्ध
पशुसंवर्धन विभाग आष्टीच्यावतीने पुणे येथून लस उपलब्ध केली असून लसीकरणासाठी बाधित गावांमध्ये पथके तैनात करून लसीकरण करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी जनावरांना स्वच्छ चारा, स्वच्छ पाणी पाजावे. शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये. आपले पशुधन वाचविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.
- मंगेश ढेरे, तालुका पशुसंवर्धन अधिकारी, आष्टी.
घटसर्प बाधित गावांमध्ये लसीकरण
घटसर्प आजारामुळे फुफ्फुसदाह होऊन जनावरे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जास्त आहे. या आजाराला आळा घालण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तत्काळ लसीकरण मोहीम हाती घेऊन वाळुंज, जामगांव, देविगव्हाण, तवलवाडी परिसरात ४ डाॅक्टरांचे प्रत्येकी १ पथक तैनात केले असून शनिवारी सकाळी ८ वाजल्यापासून लसीकरण सुरू केले. रविवारपर्यंत लसीकरण पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.
कोणत्या गावातील किती जनावरे दगावली
गाव - मोठे - लहान
पांढरी - ०३ - ०२
तवलवाडी ३१ - २३
सोलेवाडी ०२ - ००
देविगव्हाण ०२ - ०१
जामगांव ०१ - ००
एकूण ३९ - २६
-----------------
===Photopath===
290521\img-20210529-wa0324_14.jpg