अनावश्यक शस्त्र परवान्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:21 IST2021-07-03T04:21:59+5:302021-07-03T04:21:59+5:30
बीड : मागील काही वर्षांपासून शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या वाढली, जिल्ह्यात आतापर्यंत १०९८ शस्त्रपरवाने प्रशासनाने दिले आहेत. मागील काही ...

अनावश्यक शस्त्र परवान्यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी वाढली
बीड : मागील काही वर्षांपासून शस्त्र परवाना घेणाऱ्यांची संख्या वाढली, जिल्ह्यात आतापर्यंत १०९८ शस्त्रपरवाने प्रशासनाने दिले आहेत. मागील काही महिन्यांत अनेक वेळा हवेत गोळीबार केल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत. तसेच पिस्टलचा धाक दाखवल्याचे गुन्हेदेखील दाखल झालेले आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या परवानाधारकांचे शस्त्र परवाने पडताळणी करून रद्द करण्याची गरज आहे.
स्वत:च्या सुरक्षेसाठी शस्त्र वापरण्याचा परवाना पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयातून दिला जातो. काही वर्षांपूर्वी मोजक्याच लोकांकडे शस्त्र परवाने होते. मात्र, मागील काही वर्षांत अनावश्यक व्यक्तींनादेखील शस्त्र परवाने देण्यात आले आहेत. दरवर्षी या शस्त्र परवान्याचे नूतनीकरण होत असले तरीदेखील संबंधित व्यक्तीला शस्त्र परवान्याची गरज आहे का, कोणत्या कारणासाठी परवाना घेतला आहे, याची सर्व माहिती घेणे आवश्यक आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील गुन्हेगारीमध्ये शस्त्रांचा वापर वाढला आहे, तर अनेक पोलीस ठाण्यांत परवानाधारकाने शस्त्र दाखवून धाक दाखवल्याचे गुन्हेदेखील दाखल करण्यात आलेले आहेत. त्यामुळे अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या किंवा परवानाधारक शस्त्राचा गैरवापर करणाऱ्यांचे परवाने रद्द करणे गरजेचे आहे.
परवान्याचे आर्थिक गणित
जिल्हाधिकारी कार्यालयत शस्त्र परवाना देण्यासाठी राजकीय नेत्यांच्या शिफारसीचा वापर केला जातो. त्यानंतर सूत्रांच्या माहितीनुसार काही खासगी व्यक्तींच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी ‘अर्थपूर्ण’ व्यवहारातून शस्त्रपरवाने दिले गेल्याची माहिती आहे. त्यामुळे या परवान्यांची संख्यादेखील २०१० नंतर वाढली आहे.
नियम कडक करण्याची आवश्यकता
शस्त्र परवाने घेेणाऱ्यांची संख्या वाढल्याने परवाने देताना नियम अधिक कडक करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अनावश्यक व्यक्तींना शस्त्र परवाने दिल्यास या शस्त्रांचा गैरवापर होण्याची शक्यता जास्त असते. तसे काही प्रकारदेखील घडल्याचे समोर आलेले आहे.
शस्त्रांचा वाढला वापर
जिल्ह्यात मागील काही वर्षांमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्याविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाण्यांकडून कारवाईदेखील करण्यात आलेली आहे. सशस्त्र दरोडा किंवा वाटमारी करण्यासाठी शस्त्राचा वापर केल्याचे काही गुन्ह्यांत समोर आले आहे. दरम्यान, विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांवर केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसला आहे.
शस्त्र बाळगणे कठीणच
१ दरवर्षी दिलेल्या शस्त्र परवान्यांचे नूतनीकरण केले जाते. शस्त्र परवाना ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे तेथील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून या परवान्यांची पडताळणीदेखील वेळोवेळी केली जाते.
२ निवडणुका किंवा इतर काही कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर ही शस्त्रे जमा करावी लागतात. जमा केली नाही तर कारवाई केली जाते. शस्त्र हरवले व त्याचा गैरवापर झाला तर सर्वस्वी जबाबदार परवानाधारक असतो. त्यामुळे शस्त्र बाळगणे कठीण आहे. तर, शीघ्रकोपी व्यक्तीच्या जवळ शस्त्र असेल तर तो त्याचा कधीही गैरवापर करण्याची भीती कायम असते.
डीएसबीकडे माहितीच नाही
पोलीस अधीक्षक कार्यालयातील डीएसबी शाखेत परवानाधारक शस्त्राच्या संदर्भात सर्व माहिती असते. मात्र, माहितीसाठी फोन केल्यानंतर डीएसबी विभागाचे प्रमुख पो.नि. वासुदेव मोरे यांनी परवानाधरक शस्त्रांच्या संदर्भात माहिती उपलब्ध नसल्याचे सांगितले.
जिल्ह्यातील परवानाधारक
१०९८