जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनी ५ जून रोजी वृक्षलागवड मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:47+5:302021-05-30T04:26:47+5:30
बीड : जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे वृक्षलागवडीची अंमलबजावणी ...

जिल्ह्यात जागतिक पर्यावरण दिनी ५ जून रोजी वृक्षलागवड मोहीम
बीड : जिल्ह्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येणार असून ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व यंत्रणांनी कार्यक्षमपणे वृक्षलागवडीची अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी केले आहे.
यावर्षी कोरोना साथीच्या दुसऱ्या लाटेत प्राणवायू ऑक्सिजनअभावी होणारे रुग्णांचे हाल सर्वांना दिसले आहेत. त्यामुळे नैसर्गिकरीत्या प्राणवायूची निर्मिती करणाऱ्या वृक्षांचे महत्त्व आपण सर्वांनी जाणले आहे. वातावरणातील नैसर्गिक प्राणवायूचे प्रमाण वाढविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीमागे तीन झाडे लावणे व त्यांचे संगोपन करणे यासाठी वृक्षलागवड कार्यक्रम संपूर्ण मराठवाडा विभागात राबविण्यात येणार असून, यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी नुकत्याच विविध सूचना केल्या आहेत.
जिल्हाधिकारी जगताप यांनी याबाबत जिल्ह्यातील सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, मुख्याधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रतिमाणसी तीन तीन वृक्षरोपांची लागवड करण्याबाबत सर्वांना सूचना दिलेल्या आहेत. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत पातळीवर प्रत्येक ग्रामपंचायतीने, तर नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रात मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्याकडील मोकळ्या सार्वजनिक जागेवर प्रतिमाणसी तीन वृक्षारोपण करावयाचे आहे. ग्रामीण भागासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या पर्यवेक्षणाखाली सर्व ग्रामपंचायतींना सामाजिक वनीकरण आणि वन विभागाकडून रोपे उपलब्ध करून देण्यात येतील.
सर्व नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येकी किमान एक घन वृक्षलागवड म्हणजे मियावाकी करणे बंधनकारक असून, रस्त्याच्या दुतर्फा, नदीनाल्याच्या बाजूला, सार्वजनिक विहिरीजवळ, शेतकऱ्यांच्या बांधावर, पडीक जमिनीवर वृक्षलागवडीचे नियोजन करावे, असेही जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
विभागीय आयुक्तांच्या आदेशानुसार वृक्षलागवड मोहिमेसाठी उपजिल्हाधिकारी रोहयो व उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हे नोडल अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत. जिल्ह्यातील सर्व विभागांचे सर्व अधिकारी, कर्मचारी, निसर्गप्रेमी, एनजीओ या सर्वांचाच सक्रिय सहभाग आवश्यक असणार आहे .
दुर्लक्ष केल्यास होणार कारवाई
वृक्षलागवड मोहिमेकडे दुर्लक्ष करणारे अधिकारी, कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई केली जाणार असून, उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सन्मान केला जाणार आहे. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिनी सर्व नगर परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये किमान शंभर रोपे लावून प्रारंभ करावा
रवींद्र जगताप, जिल्हाधिकारी बीड