एरंडीच्या बिया खाल्ल्याने हिवरगव्हाणच्या ९ मुलांना विषबाधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 00:05 IST2019-03-18T00:04:13+5:302019-03-18T00:05:35+5:30
रविवारी शाळेला सुट्टी असल्याने क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलांनी शेंगदाणे समजून एरंडीच्या बिया खाल्या. यामुळे ९ मुलांना त्रास सुरू झाला.

एरंडीच्या बिया खाल्ल्याने हिवरगव्हाणच्या ९ मुलांना विषबाधा
बीड : रविवारी शाळेला सुट्टी असल्याने क्रिकेट खेळायला गेलेल्या मुलांनी शेंगदाणे समजून एरंडीच्या बिया खाल्या. यामुळे ९ मुलांना त्रास सुरू झाला. त्यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे. वडवणी तालुक्यातील हिवरगव्हाण येथे रविवारी सायंकाळी ही घटना घडली.
रोहन लक्ष्मण नखाते (१५), अभिषेक अनुरथ नाईकवाडे (११), अजय रतन नाईकवाडे (१५), जयराम जालिंदर गायकवाड (१४), चैतन्य ज्ञानोबा नाईकवाडे (१३), मकरध्वज हनुमान नाईकवाडे (१५), रावसाहेब अंगद शिनगारे (१५), धर्मराज हनुमान नाईकवाडे (१२) व शुभम हनुमान नाईकवाडे (१२) अशी रूग्णालयात दाखल असलेल्या मुलांची नावे आहेत. रविवारी शाळेला सुट्टी होती. त्यामुळे ही मुले गावाजवळीच मैदानावर क्रिकेट खेळायला गेली. एक डाव झाल्यानंतर एका झाडाखाली बसले.
याचवेळी एकाने शेंगदाणे समजून एरंडीच्या बिया खाल्या. त्याचे अनुकरण इतरांनीही केले. सायंकाळच्या सुमारास या मुलांना मळमळ, उलटीचा त्रास सुरू झाला. पालकांनी त्यांना तात्काळ वडवणीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. प्राथमिक उपचार करून या सर्वांनाच जिल्हा रूग्णालयात पाठविण्यात आले.
येथे डॉक्टरांनी सर्वच मुलांवर उपचार केले असून सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. पुढील काही तास हे सर्व मुले वैद्यकीय तज्ज्ञांच्या देखरेखीखाली असणार असल्याचेही सांगण्यात आले.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घेतली धाव
४अन्नातून मुलांना विषबाधा झाल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे व ऋषीकेश मरेवार यांना मिळाली. त्यांनी तात्काळ रूग्णालयात धाव घेतली. येथे आल्यानंतर खरा प्रकार समजला. तरीही त्यांनी या सर्वांचे जबाब नोंदविले आहेत. भिसे उशिरापर्यंत रूग्णालयात तळ ठोकून होते.