राज्याने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल द्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:22 IST2021-07-04T04:22:57+5:302021-07-04T04:22:57+5:30
सुरेश धस : आरक्षणप्रश्नी तरुणांची दिशाभूल करू नका लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज ...

राज्याने मराठा समाज मागास असल्याचा अहवाल द्यावा
सुरेश धस : आरक्षणप्रश्नी तरुणांची दिशाभूल करू नका
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : घटनेच्या १०२ व्या दुरुस्तीनंतर एखादा समाज मागास असल्याचे ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारचा आहे. असे असले तरी राज्य सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा समाज मागास असल्याचा अहवाल पाठविल्याशिवाय केंद्र सरकार निर्णय घेऊ शकत नाही. संबंधित जात मागास ठरल्यानंतर आरक्षणाचा कायदा करण्याचा अधिकार राज्य सरकारचाच आहे. यामुळे मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी तरुणांची दिशाभूल करू नये, असे प्रतिपादन भाजपचे आमदार सुरेश धस यांनी शुक्रवारी (दि २) आष्टी येथे पत्रकार परिषदेत केले.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारचा आहे. असे सांगत राज्य सरकार स्वस्थ बसले तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. अजूनही अहवाल मिळविण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने अजूनही प्रक्रिया सुरू केलेली नाही. महाविकास आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या न्या. दिलीप भोसले यांच्या समितीच्या अहवालात हा मुद्दा आला आहे. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोग का नाकारला, हे ध्यानात घेऊन त्यासंबंधीचे २५ मुद्दे भोसले समितीने निश्चित केले आहेत. त्यानुसार महाविकास आघाडी सरकारने तातडीने राज्य मागासवर्ग आयोगाकडे नव्याने अहवाल घ्यावा. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोगाचा अहवाल नाकारल्यामुळे मराठा समाज मागास असल्याचा आयोगाचा अहवाल नव्याने मिळविणे आवश्यक आहे. त्याबाबत राज्य सरकार चालढकल करीत राहिले, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही, असेही आमदार धस यांनी सांगितले. कोणीही बीड जिल्ह्यात यायचे अन् टिकली मारून जायचे, अशी टीकाही त्यांनी कोणाचे नाव न घेता केली.