तर बीडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:23 IST2021-06-03T04:23:49+5:302021-06-03T04:23:49+5:30
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असलेतरी गाफिल न राहता नागरिकांनी १५ जूनपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे नसता पुन्हा ...

तर बीडमध्ये पुन्हा कडक लॉकडाऊन
बीड : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण कमी होत असलेतरी गाफिल न राहता नागरिकांनी १५ जूनपर्यंत प्रशासनाला सहकार्य करावे नसता पुन्हा कडक लॉकडाऊनला सामोरे जावे लागेल, अशी तंबी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिली. लॉकडाऊनच्या शिथिल वेळेत विनाकारण कोणी फिरू नये, गर्दी करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.
जिल्ह्यातील कोविड-१९ रुग्णसंख्या मागील काही दिवसांपासून कमी होत असताना दिसत आहे त्या अनुषंगाने एक जूनपासून लॉकडाऊन शिथिल करण्यात आले आहे. परंतु या कालावधीत लोक नियम पाळताना दिसून येत नाहीत. त्यामुळे गर्दी वाढून रुग्ण संख्येत भर पडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे तसेच लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर विनाकारण युवक, नागरिक रस्त्यावर व शासकीय कार्यालयात दिसून येतात ही गंभीर बाब असल्याचे जगताप म्हणाले.
सद्य:स्थितीमध्ये कोविड-१९ ची रुग्णसंख्या जरी कमी असली तरी गर्दी केल्यास अथवा कोविडच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास पुन्हा कोविडचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे पुन्हा कडक लॉकडाऊन लावण्याची वेळ येऊ शकते किंवा कडक लॉकडाऊन केला जाईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.
बेशिस्त वागणारे लोक नागरिकांच्या वागणुकीचा परिणाम सर्व समाजाला त्रासदायक होऊ शकतो. सर्व लोकांनी सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून कोविडच्या नियमांचे पालन करावे. १५ जूनपर्यंत शासनास सहकार्य करावे.
एकाचवेळी दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये. शासकीय कार्यालयात विनाकारण फिरू नये. सामाजिक अंतर ठेवावे तसेच मास्क वापरावे. गर्दीमध्ये जाण्याचे टाळावे, आदी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. यापुढे कोविडविषयक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नियमानुसार गुन्हा नोंद करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.
व्यापाऱ्यांनी सामाजिक भान ठेवावे
व्यापाऱ्यांनी दुसऱ्या व्यावसायिकांकडे लक्ष देण्याऐवजी आपण स्वतः सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून विनापरवानगी दुकाने उघडू नयेत, याची गंभीर दखल घेण्यात येईल तसेच नियमानुसार कारवाई करण्यात येईल. कोविड-१९ ची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनी प्रत्येक ठिकाणी सामाजिक अंतर व शिस्तीचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
--------
अर्धवट शटर उघडून व्यवसाय सुरूच
पंधरा दिवसांनंतर लॉकडाऊन शिथील केल्यानंतर केवल अत्यावश्यक वस्तू, बेकरी, खाद्यपदार्थ, किराणा, भाजी, फळे विक्रीस मुभा दिलेली असताना कापड, पादत्राणे, जनरल स्टोअर्स, प्लास्टिक, सिमेंट, बांधकाम साहित्याची दुकाने अर्धे शटर उघडून व्यवसाय केले जात असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. बुधवारी सुभाष रोडवर अनेक दुकाने अर्धवट उघडी होती तर काही दुकानांच्या बाहेर एक व आत एक व्यक्ती थांबून व्यवसाय करत असल्याचे दिसून आले. काही दुकानांवर कारवाई करण्यात आल्या तर काहींकडे दुर्लक्ष झाले तसेच जिम, व्यायामशाळा, हॉटेलला परवानगी नसताना सर्रासपणे हे व्यवसाय कोविड नियमांचे उल्लंघन करत सुरू होते.
--------
सील केलेली दुकाने बंदच
लॉकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन केल्याने प्रशासनाकडून काही दुकानांना सील ठोकण्यात आले. पंधरा दिवसांनंतर लॉकडाऊन शिथिल झाले, परंतु सील ठोकलेली दुकाने बंदच हाती. नियम मोडल्याने व प्रशासनाच्या कारवाईमुळे व्यावसायिकांवर ही वेळ आली. त्यामुळे लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करून घरात राहणेच योग्य राहील, अशा प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या.
-----------