ऊर्ध्व कुंडलिकाने फुलवले बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:30 IST2021-08-01T04:30:49+5:302021-08-01T04:30:49+5:30
वडवणी : उर्ध्व कुंडलिका धरण भरले आणि वडवणी, धारूर तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले. पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच ...

ऊर्ध्व कुंडलिकाने फुलवले बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य
वडवणी : उर्ध्व कुंडलिका धरण भरले आणि वडवणी, धारूर तालुक्यातील बळीराजाच्या चेहऱ्यावरील हास्य फुलले. पिण्याच्या पाण्याची सोय तर झालीच शिवाय शेतीसाठी पाणीही मिळणार असल्यामुळे ते सुखावले. यावर्षी पहिल्याच्या टप्यात हा प्रकल्प तुडुंब भरून ओसंडून जातोय. तालुक्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरला आहे. वडवणी तालुका हा कायम दुष्काळाच्या खाईत असायचा मात्र अप्पर ऊर्ध्व कुंडलिका धरणामुळे या तालुक्याचे नंदनवन झाले आहे.
या प्रकल्पातील प्रकल्पीय पूर्णसाठा क्षमता १८.७७ द.श.घ.मी.असून, जलाशयाची पूर्ण पाणी पातळी ५३७ मीटर आहे. या प्रकल्पातील जिवंत पाणी साठा १५.५७ द.श.घ.मी. असून, ३० जुलै रोजी या धरणात ५३६.३५ पाणीसाठा आहे. तालुक्यातील जवळपास २ हजार ८०० हेक्टर शेती या धरणाच्या पाण्यामुळे ओलिताखाली आल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच हा तलाव पूर्णक्षमतेने भरत असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे. हवामान खात्याच्या इशारानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, या धरणात पाण्याची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे येणारे पाणी हे कुंडलिका नदीपात्रात सोडावे लागत आहे. याबाबत बीड पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता अजय गुजर म्हणाले की, हवामान खात्याच्या इशाऱ्यानुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) अतिवृष्टी होण्याची शक्यता असून, धरणात येणाऱ्या येव्यामुळे (Inflow) धरण निर्धारित पातळीत भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यानंतर येणारा येवा कुंडलिका नदीपात्रात सोडावा लागणार आहे. धरणात येणाऱ्या येवा पाहता आजची ५३६.३५ मीटर या पातळीनंतर येणाऱ्या येव्याचा विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. याबाबत तहसीलदार प्रकाश सिरसेवाड म्हणाले की तलावाची पाहणी केली असून, जवळपास ९० टक्के भरलेले आहे. ९० टक्के धरणाची पातळी ५३६.४५ असून, कधीही पाऊस पडला की धरणातून पाणी सोडले जाईल. नदी काठावरील गावांना, नागरिकांना याबाबत कळविले आहे.
असलेले वरदान ठरलेले ऊर्ध्व कुंडलिका धरण गेल्या पंधरा दिवसांपासून पडणाऱ्या सतत पावसामुळे या धरणाच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होऊन धरणात ३० जुलै रोजी ८९.९५ टक्के पाणीसाठा असून, पूर्णक्षमतेने भरत असल्यामुळे येणाऱ्या पाण्याचा निसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने या धरणाचे दरवाजे उघडण्यात येत असल्यामुळे नदीकाठच्या गावांना व शेतकऱ्यांना आणि नदीशेजारी वस्ती करून राहणाऱ्या लोकांना जिल्हा प्रशासनाने व तालुका प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत.
310721\rameswar lange_img-20210720-wa0026_14.jpg~310721\rameswar lange_img-20210720-wa0025_14.jpg