राजकीय पुढाऱ्यांनी हेवेदावे सोडून पंतप्रधानांची भेट घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:23 IST2021-07-04T04:23:23+5:302021-07-04T04:23:23+5:30
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता घटनादुरुस्ती आणि वटहुकूम हेच पर्याय आहेत. मराठा समाजाला न्याय द्यायचे ...

राजकीय पुढाऱ्यांनी हेवेदावे सोडून पंतप्रधानांची भेट घ्यावी
बीड : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आता घटनादुरुस्ती आणि वटहुकूम हेच पर्याय आहेत. मराठा समाजाला न्याय द्यायचे काम पंतप्रधानांनी करावे, राज्यातील सर्व खासदारांनी आपले राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यावी, मराठा समाजाचे आरक्षणासाठीचे ५८ मोर्चे जगाने बघितले आहेत. आता पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज नाही. कोरोनाचा काळ आहे, परिस्थिती गंभीर आहे. हजारो लोक मृत्युमुखी पडले आहेत. समाजाने नव्हे तर आता लोकप्रतिनिधींनी बोलण्याची गरज आहे, असे खा. संभाजीराजे भोसले यांनी बीडमध्ये म्हटले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खा. संभाजीराजे भोसले सध्या जनसंवाद दौऱ्यावर आहेत. शनिवारी बीडमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणात मराठा समाजाचा समावेश होता. आता मराठा आरक्षणासाठी केंद्राने आणि राज्याने आपापली जबाबदारी घेतली पाहिजे. मी शिव आणि शाहूचा वारसदार आहे. अठरापगड जाती बहुजन समाजाला एकत्रित ठेवणे ही माझी जबाबदारी आहे. मला मुख्यमंत्री व्हायचे नाही, माझा छत्रपती घराण्यात जन्म झाला हाच माझा मोठा बहुमान आहे. सर्वच राजकीय पुढाऱ्यांनी हेवेदावे सोडून योग्य मार्ग काढण्यासाठी एकत्रित यावे, गायकवाड-भोसले समितीने काढलेल्या त्रुटी पूर्ण करण्यात याव्यात. राज्यपालांना विनंती करून त्यांनी राष्ट्रपतींना शिफारस केली तर ३४२ (अ) च्या माध्यमातून केंद्रीय मागास वर्ग आयोग आणि राज्य मागासवर्ग आयोग यांनी एकत्रित अहवाल राष्ट्रपतींकडे पाठवावे, राष्ट्रपतींना तो अहवाल योग्य वाटला तर तो पार्लमेंटकडे पाठवता येईल आणि वटहुकूम काढता येईल, असे खा. संभाजीराजे भोसले म्हणाले.