खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST2021-05-30T04:26:40+5:302021-05-30T04:26:40+5:30
पुरुषोत्तम करवा माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते. एकीकडे पुढे काम सुरू ...

खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावर खड्डे
पुरुषोत्तम करवा
माजलगाव : तालुक्यातून जात असलेल्या खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम दोन वर्षांपूर्वी झाले होते. एकीकडे पुढे काम सुरू असतानाच काम झालेल्या ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडत होत्या, तर पूल असलेल्या ठिकाणी मोठमोठे जम्प झाल्याने वाहने आदळत आहेत. जागोजागी खड्डे दिसू लागल्याने या नवीन रस्त्यावर आता अपघातास निमंत्रण मिळणार आहे.
विदर्भ व पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा खामगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाला पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली होती. या कामाला तत्काळ सुरुवात करण्यात आली होती. या महामार्गावरील माजलगाव ते तेलगाव व माजलगाव ते परतूर या ५०-५० किलोमीटरच्या अंतरासाठी वेगवेगळ्या कंपनीला टेंडर देण्यात आले होते. माजलगाव ते केज हे काम घेणाऱ्या कंपनीने हे काम ओबडधोबड करत दीड वर्षाच्या आत उरकून घेतले होते. या कंपनीने तर माजलगाव शहरातील रस्त्याची पूर्णपणे वाट लावत अत्यंत नित्कृष्ट दर्जाच्या नाल्या व रस्ता केल्याचा आरोप नागरिकांनी वारंवार केला होता; परंतु संबंधित कंपनीने कोणाचेही न ऐकता काही राजकीय मंडळीना हाताशी धरून रस्त्याची कामे उरकून घेतली होती. या रस्त्याचे काम पुढे चालू असताना आधी केलेल्या रस्त्याला भेगा पडत होत्या. संबंधित कंपनीने भेगा पडलेल्या ठिकाणी रस्ता फोडून तो दुरुस्त करण्याऐवजी त्यात डांबर व वाळू भरल्याने जागोजागी जम्प झाले आहेत, तर ज्या ठिकाणी पूल करण्यात आला आहे, त्या ठिकाणी रस्ता खाली-वर झाल्याने वेगाने जाणारी वाहने आदळत आहेत.
माजलगाव -केज रस्त्याबरोबरच माजलगाव-परतूर रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. हे काम अत्यंत संथगतीने सुरू आहे. या रस्त्याच्या कामाला सुरुवात होऊन साडेतीन- चार वर्षे झाली. याचा दर्जादेखील अतिशय नित्कृष्ट होत असल्याचा आरोप या भागातील नागरिकांनी केला होता, तर हा रस्ता सुरू असताना पाठीमागे झालेल्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगादेखील पडलेल्या आहेत.
माजलगाव शहरापासून दोन्ही बाजूला झालेल्या व चालू असलेल्या रस्त्याचे काम अतिशय नित्कृष्ट असताना एकही राजकीय, सामाजिक नेते-कार्यकर्ते बोलायला तयार नाहीत.
केंद्र सरकारने तयार केलेल्या राष्ट्रीय महामार्गाला ५० वर्ष काहीच होणार नाही, असे एकीकडे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे सांगत आहेत; परंतु खामगाव-पंढरपूर या वारी मार्गाला पाच वर्षांच्या आतच तडे जाऊन खड्डे पडू लागले आहेत. यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांच्या अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
===Photopath===
290521\img_20210527_133346_14.jpg~290521\img_20210527_132229_14.jpg