मोरांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:34 IST2021-04-04T04:34:49+5:302021-04-04T04:34:49+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सर्वत्र मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने ...

The number of peacocks increased | मोरांची संख्या वाढली

मोरांची संख्या वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात सर्वत्र मोरांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यावर्षी पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्याने व नद्या-नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठल्याने नदीकाठी व शेतात दररोज सकाळी मोरांचे आवाज घुमत आहेत. अंबाजोगाई शहरात मुकुंदराज परिसर व मांडवा परिसरात वन विभागाचे मोठे जंगल आहे. या जंगलात तर मोरांची संख्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जाणारे ज्येष्ठ नागरिक मोरांसाठी धान्य घेऊन जातात. निसर्गाच्या वातावरणात मोरही अनेकदा पिसारा फुलवून नाचतात. हे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी शहरवासीयांचीही मोठी गर्दी होते. शहरवासीयांनी वाढत्या उन्हातही मोरांना चारा उपलब्ध करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. राजेश गुप्ता यांनी केले आहे.

आरोग्याची काळजी घ्या

अंबाजोगाई : सध्या वातावरणात बदल झाल्याने व उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत चालल्याने आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यातच अंबाजोगाई तालुक्यातील कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अनेक नागरिकांना सर्दी, ताप येणे, मळमळणे असे विविध आजार जाणवू लागले आहेत. या आजारांपासून बचाव करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या तसेच कोरोनाची साथ सुरू असल्याने लक्षणे आढळतात. रुग्णालयात जाऊन कोरोनाची तपासणी करा व स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या, असे आवाहन प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. राहुल धाकडे यांनी केले आहे.

रिकाम्या बाटल्यांमुळे डोकेदुखी वाढली

अंबाजोगाई : सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अंबाजोगाई शहरातील मुकुंदराज परिसर, रेणुकादेवी परिसर, बाराखांबी परिसर व वन विभागातील वृक्षाच्या खाली प्लास्टिकच्या ग्लासांसह रिकाम्या मद्याच्या बाटल्यांचा मोठा खच पडला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे अनेक मद्यपी आपली पिण्याची हौस भागविण्यासाठी या निसर्गरम्य वातावरणाचा सहारा घेऊ लागले आहेत. मद्यपान करून रिकाम्या बाटल्या या परिसरात फेकून तो परिसर अस्वच्छ करू लागले आहेत. अशा मद्यपींवर पोलिसांनी करडी नजर ठेवावी, अशी मागणी शहरवासीयांमधून होऊ लागली आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन, कारवाई सुरू

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन व स्थानिक पोलीस यंत्रणेकडून शहरात पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला आहे. सकाळी ७ ते १ यावेळेत शहरवासीयांसाठी लॉकडाऊन शिथील करण्यात आले आहे. मात्र, दुपारी एकनंतर रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या युवकांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. जे नागरिक नियमांचे उल्लंघन करतात, त्यांना पोलिसांकडून चोप दिला जात आहे.

दारे नसलेले विद्युत जनित्र धोकादायक

अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात बहुतांश ठिकाणी असणाऱ्या विद्युत जनित्र पेट्यांची दारे तुटलेली आहेत तर अनेक विद्युत पेट्यांना दरवाजेच नाहीत. ही स्थिती गेल्या अनेक वर्षांपासून आहे. अनेक विद्युत जनित्र शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आहेत. रस्त्याची उंची वाढल्याने ही जनित्र सहज हाताला येतात. त्यामुळे संभाव्य धोका मोठ्या प्रमाणात आहे. तर ग्रामीण भागात जनावरे कधीही अशा विद्युत पेट्यांकडे जाऊ शकतात. त्यामुळे हा संभाव्य धोका टाळण्यासाठी जनित्रांना दरवाजे बसवावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत देशपांडे यांनी केली आहे.

===Photopath===

020421\3147022_bed_7_02042021_14.jpg

===Caption===

मोर

Web Title: The number of peacocks increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.