ग्रामीण भागातून मिळेना बसला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:35 IST2021-07-27T04:35:03+5:302021-07-27T04:35:03+5:30

पुरुषोत्तम करवा माजलगाव : मागील तीन आठवड्यांपासून येथील आगाराने ग्रामीण भागात अनेक गावांत बस सुरू केली होती. अनेक सुविधा ...

No response from rural areas | ग्रामीण भागातून मिळेना बसला प्रतिसाद

ग्रामीण भागातून मिळेना बसला प्रतिसाद

पुरुषोत्तम करवा

माजलगाव : मागील तीन आठवड्यांपासून येथील आगाराने ग्रामीण भागात अनेक गावांत बस सुरू केली होती. अनेक सुविधा असताना प्रवासी बसला पाठ दाखवत असल्याने आगाराचे नुकसान होत असून, काही गावात बस सोडायची की नाही, असा प्रश्न आगारप्रमुखांना पडला आहे.

माजलगाव आगारातून १५-१६ महिन्यांपासून बस अनेकवेळा चालू बंद करण्यात आल्या. शहरी भागात जाणाऱ्या बसला दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद पाहता बस वाढवण्याची वेळ येथील आगारावर आली, तर २०-२२ दिवसांपासून येथील आगारातून ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बससेवा सुरू केली होती. सुरुवातीला दोन फेऱ्या सुरू करण्यात आल्या होत्या. सध्या तालुक्यातील खतगव्हाण, गुंजथडी, डुब्बाथडी, गोवर्धन, पुंगणी, आनंदगाव, मंजरथ, आबेगाव, पुरुषोत्तमपुरी आदी गावांना बससेवा सुरू करण्यात आली आहे.

गुंजथडी, आबेगाव, पुरुषोत्तमपुरी, गोवर्धन या गावात जात असलेल्या बसला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने फेऱ्या वाढवण्यात आल्या असून, सध्या या गावांना दिवसातून तीन वेळा बस सोडण्यात येत आहेत. प्रवासी वाढल्यास त्या गावांना जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत, तर बाकीच्या गावांना प्रवाशांकडून बसला पाठ दाखवण्यात येत आहे. या गावात बसमध्ये २०-२५ टक्केच प्रवासी प्रवास करताना दिसून येत आहेत. सध्या मोहखेडमार्गे अंबाजोगाई ही नवीन बससेवा सुरू करण्यात आली असल्याचे या आगाराकडून सांगण्यात येत आहे.

बसमधून प्रवासाची भीती जाईना

ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये कोरोनाच्या बाबतचे भीतीचे वातावरण अद्याप कमी झालेले दिसत नाही. विशेष म्हणजे वयोवृद्ध नागरिकांमध्ये याची भीती जास्त असल्याने वयोवृद्ध नागरिक बसमधून प्रवास करण्यात टाळाटाळ करताना दिसत आहेत. ते मोटारसायकल किंवा अवैध वाहनांना प्राधान्य देताना दिसत आहेत.

------

बसमधून अंध, अपंग, वयोवृद्ध नागरिकांना सुविधा मिळत असतानादेखील ग्रामीण भागातील हे नागरिक बसने प्रवास करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. सध्या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात प्रवास करणाऱ्यांची संख्या चांगलीच वाढत आहे. यामुळे चालणाऱ्या गाड्यात फायदा होत असून, ग्रामीण भागातील बस तोट्यात चालल्या आहेत.

-दत्तात्रय काळम पाटील, आगारप्रमुख, माजलगाव

---

Web Title: No response from rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.