अवैध वाळू उपश्यावर नियंत्रण दिसेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:36 IST2021-03-09T04:36:19+5:302021-03-09T04:36:19+5:30
भाजीमंडईतील कोंडी हटेना बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त ...

अवैध वाळू उपश्यावर नियंत्रण दिसेना
भाजीमंडईतील
कोंडी हटेना
बीड : शहरातील भाजी मंडईत प्रत्येक रविवारी आठवडी बाजार भरतो; परंतु येथील अरुंद रस्ते व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी कायम राहत आहे. पालिका अथवा पोलिसांकडून यावर कसलीच कारवाई अथवा उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे संताप व्यक्त होत आहे. नियोजन करून ही कोंडी सोडविण्याची मागणी होत आहे.
स्थानकात अस्वच्छता; आरोग्य धोक्यात
अंबाजोगाई : येथील बसस्थानकात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरल्याने प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे. बसस्थानकाच्या परिसरात ठिकठिकाणी पडलेले खड्डे, त्यात साठणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरलेली असते, तसेच मोकाट जनावरांचा प्रादुर्भावही बसस्थानकात मोठ्या प्रमाणात असल्याने प्रवाशांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होते.
कित्येक महिन्यांपासून घरकुलाचे हप्ते थकले
बीड : कित्येक महिन्यांपासून बांधकाम पूर्ण झालेल्या घरकुलांचे थकलेले हप्ते नगर परिषदेकडून लाभार्थींच्या खात्यावर टाकण्यात आलेले नाहीत. याबाबत वारंवार मागणी करूनदेखील आश्वासनाशिवाय दुसरे काहीही लाभार्थींना मिळत नाही. तातडीने हा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आहे.
काटेरी झुडुपांचा वाहनधारकांना त्रास
राक्षसभुवन : गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन ते उमापूर या १० कि.मी. रस्त्यालगत बाभळीची काटेरी झाडे वाढली आहेत. रस्ता लहान, झाडे मोठी अशी परिस्थिती झाल्यामुळे अनेकांना याचा त्रास होत आहे. झुडपे काढण्याची मागणी ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.
लघु व्यावसायिकांच्या जागेचा प्रश्न गंभीर
केज : शहरात रस्त्याच्या दुतर्फा बसून, लहान-मोठा व्यवसाय करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला ज्यांच्या मालकीच्या जागा आहेत, त्यांच्या मर्जीनुसार भाडे देऊन जागा किरायाने घ्यावी लागत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग कामासाठी रस्त्याचे खोदकाम केल्याने अनेकांवर त्यांचे व्यवसाय जागेअभावी बंद करण्याची वेळ आली आहे.
व्यावसायिकांकडून
नियमांची पायमल्ली
बीड : हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे; परंतु अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष केले जात आहे.
अनुदानासाठी निराधारांची गर्दी
धारूर : येथे तहसील कार्यालयातून निराधार व श्रावणबाळ योजनेचे अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. हे अनुदान मिळण्यासाठी निराधारांनी टपाल कार्यालयात गर्दी केली आहे. सकाळपासूनच निराधारांच्या रांगा लागलेल्या असतात. गर्दीमुळे निराधारांना ताटकळावे लागत आहे.
विजेच्या लपंडावाने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : शहर व परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. याचा शहरी व ग्रामीण भागाला फटका बसत आहे. याबाबत अनेक वेळा तक्रारी करूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने विजेअभावी अनेक कामे खोळंबली जात आहेत. यामुळे सुरळीत वीज पुरवठा करण्याची मागणी होत आहे.