संरक्षक कठड्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:41 IST2021-07-07T04:41:11+5:302021-07-07T04:41:11+5:30
पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेतीकामात शेतकरी ...

संरक्षक कठड्याची गरज
पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल
शिरूर कासार : सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने, शेतशिवार माणसांनी गजबजून गेला आहे. शेतीकामात शेतकरी व्यस्त आहे. बी-बियाणे, खते आणून ठेवले आहे. असे असले, तरी काही भागांत मात्र पाऊस कमी आहे. तेथील शेतकरी मोठ्या पावसाची अपेक्षा व्यक्त करत आहेत.
पावसाळ्यात कडक उन्हाचे चटके
शिरूर कासार : जून संपून जुलै सुरू झाला आहे. पण पावसाने ओढ दिली आहे. शिवाय कडाक्याचे ऊन पडत असल्याने भर पावसाळ्यात पायपोळ सुरू झाली आहे. दुपारच्या वेळेस कोवळी पिके माना टाकत असल्याचे चित्र आता सगळीकडे दिसत आहे.
झाडाखाली निंबोळीचा सडा
शिरूर कासार : बहुगुणी म्हणून कडुलिंबाच्या झाडाकडे पाहिले जाते. या झाडाचे लाकूड जसे कामाला येते, तसा त्याचा हिरवा पालादेखील विविध रोग निवारणासाठी वापरला जातो. निंबोळी अर्क तर शेतीपिकासाठी संजीवनी ठरत आहे. सध्या कडू लिंबाच्या झाडाखाली पिकलेल्या पिवळ्या व रसभरीत निंबोळ्यांचा सडा पडलेला दिसून येत आहे. त्या गोळा करून त्याचा अर्क तयार करून वापरल्यास औषधींच्या खर्चात बचत होईल, असा सल्ला कृषितज्ज्ञ देत आहेत.
नाल्यातील पाणी रस्त्यावर
केज : शहरातील नाल्याची साफसफाई नगरपंचायतीने पावसाळा पूर्व केली नाही. पाऊस पडल्याने नाल्यात घाण साचल्याने पाणी शहरातील प्रमुख रस्त्यावर येत आहे. नाल्यातील घाणपाणी अनेकांच्या घरात जात आहे. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. तरी नगरपंचायतीने शहरातील नाल्यांची स्वच्छता करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
प्रवासी निवाऱ्यांच्या दुरुस्तीची मागणी
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात अनेक ठिकाणी आमदार, खासदार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींच्या निधीतून प्रवाशांसाठी निवारे उभारण्यात आले आहेत. मात्र यातील बहुतांश प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. काही निवाऱ्यांचा लोक चारा भरण्यासाठी, गुरे बांधण्यासाठी, चहा, पान दुकानाच्या व्यवसायासाठी वापर करीत आहेत. काही ठिकाणचे प्रवासी निवाऱ्यांची पत्रे उडून पडझडही झाली आहे. संबंधित विभागाने सर्वेक्षण करून या प्रवासी निवाऱ्यांची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
नवीन वसाहतींमध्ये सुविधा मिळाव्यात
अंबाजोगाई : शहराच्या चारही बाजूने नवीन वसाहती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. मात्र या वसाहतींमध्ये मूलभूत सुविधा उपलब्ध होत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. काही वसाहती नगरपालिका तर काही वसाहती ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात येतात. या वसाहतींमध्ये मुख्य समस्या रस्त्यांची असून, पावसाळ्यात रस्त्याअभावी ये-जा करण्यासाठी नागरिकांचे हाल होतात.
रस्त्यांबरोबरच वीज, पाणी, गटारी आदी मूलभूत सुविधाही उपलब्ध करून देण्याची मागणी आहे.
बसस्थानक परिसरात दुर्गंधी
वडवणी : शहरातील नगरपंचायत कार्यालयाच्या परिसरात वाहतूक नियंत्रक कक्ष चालतो. या ठिकाणी सार्वजनिक प्रसाधनगृह नसल्याने स्वच्छतेअभावी परिसरात दुर्गंधी पसरली आहे. बसस्थानक परिसर स्वच्छ करण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे.
शेतकऱ्यांची खते, बियाणांसाठी गर्दी
शिरूर कासार : खरीप हंगाम पेरणीची घाई सर्वत्र सुरू आहे. कृषी सेवा केंद्रावर बियाणे, तणनाशके व इतर आवश्यक कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. आपल्या आवडीचे वाण मिळत नसल्यास कृषी सेवा केंद्राच्या विश्वासावर बियाणे, खतखरेदी करीत आहेत.