पर्यावरण उभारणीसाठी बांबू लागवड काळाची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:52+5:302021-01-13T05:27:52+5:30
गेवराई : इंधन माणसांची सवत बनून जगात अवतरले असून त्यामुळे निसर्गचक्र पार बिघडले आहे. म्हणून या पुढे सकल मानव ...

पर्यावरण उभारणीसाठी बांबू लागवड काळाची गरज
गेवराई : इंधन माणसांची सवत बनून जगात अवतरले असून त्यामुळे निसर्गचक्र पार बिघडले आहे. म्हणून या पुढे सकल मानव जातीने स्वत:ला आणि भावी पिढीला वाचविण्यासाठी पर्यावरणाच्या उभारणीसाठी नव्याने सुरुवात करून बांबूची लागवड करावी, असे आवाहन माजी आमदार पाशा पटेल यांनी येथे केले. शनिवारी येथील कृषी कार्यालयातील बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी दिलीप गोरे,कृषी अधिकारी हर्षवर्धन खेडकर, दत्ता जाधव, अनिल जरांगे, किरण बांगर , सचिन पवार, कृषी सहायक चव्हाण, करांडे, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
पाशा पटेल म्हणाले, १ जानेवारी रोजी पाटोदा तालुक्यातील गवळवाडीत अकरा झाडे लावून गोमा खोरे (गोदावरी- मांजरा) पुनर्जीवन प्रकल्पाची सुरुवात केली आहे. आजकाल झाडांची संख्या कमी आणि इंजिन जास्त झाल्यामुळे प्रदूषण वाढत आहे. यामुळे गारपीट, महामारीसारख्या घटना घडत आहे. निसर्गाचे संतुलन राखण्याची गरज आहे. सध्या कुठल्याच ऋतूनुसार निसर्ग चालत नाही. म्हणून आज पर्यावरण रक्षणाची गरज असल्याचे पटेल म्हणाले.
पर्यावरणपूरक बांबू पीक
आता कार्बन खाणाऱ्या झाडाची लागवड करावी लागेल. यामध्ये बांबू हाच एक पर्याय आसल्याचे त्यांनी सांगितले. एक बांबू वर्षाला ३२० किलोपेक्षा जास्त ऑक्सिजन देत आहे. ३० टक्के अधिकचे कार्बन खात असल्याने,पर्यावरणपूरक म्हणून बांबू पीक आवश्यक आहे. बांबू एकरी लाख रुपये उत्पन्न देत असून ते शेती आणि शेतकऱ्यांना परवडणारे आहे.
चळवळ हाती घेतली
बांबूपासून इथेनॉल, सीएनजी, कापड, फर्निचर, बिस्कीट, लोणचे, इंटेरिअर डिझाईन तसेच यानातील तापमान रोधक म्हणून उपयोगात येणार आहे. यासाठी आम्ही ही चळवळ सुरू केली असून गोदावरी व मांजरा नदीच्या माध्यमातून गोमा प्रकल्प चालू केला आहे. यातून मोठ्या प्रमाणात बांबू लागवड करणार असल्याचे पाशा पटेल म्हणाले.