म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:10+5:302021-06-01T04:25:10+5:30
गेवराई : कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि त्यापासून उद्भवणारी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवावीत, असे ...

म्युकरमायकोसिस संसर्गजन्य आजार नाही - A
गेवराई : कोरोना होऊन गेलेल्या नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा त्रास आणि त्यापासून उद्भवणारी लक्षणे दिसल्यास तात्काळ रुग्णालयात जाऊन दाखवावीत, असे आवाहन येथील रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. राजेश शिंदे यांनी केले. त्यामुळे कोणीही घाबरण्याची गरज नाही. म्युकरमायकोसिस (बुरशी) आजार संसर्गजन्य नसून, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाला होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला सात वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कोरोना आजार होऊन गेलेल्या नागरिकांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात डॉ. शिंदे बोलत होते. आ. लक्ष्मण पवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, वैद्यकीय अधीक्षक डॉ. महादेव चिंचोले, राजेंद्र राक्षसभुवनकर, जानमोहंमद बागवान, ॲड. घुंबार्डे, डाॅ. सराफ, डाॅ. आंधळे, डाॅ. मिसाळ, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. जाजू, डाॅ. कोटेचा, माजी नगराध्यक्ष ब्रम्हदेव धुरंधरे, दादासाहेब गिरी, संजय आंधळे, नगरसेवक कानगुडे, सभापती भरत गायकवाड, जिजा खंडागळे, स. बद्रुदीन, महेश सौंदरमल, करण जाधव आदींची उपस्थिती होती.
न.प. सभागृहात झालेल्या आरोग्य शिबिरात डॉ. राजेश शिंदे यांनी म्युकरमायकोसिस आजाराविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, कोणताही आजार हा रोगप्रतिकार शक्तीवर अवलंबून असतो. त्याचे निदानही होते. वातावरणात पूर्वीपासून जिवाणू ,विषाणू आहेत. बुरशी आजार दुर्मिळ असल्याचे ते म्हणाले.
डॉ. शिंदे यांनी सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, शिळ्या ब्रेडच्या तुकड्यांना बुरशी दिसते. बुरशी वातावरणात सुद्धा असते. परंतु, हा आजार एका माणसाकडून दुसऱ्याला होत नाही. या आजाराचे विषाणू हवेतून फुप्फुसात आणि जखमेतून शरीरात जातात. त्यामुळे, लाल डोळे होणे, तीव्र डोकेदुखी, उलट्या, धाप लागणे, खोकल्यातून रक्त, किडनीवर सूज येण्याची लक्षणे दिसून येतात. असे असले तरी नागरिकांनी घाबरू नये. महामारीतून बरे झालेल्या नागरिकांनी महिना ते दीड महिना स्वतःकडे लक्ष दिले पाहिजे. त्रास जाणवला की, उशीर करू नये. रुग्णालयात जाऊन वैद्यकीय उपचार घ्यावेत. बचावासाठी नागरिकांनी हातात हातमोजे घालावेत. पायात शूज घालावेत. काही दिवस शेतात काम टाळण्याचा सल्ला त्यांनी दिला. महिनाभर घरातच आराम करून, चांगला आहार घ्यावा, असे आवाहन डॉ. शिंदे यांनी केले.
शहर व परिसरातील नागरिकांनी या शिबिरात उपस्थिती लावली. ॲड. राजेंद्र राक्षसभुवनकर यांनी आभार मानले.
फोटो :
गेवराई येथे कोरोना आजार होऊन गेलेल्या नागरिकांसाठी आयोजित मोफत आरोग्य शिबिरात रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर.