रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:47 IST2021-01-08T05:47:07+5:302021-01-08T05:47:07+5:30
जनावरांचा ठिय्या माजलगाव : शहरातील रस्त्यांवरील अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघात ...

रस्त्यावरील धुळीमुळे वाहनधारक त्रस्त
जनावरांचा ठिय्या
माजलगाव : शहरातील रस्त्यांवरील अनेक मार्गावर जनावरे ठिय्या मांडून बसत असल्यामुळे वाहनचालकांना त्रास होत आहे. अनेकवेळा अपघात झाल्याचेदेखील उदाहरणे आहेत. ही जनावरे रस्त्यावरुन हटवावीत, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून केली जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने जनावरांचा धोका वाढत आहे.
शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था
बीड : बीड बायपासचे काम पूर्णत्वास जाऊन दोन वर्षे उलटून गेलेली असताना शहरवासियांना लोकप्रतिनिधींनी दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण झालेले नाही. बीड शहरातून जाणारा मुख्य रस्ता काम होणे अपेक्षित असताना याकडे लोकप्रतिनिधींचा कानाडोळा असल्याचे दिसते. दर्जेदार रस्ते करून वाहनधारक, नागरिकांना सुविधा देण्याची मागणी केली जात आहे.
वाहनधारकांना बाभळीचा अडथळा
गेवराई : तालुक्यातील ग्रामीण भागात जाणाऱ्या रस्त्यावर विविध ठिकाणी बाभळीचा वेढा वाढल्याने येणाऱ्या जाणाऱ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. मोठ्या झाडांच्या खाली आलेल्या फांद्या व काटे ओरबाडत असल्याने वाहने चालविताना कसरत करावी लागते. रस्त्यांना अडथळे ठरणाऱ्या फांद्या तसेच बाभळी तोडण्यात याव्यात, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांतून होत आहे.
पोलिसांनी गस्त वाढविण्याची मागणी
वडवणी : वडवणीसह तालुक्यातील ग्रामीण भागात काही दिवसांपासून भुरट्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अंधाराचा फायदा घेत होणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. परंतु अद्यापही याकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे चोरट्यांना फावत असल्याचे दिसून येत आहे.
पाण्याचा अपव्यय थांबविण्याचे आवाहन
अंबाजोगाई : समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाण्याची उपलब्धता आहे. शहराला पाणीपुरवठा करणारे मांजरा धरण व काळवटी साठवण तलाव हे दोन्ही जलस्त्रोत तुडुंब भरले आहेत. पाणीसाठा भरपूर उपलब्ध झाल्याने नळाला मोठ्या प्रमाणात पाणी येत आहे. नागरिकांनी नळाला तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन नगरपालिकेने केले आहे.
रॉकेलचा गैरवापर
गेवराई : गरिबांसाठी स्वस्त धान्य दुकानांवरील रॉकेल काळ्या बाजारात जात असून, त्याचा वापर वाहनांसाठी केला जात आहे. यामुळे प्रदूषण वाढत आहे. तर दुसरीकडे शिधापत्रिका धारकांना रॉकेल मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. परंतु महसूल प्रशासनाकडून अद्यापही याकडे लक्ष न दिल्यामुळे रॉकेलचा गैरवापर सुरूच आहे.
पर्यावरणास धोका
माजलगाव : तालुक्यातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा होत आहे. याकडे महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाच्या मनमानी कारभाराचा फटका पर्यावरणाला बसत असल्याचे चित्र गोदाकाठच्या नदी पात्रांमध्ये दिसत आहे. कारवाईची मागणी नागरिकांतून केली जात आहे. महसूल, पोलीस प्रशासनाचा वचक न राहिल्याने वाळू उपसा निर्धास्तपणे सुरूच आहे.